जगातील अनेक देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही, अधिक लोकांनी सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. भारत सरकार इतक्या प्रचंड जनसंख्येचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करू शकते, हे जगाने पाहिले. अनेक देशांतील लोकही यात सहभागी झाल्यामुळे, जगालाही सनातन धर्माचे विश्वरूपदर्शन झाले आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात, कालच्या बुधवारी माघ पौर्णिमेचे पवित्र स्नान पार पडले. यानिमित्त महाकुंभमेळ्यात केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून हजारो लोक आले आहेत. त्यात हिंदूंबरोबरच, ख्रिस्ती आणि बौद्ध धर्मीयांचाही समावेश आहे. या लोकांवर कुंभमध्ये सहभागी झालेल्या हिंदू श्रद्धाळूंच्या भक्तीचा, खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. इतके कोट्यवधी लोक येथे कशासाठी येतात? हा प्रश्नही त्यांना पडला असल्याचे जाणवते. कारण, तसे बघितले तर कुंभात स्नान करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेच कर्मकांड येथे केले जात नाही. केवळ नदीत स्नान करण्यासाठी, देशभरातून कोट्यवधी लोक कसे येऊ शकतात आणि त्यासाठी वाटेल त्या अडचणी कशा विनातक्रार सोसू शकतात? हा परदेशी नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. सनातन धर्माचे हेच खरे वैशिष्ट्य असून, या महाकुंभने जगाला सनातन संस्कृतीचे विश्वरूपदर्शन घडविले आहे.
या लोकांना कुंभमेळ्यात सहभागी होण्याची कोणीही सक्ती केलेली नाही की त्यातून त्यांना, कोणताही ऐहिक लाभ होत नाही.
उलट घरापासून इतका लांब प्रवास करणे, तंबूत किंवा उघड्यावर राहणे, मिळेल ते खाणे-पिणे आणि अनेक मैल पायी चालण्यासारखे त्रास असतानाही, अक्षरशः कोट्यवधी लोक सहजतेने ही यात्रा करताना पाहून शहरी, भारतीय लोकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. मग परदेशी लोक चकित झाले, तर त्यात काय नवल! अर्थात, सर्व कुंभमेळ्यांना इतकी गर्दी होत नसते. यंदाचा कुंभ हा १४४ वर्षांनंतर आलेला कुंभ आहे. म्हणजे, १४४ वर्षांत एकदाच निर्माण होणारी ग्रहस्थिती, या कुंभमेळ्याचे कारण आहे. म्हणूनच त्यास ‘महाकुंभ’ म्हटले जात आहे. या एकमेवाद्वितीय स्थितीचा लाभ घेण्यासाठी, कोट्यवधी हिंदू प्रयागराजला जमा झाले आहेत. हिंदू समाज हा जात, भाषा आणि प्रांत यांत विभागला गेला आहे. हिंदूंचे सर्व सण भारतात साजरे होत असले, तरी त्यात प्रदेशानुसार सांस्कृतिक भिन्नता असते. मात्र, कुंभमेळ्याचा उत्सव एकाच पद्धतीने साजरा होतो. हा मेळा हिंदूंना खर्या अर्थाने एकत्र आणतो. त्यातच यंदा महाकुंभ असल्याने, प्रयागराजला ‘न भूतो न भविष्यति’ अशी गर्दी झाली आहे.
इतक्या प्रचंड प्रमाणावर भारतीय एकत्र येत असल्याचा परिणाम भारतातील राजकारणावर पडला नसता, तरच नवल. हा महाकुंभ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा सिद्ध होत आहे, हे स्पष्टच आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी या मेळ्यात सहभागी झालेल्या श्रद्धाळूंच्या प्रतिक्रिया प्रसारित केल्या असून, त्यात लोक योगींचे आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानताना दिसत आहेत. तसेच ‘जय मोदी, जय योगी’च्या घोषणा दुमदुमत आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्माबद्दल आस्था आणि अभिमान बाळगणार्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना हा मेळा होत असल्याने, भाजप नेत्यांनी आणि त्यातही योगींनी त्याचे काळजीपूर्वक आयोजन केले आहे.
योगींना आणि भाजपला मिळणार्या या प्रशंसेमुळेच, विरोधी पक्ष अत्यवस्थ होत आहेत. या मेळ्यात कशी सर्वत्र अव्यवस्था आहे, लोकांना किती अडचणींना सामोरे जावे लागत आहे, किती तास प्रतीक्षा करावी लागत आहे आणि मेळ्याच्या जागी येणे आणि तेथून पुन्हा आपल्या घरी जाणे, याला प्रचंड वेळ लागत असल्याच्या आरोपांमध्येच विरोधक गुंतले आहेत. वस्तुस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. श्रद्धाळूंची या सर्व अडचणींना तोंड देण्याची मानसिक तयारी असून, कोठेही अव्यवस्थेमुळे लोकांमध्ये असंतोष माजल्याचे किंवा त्यांनी निदर्शने केल्याचे दिसले नाही. गंगा नदीचे पाणी किती दुषित झाले आहे, हे प्रयागराजला न जाताच काही मानभावी नेते आणि नेत्या सांगत आहेत. विशेष म्हणजे, या नेत्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी मात्र प्रयागराजमध्ये डुबकी मारली आहे. तरीही, या मेळ्याला नावे ठेवण्याचे कारण म्हणजे, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांचा राजकीय आधारच या संगमात वाहून गेला आहे.
भारतीय समाजात जातींवरून फूट पाडण्यासाठी जातीगत जनगणनेचा जप करीत राहणार्या नेत्यांना, कोट्यवधी लोक कसलीही तक्रार न करता एकत्र येताना पाहूनच मानसिक धक्का बसण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात काही उच्च जातींनी कथित कनिष्ठ जातींवर केलेल्या खर्या-खोट्या आरोपांचे पालुपद वापरून, समाजात विद्वेष पसरविण्याच्या त्यांच्या राजकारणाला महाकुंभने सुरूंग लावला आहे. ज्या भाजपला ‘मनुवादी’ वगैरे विशेषणे लावली जातात, त्याच भाजपने हा सर्वसमावेशक महाकुंभ उत्कृष्टपणे आयोजित केला आहे. त्यात कोठेही अव्यवस्था किंवा भ्रष्टाचाराचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे जनतेत या पक्षाच्या नेत्यांबद्दल जो आदर आणि आपलेपणा निर्माण झाला आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या कुंभकाळातच दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर येथे झालेल्या निवडणुकांमध्ये, भाजपला भरघोस यश लाभले आहे. या महाकुंभचे उत्तरकांड हे वर्षभर सुरू राहणार असून, वर्षअखेर होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रभाव दिसून येईल. म्हणूनही विरोधकांना निराशेचे झटके येत आहेत.
पुढील दहा वर्षांनी होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी, मोदी सरकार प्रयत्नशील आहे. या स्पर्धा हाही प्रचंड प्रमाणावरील माणसांचे व्यवस्थापन करण्याचा उद्योग असतो. पण महाकुंभात सहभागी झालेल्या जवळपास ४० कोटी लोकांचे सुव्यवस्थित आयोजन जर सरकार करू शकत असेल, तर त्यापुढे ऑलिम्पिक स्पर्धा हा पोरखेळ मानावा लागेल. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या अमृत कलशातून अमृताचे चार थेंब पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले, तेथे कुंभमेळा आयोजित केला जातो, अशी मान्यता आहे. या कुंभमेळ्यात जगातील हिंदूंचे धर्मगुरू एकत्र येऊन, हिंदू धर्मापुढील तत्कालीन आणि भावी आव्हानांवर विचार करतात. कुंभमेळ्याचा उगम मंथनातून झाला असला, तरी सध्या महाकुंभातील लोकांच्या मंथनातून, भारतीय राजकारणाच्या अमृतकाळाचा उदय होईल, इतके निश्चित!
राहुल बोरगांवकर