छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याची लखलखती तलवार!
कादंबरीकार विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
09-Jun-2025
Total Views | 11
मुंबई : " छत्रपती संभाजी महाराजांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रुचा बिमोड केला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याची लखलखती तलवार. " असे प्रतिपादन कादंबरीकार, लेखक विश्वास पाटील यांनी केले आहे. नॅश्नल लायब्ररी वांद्रे आयोजित ' नाते जीवा शिवाचे' या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला नॅश्नल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. ५ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे येथील नॅश्नल लायब्ररी येथे ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक शिवप्रेमी वाचकांनी हे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की " शिवाजी महाराज आणि शंभूराजे या पिता-पुत्र्यांच्या जीवन चरित्रातून जीवनाची सार्थकतेची प्रचिती येते. महाराष्ट्राचा इतिहास गौरवाच्या गुलाला बरोबर गद्दारीच्या शेणाने माखलेला आहे आणि मराठी सिनेमा, नाटक व काही पुस्तकं यामधून शंभूराजां ची केलेली बदनामी सरासर झूट आहे" असे घणाघाती उद्गार विश्वास पाटील यांनी काढले.
सदर कार्यक्रमात बोलताना अशोक बेंडखळे म्हणाले की " आजकालच्या प्रदूषित वातावरणात खरा इतिहास कळावा म्हणून या व्याख्यानांची गरज आहे." या प्रसंगी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री दिलीप कोरे यांचा सत्कार करण्यात आला.