शिक्षण आणि वसाहतवाद यांचा विचार एकत्रितपणे करायचा असेल, तर भारतीय संदर्भात हा विचार ब्रिटिशांच्या राजवटीपुरता मर्यादित ठेवता येत नाही. भारतीय इतिहास आणि विज्ञानाची परंपरा पाहता, आपल्याला एतद्देशीय हिंदू समाजाच्या उत्थानाचा आणि पतनाचा जो स्वाभाविक कालक्रम लक्षात येतो, त्याचा परिवर्तन बिंदू साधारण बाराव्या शतकात झालेल्या इस्लामी आक्रमणाशी जोडता येतो. भारतीय ज्ञानपरंपरा ही जर इथल्या ऐहिक प्रगतीचा मूलाधार मानली, तर तिच्यातील परिवर्तने, अधोगती आणि कालानुक्रमे विस्मृती ही केवळ ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून पाहता येत नाही, तर त्याच्यापूर्वी न्यूनधिक ५०० वर्षे भारतीय समाजात कोणते बदल झाले आणि त्यांचा शिक्षणव्यवस्थेवर कसा परिणाम झाला ते पाहायला हवे.
भारतीय शिक्षणव्यवस्थेतील काही मूलभूत तत्त्वे जसे गुरू-शिष्य परंपरा यांचा परिचय आपण मागील भागात पाहिला. या तत्त्वांचा आजच्या काळात नेमका कसा संदर्भ लावता येईल, याचीही त्रोटक चर्चा आपण केली. या व्यवस्थेत बदल घडण्यामागे नेमके कोणते घटक कारणीभूत ठरले, याचा आढावा आपण या भागात घेऊ.
शिक्षणव्यवस्थेतील बदल पाहण्यापूर्वी आपण प्राचीन शिक्षणव्यवस्था नेमकी कशी होती, ते थोडयात जाणून घेऊ. वैदिक कालखंडातील गुरुकुल पद्धत जरी वेदाभ्यासासाठी योग्य असली, तरी नंतरच्या काळात अनेकविध विद्यांच्या निर्मितीनंतर ती सर्वत्र फारशी उपयुक्त नव्हती. मुळात वेदाभ्यासाचे स्वरूप बदलत जाऊन त्यात ‘पाठ’ आणि ‘अन्वय’ असा भेद आला होता. त्यामुळे उच्चार आणि आघातांसहित अचूक वेदपठण करणारे विद्यार्थी आणि वेद व ब्राह्मणग्रंथातील गूढ तत्त्वांचे रहस्य जाणून निरूपण करणारे विद्यार्थी, असा फरक पडल्याने त्याप्रकारचे शिक्षण देणार्या गुरुकुलांमध्येसुद्धा भिन्न प्रकार निर्माण झाले असावेत. तसेच या काळात वेदांगे, धर्मसूत्रे व गृह्यसूत्रे, इतिहास व पुराणे यांचाही अभ्यास सुरू झाला होता. साहजिकच विद्यार्थ्याची आवड आणि कुवत लक्षात घेऊन, त्याप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करून त्यास योग्य त्या विषयांच्या पाठशाळेत पाठवण्याची पद्धत या काळात निर्माण झाली असेल. विविध ग्रंथांतील उल्लेखावरून असे दिसते की, प्राथमिक शिक्षण हे सर्व वर्णांच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून, त्यानंतर रुचीनुसार एखाद्या किंवा दोन विषयात सखोल अभ्यास करून विशेष प्राविण्य प्राप्त करण्याची पद्धत होती. सर्व वर्णांचे विद्यार्थी असल्याने आचार्य वर्गातही सर्व वर्णांच्या आचार्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्याचबरोबर अनेक ऐहिक विद्या या प्रगत अवस्थेला पोहोचल्याने, त्यांच्या विशेष शिक्षणाचीही आवश्यकता निर्माण झाली. शरीरचिकित्सा व रसायनशास्त्र, ज्योतिष, धातूशास्त्र व शस्त्रनिर्मिती, नौकाबांधणी आणि नौकानयन यांसारखे अनेक विषय गुरुकुलांच्याच तत्त्वावर चालणार्या पाठशाळांमध्ये शिकवले जाऊ लागले. या शाळांमध्ये प्रथितयश आणि अनुभवी तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांना निवासी विद्यालयाप्रमाणे रुजू करून घेत आणि प्रत्यक्ष अनुभव तसेच, तांत्रिक ज्ञान दोन्ही एकत्रितपणे शिकवत असत. भारतीय चिंतनानुसार प्रत्येकच विषयाचे एक धार्मिक आणि आध्यात्मिक अंग असल्याने कोणतीही विद्या ही केवळ त्याविषयीच्या भौतिक साधनांमध्ये आणि तंत्रांमध्ये प्राविण्य मिळाल्याने पूर्ण आत्मसात झाली असे मानले जात नसे, तर त्या विद्येचे संपूर्ण सामाजिक व्यवहारातील स्थान योग्य प्रकारे जाणून घेतल्याशिवाय तिचा चरितार्थासाठी वापर करण्याची दीक्षा मिळत नसे.
भारतीय शिक्षणपद्धतीचे व्यावहारिक रूप पाहता, ही व्यवस्था तीन पातळ्यांवर चालायची, असे आपल्या लक्षात येते. सर्वांत खालच्या पातळीवर एकल शिक्षकी गुरुकुले होती. या शाळांमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले जात असे. यात वेद व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास अंतर्भूत होता. उपनयन संस्कारानंतर छात्र गुरुगृही जाऊन या विद्या ग्रहण करत असे. काही ग्रंथांमधून त्याहीपूर्वी घरीच करण्याच्या विद्यारंभ संस्काराचा उल्लेख आहे, जो अगदी लहान मुलांना अक्षरओळख, संख्या आणि काही प्राथमिक भाषाविषयक ज्ञान देण्याची सुरुवात असावा. गुरुगृही विद्यार्थी साधारण आठ ते १२ वर्षांचा असताना जाई आणि तेथील अभ्यासक्रम हा साधारण १२ वर्षांचा मानला जाई. मात्र, त्यातही प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर रुचीच्या विषयात सखोल शिक्षण घ्यावे लागत असावे आणि गुरू जर एखाद्या विशिष्ट विद्येत पारंगत नसेल, तर दुसरा गुरू करण्याचीही पद्धत होती. विविध गुरुकुलांमध्ये शिक्षणाचा समन्वय साधावा, यासाठी आचार्य परिषद नेमली जाई. अशा परिषदेत तीन ते दहा सदस्य असावेत, अशी मते विविध ग्रंथांमधून आढळतात. या परिषदेत जसे वेदांचे जाणकार आचार्य असत, तसेच स्मृतींचे आणि विद्यांचे पंडित आचार्यसुद्धा असत. शिक्षणासंबंधी प्रश्नांचा आणि त्याचबरोबर काही धर्मविषयक कूटप्रश्न उपस्थित झाल्यास त्यांचाही निवाडा करण्याचे काम या आचार्य परिषदेकडे होते. अंतिम परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत का, याचाही निवाडा काहीवेळा ही परिषद करत असे. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्क्यांची किमान पात्रता नसल्याने आचार्यांचे विद्यार्थ्याच्या क्षमतेविषयी पूर्ण समाधान झाल्याशिवाय परीक्षेस उभे राहता येत नसे. स्थानिक पातळीवर गुरुकुल आणि परिषद अशा दोन स्तरांच्या नंतर विशेष उच्चशिक्षण देणारी अनेक विद्यापीठे भारतात होती. विविध विषयांचे गहन चिंतन आणि नवीन संशोधन या विद्यापीठांमध्ये चालत असे. भारतीय विद्यापीठांमधील गुरूंच्या सखोल ज्ञानाचे वर्णन भारतात शिक्षणासाठी आलेल्या अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी केलेले आहे.
विविध ज्ञानशाखांनी बहरलेल्या या हिंदू ज्ञानवृक्षाचे मूलतत्त्व ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ हे वेदवचन होते. कोणत्याही प्रकारचे ज्ञान हे इथे केवळ प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले नाही, म्हणून वर्ज्य नव्हते. हा विचारांचा स्वीकार अब्राहमिक पंथ तत्त्वज्ञानाच्या संपूर्ण विरुद्ध प्रकारचा आहे. वसाहतवादाचा परिणाम पाहताना या समावेशकता आणि विलगता या तत्त्वांमधील संघर्ष लक्षात घ्यायला हवा. प्रत्यक्ष ईश्वराने त्याच्या आवडत्या लोकसमूहाबरोबर केलेला करार आणि या कराराचे विविध प्रेषितांद्वारे नूतनीकरण ही अब्राहमिक ज्ञानपरंपरेची मूलधारा असल्याने सर्वच ज्ञानशाखा आणि त्यातून प्राप्त ऐहिक व पारलौकिक ज्ञान हे त्या कराराच्या कसोटीवर तोलून पाहण्याची पद्धत या समाजांमध्ये रूढ झाली. युरोपातील पुनरुज्जीवन विचार जेव्हा ख्रिस्ती विचारचौकटींना धडका देऊ लागला, त्याच सुमारास आपल्याला युरोपात ‘ऑसफर्ड’ आणि ‘केंब्रिज’सारखी मोठी विद्यापीठे उभी राहिलेली दिसतात.
भारतात याच काळात दुसरे अब्राहमिक पंथीय म्हणजेच इस्लामपंथी लोक प्रबळ सेनेनिशी स्वार्या करीत होते. उत्तर भारतावर पडलेल्या या परचक्राच्या छायेत अनेक प्रमुख विद्यापीठे नष्ट झाली. बख्तियार खिलजीची नालंदा विद्यापीठावरील स्वारी आणि कित्येक महिने जळणार्या तिथल्या ग्रंथालयाची कथा आपल्याला माहीत आहे. विद्यापीठे नष्ट होण्याचा भारतीय शिक्षणव्यवस्थेवरील परिणाम तिहेरी होता. पहिले म्हणजे ग्रंथालये नष्ट झाल्याने अनेक विषयांचे अध्ययन ताबडतोब बंद झाले. दुसरे म्हणजे, शिक्षकांना प्रत्यक्ष देहदंडाच्या शिक्षा किंवा अप्रत्यक्ष शिक्षा म्हणजे विद्यापीठे बंद झाल्याने अध्यापनाचे काम नष्ट झाले आणि त्यामुळे अध्ययन पुन्हा सुरू करता आले नाही. तिसरा सर्वांत दूरगामी परिणाम म्हणजे, शिक्षणव्यवस्थाच कोलमडल्यामुळे एक दोन पिढ्यांत कित्येक विद्या विस्मरणात गेल्या. कित्येक गुरूंनी छोट्या गुरुकुलांमधून अध्यापन सुरू ठेवले असेल किंवा दक्षिणेतील विद्यापीठांमध्ये आश्रय घेतला असेल. परंतु, यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या वैचारिक परचक्रामुळे अनेक परंपरा नष्टप्राय झाल्या. इस्लामी आक्रमकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या विद्यापीठांच्या विध्वंसामुळे आपल्या सामाजिक स्मृतीत त्या घटना अधिक स्पष्ट आहेत. परंतु, ख्रिस्ती आक्रमकांनीही सुरुवातीस विशेषतः दक्षिणेत याचप्रकारे भारतीय शिक्षणव्यवस्थांना नष्ट करण्याचे प्रयत्न केले. मोठ्या विद्यापीठांमधून परागंदा झाले, तरी अनेक आचार्यांनी छोट्या स्तरावर चालणारी असंख्य गुरुकुले सुरूच ठेवली होती. परकीय सत्ता स्थिर झाल्यानंतर थेट आदेश काढून अशा प्रकारच्या शिक्षणास बंदी, गुरुकुले चालवणार्या शिक्षकांना आणि त्यांना साहाय्य करणार्या ग्रामश्रेष्ठींना प्रत्यक्ष शिक्षा यामुळे हळूहळू गुरुकुल व्यवस्थाही नष्ट होत गेली. समाजात निर्माण झालेल्या इस्लामी व ख्रिस्ती शासकवर्गाने आचार्य परिषदेचा धर्माचा अधिकार न जुमानल्याने हळूहळू भारतीय शिक्षणव्यवस्थेचेे सर्वच घटक लुप्त होत गेले. साधारण ५०० वर्षांच्या सततच्या र्हासाने एकेकाळी अतिशय सक्षमपणे भारताच्या सर्व ज्ञानपरंपरांचे संक्रमण पुढील पिढ्यांना करणारी शिक्षणव्यवस्था हळूहळू लुप्त होत केवळ वेदविद्यांचा पाठ करवून घेणार्या काही पाठशाळा एवढेच त्यांचे स्वरूप उरले.
वसाहतवादाशी सामना करताना भारतीय शिक्षणपरंपरेचे यथार्थ ज्ञान तीन कारणांसाठी महत्त्वाचे आहे. पहिले म्हणजे, युरोपियन आक्रमकांनी इतर संपूर्ण जग हे अज्ञानाच्या अंधकारात पसरलेले आहे, असा समज स्वतः करून घेतला होताच. पण, सर्व जित समाजांच्या गळी उतरवला होता. युरोपियन लोकांचा ‘ज्ञान’ याचा अर्थ अत्यंत मर्यादित असून, त्याच्या कित्येक योजनेपल्याड भारतीय प्रतिभेची झेप होती, याची जाणीव समाजाचा स्वाभिमान जागृत करणारी आहे. दुसरे म्हणजे, आपल्या प्राचीन शिक्षणव्यवस्थेची आधुनिक जगाशी सांगड घालून त्यातून घेण्यासारखी काही शाश्वत तत्त्वे आहेत का, याचा शोध घेण्यासाठी या व्यवस्थेच्या सर्व अंगप्रत्यंगाचे ज्ञान आवश्यक आहे. पण, सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीच्या संवहनाचे माध्यम असते. आपल्या पुढील पिढ्यांना आपला सांस्कृतिक वारसा संक्रमित करावयाचा असेल, तर आपल्या संस्कृतीच्या सामूहिक आकांक्षा लक्षात घेऊन नवीन पिढी घडवणारे शिक्षण आवश्यक असते. आज आपली प्राचीन शिक्षणपद्धती नष्टप्राय होऊन संक्रमणाचा शेवटचा तंतू कुटुंबव्यवस्थेच्या रूपाने टिकून आहे. या संक्रमणव्यवस्थेचे पुनरुज्जीवन हे भारतीय शिक्षणपरंपरेच्या सखोल आकलनाचे प्रयत्न करण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे.
डॉ. हर्षल भडकमकर
लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
९७६९९२३९७३