स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व्यापक तेवढेच महत्त्च त्यांच्या काव्याचेही. म्हणूनच 2025 मध्येही सावरकरांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या काव्याला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्काराचा सन्मान मिळतो. याबद्दल तात्यारावांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या काव्याचे केलेले रसग्रहण...
“अशुद्धाला शुद्ध, अनित्याला नित्य, अनात्म्याला आत्म, अपुण्याला पुण्य समजणे म्हणजेच अविद्या,” असे योगशास्त्र सांगते. जे विवेक करतात त्यांनाच विद्या वरते. अशाच विवेकी विनायक सावरकर यांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्वर्गातून नाद उमटला. तो ऐकून त्यांस वीरश्री संचारली. त्यांनी आत्मबल प्रतिभेत ओतले आणि अतोनात कष्ट सोसून, देवांचे अनुचर बनले. श्री सदाशिव मनोमन प्रसन्न झाले आणि त्यांनी यमास तात्यारावांचा कर्माशय समजाविला.
स्मरत देवचर्या वागला जो व्रतानें,
ऋणमुक्त झाला मायभूच्या वरानें!
विनायक तिथे स्वार्थ हा दग्ध झाला,
तुष्ट आज हर हे कथितसें अंतकाला!
अश्मवर्म मे..सि- अनादि मी अनंत मी!
महापुरुषांची चरित्रे अभ्यासली की आपल्याला लक्षात येते, त्यांच्यावर येणारी संकटे ही त्या निखार्यावर फुंकर मारून त्यास अधिक प्रदीप्त करण्याचेच काम करीत असतात. जो वायू लहानशी वात विझविण्याचे काम करतो, तोच वायू जंगलातल्या प्रदीप्त अग्निस अनुकूल इंधनासारखा काम करतो. ही संकटे सोसताना मन डगमगून जाऊ नये आणि विवेकात स्थित होऊन प्रतिकूलतेसाठी सज्ज व्हावे, यासाठी मात्र योगमार्गात सांगितल्याप्रमाणे, अविप्लवा अशी दृढ आणि स्थिर नाव त्यांना शोधावी लागतात. अथर्ववेदामध्ये एका ब्रह्मर्षींनी असेच एक सूक्त रचल्याचे विधान आहे. ज्यामध्ये ते ‘अश्मवर्म मे .. सि’ (तू माझे अश्माचे वर्म, कवच आहेस!) असे उद्गार काढून, स्वतःच्या मनास बळकटी देण्याचे काम करीत आहेत असे दिसते. पण, आपण आज ऊहापोह मांडला आहे तो एका अर्वाचीन सूक्ताचा.
1910 सालचा इंग्रजी जुलै महिना. मार्सेलीस मधल्या बंदरावर तात्याराव सावरकरांना इंग्रजी सैनिकांनी, फ्रान्सच्या रक्षकांकडून लाच देऊन ताब्यात घेतले. मादाम कामा आणि त्यांचे साथीदार यायला काही क्षण उशीर झाला आणि त्रिखंडात गाजलेली स्वातंत्र्यवीरांची समुद्रात मारलेली उडी क्षणिक अपयश पदरात पाडती झाली. झाले! याही वेळी नियतीने राज्याभिषेकाच्या दिवशीच वनवास योजला होता. स्वातंत्र्यवीर मात्र मूलतःच मनाचे निग्रही असल्याकारणाने त्यांनी लागलीच त्यांच्या प्रतिकूल तेच बहुदा घडेल, या नियमास अनुसरून त्या समुद्री मार्गावर असतानाच मनाला आपल्या मूळ दिव्य स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी आणि पुढे होणार्या अनन्वित अत्याचारांना सोसण्यासाठी हा निराळा वज्रपंजर रचला. क्षणात ते शरीराचा उरला सुरला परिग्रह दूर करते झाले आणि गर्जले!
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥धृ॥
अनादि या शब्दाचा अर्थ आहे ज्याला आदि नाही असा तो. मूळ विश्वामागची शक्ती अर्थात तो परमेश्वर. त्याला आदि नाही, तो आजन्मा आहे. तोच अनंत आहे, म्हणजे त्यास अंतही नाही! त्याला जन्म नाही, म्हणून साहजिकच मृत्यू त्यास शिवत नाही. सावरकर ‘योगवाशिष्ठा’चा अभ्यास काराग़ृहात आरंभित त्यावेळी त्यातले श्लोक स्मृतींतून स्मरून अभ्यासताना, त्या चिंतनात त्यांच्या हातून सोडण (जे नारळापासून सोलून वेगळे करावे लागते असे ते) गळून पडे, इतके ते चिंतनात मग्न होत. मूळ अरुणाचल प्रांतात श्री सदाशिवांचा आदि आणि अंत जाणण्याचा खटाटोप, पूर्वी ब्रह्मदेव आणि श्री विष्णु यांनी केला होता. पण, त्यांना काही सांबाचा थांग लागला नाही. योगीजन हे असेच त्या मूळ शक्तीशी ऐक्य पावलेले असल्याकारणाने, त्यांच्यातील शिवतत्त्वच अशा संकटांच्या प्रसंगी देहातून गर्जना करीत असावे. त्यात तात्याराव सावरकरांचा व्यासंग! नावाप्रमाणेच ज्ञानमूर्ती विनायक! त्यांना लागलीच ‘योगवशिष्ठा’त हा श्लोक आहे तो स्मरला असावा.
मृत्यू न किंचित् शक्तः त्वमेको मारयितुं बलात्
मारणीयास्य कर्माणि तत् कर्त्रुणि इति नेतरत्!
(यो. वा. उत्पत्ती प्रकरण श्लो.10)
इथे यम स्वतःशी म्हणतो की, कुणालाही स्वतः एकट्याने मारण्यास तू समर्थ नाहीस. तू ज्याला मारतो, त्याची कर्मेच त्या मरणास कारणीभूत होत असतात. मग तात्याराव तर म्हणतात, “मला मारेल असा रिपु अजून जन्मालाच आला नाही.” हे कुठल्या कर्माच्या बळावर हो? हीच गोष्ट पुढेही ते ‘मरणोन्मुख शय्येवर’ या त्यांच्या कवितेत बोलून दाखवतात. तिथे तर ते मृत्यूला बोलावून सांगतात की, “ये मृत्यू ये, यावयाप्रति निघाला असशीलच जरी, यें तरी सुखें! मी असता दिवस नसे व्यर्थ गमविला, दिवसास्ताचे दुःख म्हणूनी ना मला भीती उद्याचीही ना.” प्रत्यही सत्याने वागून, त्या त्या कर्तव्यांची पूर्तता ते करीत आले होते. आजपर्यंत. त्यामुळे ते मृत्यूस भीत नव्हते. लहानपणापासूनच ते धर्मचरणी होते, किंबहुना हाच त्यांचा अट्टाहास होता. या मृत्यूस कारणीभूत ठरत असतो तो कर्माशय. म्हणून यमदेव पुढे चिंतन करताना त्या जीवाची जी कर्मे, त्यांचे अन्वेषण करण्यास स्वतःस बजावत आहेत.
कर्माणि अन्विष्य तेषां त्वम् सहाय्येनैन मत्स्यसि!
(यो. वा. उत्पत्ती प्रकरण श्लो. 11 उत्तरार्ध)
सावरकरांची कर्मे ही स्वतःसाठी कधीच नव्हती. त्यामुळे मृत्यूलाच कारण मिळेना. सावरकरांचे ज्ञान हेही मातृभूच्या उद्धारासाठीच होते. त्यांनी शारीरिक बळ जे प्राप्त केले होते, ते भारतमातेसाठी कष्ट सोसता यावेत म्हणून. पुढे असा छळ होऊ शकतो हे मनात योजूनच. त्यांनी केलेले जात्योच्छेदनाचे काम, भाषाशुद्धीचे काम, अस्पृश्यता निवारणाच्या कामी त्यांचे झटणे, हे सगळे पुरे राष्ट्रासाठीच तर होते. त्यांचे लेखन, कवित्व, त्यांचा विज्ञानवाद, त्यांची राजकारणाची जाण, मुत्सद्देगिरी या सगळ्या मागील हेतू राष्ट्र उद्धरून जावे हाच तर होता.
रत्नागिरीमध्ये तर स्वदेशी वस्तू लोकांनी घ्याव्यात, म्हणून ते दारोदार स्वदेशी वस्तूंचा प्रचार करीत फिरत. अशावेळी वैयक्तिक अपमान, स्वार्थ हा कधी त्यांना शिवला नाही. अहो कशाला! त्यांचे स्वतःचे भगूरचे घरही स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस सरकारने परत केले नाही, तरी सावरकर शांतच होते. ते म्हणाले, “सबंध स्वतंत्र हिंदुस्थानच माझे घर आहे. जो त्या भगूरच्या घरी राहात असेल, त्याने खुशाल तेथे राहावे.” इतके ते निर्व्याज झाले होते. संत तुकाराम म्हणतात, तसे उपकारापुरते उरले होते फक्त. काळजी होती मनात ती फक्त धर्माला कधी आपल्या आचरणामुळे बाधा येऊ नये हीच.” म्हणून
अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं!
या ओळीतला जईं हा शब्द मोरोपंत आपल्या आर्यांमध्ये असे शब्द वापरीत असत. त्याचा अर्थ आहे, ज्यावेळी किंवा जेव्हा. (उदा. कृपा करोनि धाडीला जईं मदीय बंधु स्वयें-मोकृष्ण 58.5) पूर्वीच्या काळी अशी भाषा खरोखरच प्रचलित असे. मात्र, आता मूळ भाषेचा अभ्यास करणेच बंद झाले आहे. म्हणून अशा या अद्वितीय साहित्यास नवीन पिढी दुरावतेे.
जेव्हा मी अट्टहास करीत म्हणजे मोठ्याने हसून, धर्मधारणीं, म्हणजेच धर्माच्या धारणेत मग्न होतो आणि मृत्यूशीच जणू गाठ घेण्यासाठी रणात घुसतो. थोडे थांबून याचा विचार करूया.
प्रत्येक क्षणी सार्वभौम व्रत घेतल्याप्रमाणे स्वार्थास कायमच दूर ठेवून, लोककल्याणाचा धर्म सतत धारण करणे, त्या कर्तव्यांचे सहज वहन करणे आणि एवढेच नव्हे, तर ते करताना मृत्यूससुद्धा न मोजणे, हेच धर्मधारण. जेव्हा शरीरावर अनेक जखमा झालेल्या अवस्थेतही बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखा वीर ‘तोफांचे वार जोवर कानी पडत नाहीत, तोपर्यंत मृत्यू अस्वीकार आहे,’ असे म्हणत उठतो, तेव्हा त्याचे हास्य असते ते एखाद्या नुकतीच आपली चिता पेटवून वनोगामी झालेल्या संन्याशासारखे. ते लाघव म्हणजे अट्टहास. या अट्टहासात कायमच एक स्वतः बद्दलचा विश्वास लपलेला असतो आणि तो विश्वास इतका दांडगा असतो की, शत्रूची बाजू युद्धात उजवी असूनही ते हास्य शत्रूचे हृदय भयाने विदीर्ण करते. त्या हास्यात एक दैवी प्रादुर्भाव असतो.
सुखात काजूच्या बिया चघळत, वेळ मिळाला तर देशकार्य करू म्हणत, मध्ये मध्ये जमले तर प्रकृती जपत, अनायसे जमेल तेवढेच करणार्यांना ही धर्मधारणा कळेल असे वाटत नाही. पूर्वीचे लोक हे असे पराक्रमी असत. सत्याने व कर्तव्य कठोरतेने वागल्यास त्यांच्याकडे इतकी पुण्याई (योगमार्गात त्यास ‘क्रियाफलआश्रयत्व’ असे नाव दिलेले आहे) साठलेली असे की, वेळप्रसंगी ते देवांना शापण्याससुद्धा कमी करत नसत. त्यांना कसली भीती? सावरकर इथे मृत्यूची जणू गाठ घ्यायला निघालेल्या वीरासारखे रणात घुसतात. पुढे याचनिमित्ताने बारी तुरुंगात जेव्हा सावरकरांना विचारतो की, “तुम्हाला येथून सुटण्याची संधी मिळाली, पळण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तसे कराल का?” त्यावेळी सावरकर उद्गारतात, “नक्कीच!” पण, “तुम्ही तर स्वतःहून कारावास स्वीकारलात ना? मग तो कशास?” तर त्यावेळी सावरकर म्हणतात, “ऋेी ीशरीेपी (कारणांमुळे)” आणि याच कारणांमध्ये ही धर्मधारणा लपलेली आहे. “अभिनव भारता’चा मी प्रमुख. फ्रान्समध्ये मी सुरक्षित आहे आणि लंडन किंवा भारतात गेलो, तर मला अटक होईल या भीतीने जर मी लपून राहिलो, तर मला जे पुढारी मानतात, तेही अशाच वृत्तीचे बनतील. पराक्रम शून्य बनतील. गीतेतल्या ‘यद् यद् आचरति श्रेष्ठः’ या उक्तीला बाध येऊन, तेही माझे अनुकरण करून निष्क्रिय बनतील. म्हणून मीच या प्रतिकूल काळास जगून, सोसून, कंठून, कष्टून दाखवीन आणि ज्या धर्माच्या जागरणासाठी हे मी केले, त्यासाठीच मी संधी मिळताच या कारागारातून सुटकेसाठी प्रयत्नही अवश्य करीन, विष्णुंची कूटनीती पत्करून. कारण, आताच्या काळाची ती आवश्यकता आहे.” शंकरांचा पूर्णत्वातून आलेला साधेपणा आणि विष्णुंची शुद्ध हेतूतून उद्भवलेली कूटनीती, याचा सुरेख संगम तात्यारावांमध्ये झालेला आपणास दिसतो. ही खरी धर्मधारिणी बुद्धी. अशा बुद्धीला आपल्या उपनिषदांमध्ये ‘अवक्त्रचेतस्’ असे संबोधन वापरले आहे. म्हणजे सरळमार्गी माणूस, असा जो वाकड्या बुद्धीचा नाही. ज्याचे चेतस्, ज्याच्या चेतनेने ऋजुता धारण केलेली आहे असा. उपनिषदे सांगतात की, “अशा खर्या मनाच्या आणि मनाने, वाचेने आणि कर्माने एक झालेल्या मनुष्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होत असतो, आत्मसाक्षात्कार होत असतो.” सावरकर आयुष्यभर एका योग्याचेच जीवन जगत होते. त्यामुळे धर्म आणि सत्याला बाध येऊ नये, यासाठी अशी तारेवरची कसरत ते करीत. खरोखरच आजच्या काळात राजकारण करतानासुद्धा धर्मबुद्धी जागृत कशी ठेवावी, हे त्यांच्याशिवाय अजून कोण शिकवणार आपल्याला? असो. तर अशी ही आचरणसक्ती! आणि असे आचरण केल्यामुळेच मी असा शुद्ध, अपापविद्ध असल्याकारणाने,
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो!
“अग्नि शुद्धतेस जाळू शकत नाही. ब्रह्मतत्त्वाला तो स्पर्शही करू शकत नाही,” असे केनोपनिषदात म्हटले आहे. सावरकर लहानपणापासूनच ‘आरण्यके’ वाचत असत. गीतेतले ‘नैनं छिन्दंतिआदि’ श्लोक तर त्याच्या मुखी सतत असत. वयाच्या अगदी पाचव्या-सहाव्या वर्षांपासून हे दृढतर वैराग्याचे संस्कार त्यांच्यात मुरले होते. त्यामुळे आता ते साहजिकच अधिक परिपक्व होऊन, मृत्यूला आव्हान देत होते आणि हे फक्त बोलाची कढी बोलाचा भात नाही बरं का. हे काव्य मुळातच त्या शत्रूच्या जहाजावर रचले गेले आहे. सावरकरांनी लहानपणापासूनच मृत्यूचे खांब गदागदा हलवले होते. अगदी ‘प्लेग’सारखा दुर्धर रोगही त्यांना काही करू शकला नव्हता. पुढे अंदमानात मलेरिया, कॉलरा आणि रक्ती अमांश हे तिन्ही रोग एकच वेळी होऊनही आणि औषधे न मिळूनही, मृत्यू त्यांना शिवला नव्हता. खरोखरच मृत्यू त्यांच्या पराक्रमापुढे आपली चिन्हे विसरून बसला की काय? अशी शंका येते. मृत्यूने ‘योगवाशिष्ठा’त जे परब्रह्मतत्त्वाबद्दल चिंतन केले आहे, ते सावरकरांना निश्चित स्मरले. तेच ते त्यांचे मूळ रूप. त्यांचे चित्त लागलीच प्रसन्नता पावले आणि वैराग्याचे बोध मनी उमटू लागले.
आकाशजस्य कर्माणि मृत्यो सन्ति न कानिचित्!
सहकारीणि नो सन्ति न कर्माण्यस्य कानिचित्।
(यो.वा. उत्पत्ती प्रकरण श्लो. 18 व 19 उत्तरार्ध)
या आकाशातच उत्पन्न झालेल्याला मृत्यू नाहीच. कारण, मृत्यूला साहाय्यभूत होऊ शकेल, असे यांचे मुळी कुठले कर्मच नाही. सगळीच कर्मे दिव्य. म्हणूनच ‘माझे मृत्युपत्र’मध्येही ते हेच लिहितात, “ना भंगली भिऊनिया धृती यातनांना। निष्काम कर्मरतीं योगही खंडीला ना।” अर्थात आता हे सारे कुठे संस्कृतीच्या बिगरीत असलेल्या पाश्चात्यांच्या पचनी पडणार? त्यांना काय यातले कळणार? ते खुळ्या देहाचा विचार करण्यात आणि भोगवादातच आयुष्य घालवणारे. मृत्यूचा सर्वार्थाने अभ्यास फक्त हिंदूंनी केला आहे. तो मृत्यू आम्ही बोलावले की येत असतो.
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ॥1॥
शत्रू हा इतका खुळा आहे की, त्याच मृत्यूला पुढे करून मला भिववू, घाबरवू पाहात आहे. शत्रूची अशी कीव करणारा हा आत्मविश्वास. सावरकर खरेच भीतीशून्य झाले होते. मृत्यूची भीती ही उत्क्रांती मुळी लुप्त होत असते. याला ‘योगशास्त्रा’मध्ये ‘जात्यंतर’ असा शब्द पतंजली यांनी योजला आहे. प्रकृतीच्या पूर्णत्वामुळे जीवाची उत्क्रांती होत असते. हे पूर्णत्व त्या त्या देहातल्या कर्मांची पूर्तता झाली की, होते. सावरकर प्रथमपासूनच काय कर्म करायचे आहे ते जाणून होते. खरोखरच प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्याच्या सार्थकतेचा विचार ते करीत असत. लहानपणी ज्यावेळी प्लेगची भीती पसरली होती, त्यावेळी आपला जर मृत्यू या प्लेगमुळे झाला, तर मरणोत्तरी ठेव म्हणून त्यांनी बालवयात लिहिलेले ‘दुर्गादास विजय’ नावाच्या ग्रंथाचे प्रकाशन आपल्या घरच्यांनी करावे, अशी सूचनाही त्यांनी देऊन ठेवली होती. का? तर इतकी वर्षे मनुष्यदेहात राहून काही ऋण फेडले नाहीत, असे कुणी म्हणायला नको म्हणून. कोवळ्या वयातच किती ते दिव्य विचार. कर्म, अकर्म आणि विकर्म यातला सूक्ष्म भेदही त्यांनी जाणला होता. म्हणूनच याच मृत्यूचे पाश म्हणजे हे अत्याचार ना? त्यांनाही मी भिणार नाही, असे ते म्हणत आहेत. कसे असतील ते होणारे अत्याचार?
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ॥2॥
सावरकरांच्या लेखाचे वा कवितांचे रसग्रहण म्हणा, स्पष्टीकरण म्हणा किंवा त्यांच्या कृतीची कारण मीमांसा म्हणा, हे सगळे करताना कितीही नाही म्हटले, तरी ‘योगशास्त्रा’च्या विधेयांचा आधार घेतल्याशिवाय ते शक्य होत नाही. एक जहाल आणि क्रांतीच्या वाटेवरून जाणारा हा योगी, ‘योगशास्त्रा’तल्या एक एक सूत्रांचे इथे प्रतिअस्त्र करून, शत्रूला त्याची असमर्थता दाखवून देत आहे.
अहिंसा प्रतिष्ठायां तत् संनिधौ वैरत्याग: (सा.पा.35)
अहिंसा ज्यामध्ये प्रतिष्ठित झाली, त्याच्याजवळ वैर त्यागले जाते. पूर्वीच्या ऋषींच्या आश्रमांजवळ सिंह आणि हरीण एकत्र नांदत आहेत, कोठे गाय आणि वाघ आपल्यातील वैर त्यागून शांत बसले आहेत, अशी वर्णने वाचायला मिळतात. हे कशामुळे, तर त्या ऋषींमुळे. त्यांच्यात अहिंसा इतकी मुरली की, त्यांच्या आकर्षण क्षेत्रात आल्याने हिंस्र जनावरेही आपला मूळ हिंसक स्वभाव त्यागती झाली. तद्वत् स्वातंत्र्यवीर इथे म्हणतात की, “शत्रू हे जे ब्रिटिश, त्यांनी मला हिंस्र अशा सिंहाच्या पिंजर्यात जरी टाकले, तरी एखाद्या नम्र दासासारखा तो माझी पदांगुळे चाटेल.” कारण, खरोखरीच त्यांच्यात अहिंसा पूर्णपणे मुरली होती. अंदमान येथे असताना तेथील बुलबुल पक्षी त्यांचे मित्र बनले होते, अशी आठवण त्यांनीच आत्मकथेत लिहून ठेवली आहे. क्रांतीचा मार्ग हा त्यांनी विवश होऊन पर्यायाने निवडला होता. याबद्दल सावरकर आपल्या एका लेखात लिहितात, “अपरिहार्य कारणांमुळे ही शल्यचिकित्सकाची सुरी हाती घ्यावी लागली. चिरकाल शाश्वत अशा कल्याणासाठी क्षणभराची निष्ठुरता पत्करावी लागली. आपल्या कार्यास, आपल्या उग्र क्रांतिकर्यास ते अशा दृष्टीने बघत असत. जसा एखादा शल्यचिकित्सक रोग बरे करण्यासाठी आवश्यक हिंसा करतो, त्याप्रमाणे कमीत कमी हिंसा करून जास्तीत जास्त अहिंसा ते साधू बघत. खरोखरच कर्माला इष्टता आणि अनिष्टता त्याच्या हेतूंमुळे येत असते. अशा निर्मळ हेतूंमुळे अग्नी हा अनुकूल होत असतो. तो सज्जनाला जाळीत नाही, तर देवहूः म्हणजे देवांना बोलावणारा होतो आणि योग्याभोवती सुरेखशी रांगोळीच जणू रचल्याप्रमाणे शोभतो. इथे शीत सुप्रभावली असे म्हणत अग्नीची शीतलता ते दर्शवत आहेत. योग्याच्या देहामध्ये अजिबात अशुद्धीचा अंशही नसला म्हणजे अग्नी त्यास जाळीत नाही, उलट शीतलता देतो. अशा शरीराला रुद्रामध्ये अपापकाशिनी असा शब्द वापरला आहे. श्री शंकराचा देह असा आहे असे म्हणतात. योगी लोकांचे देह हे कधी पाप घडून, प्रायश्चित्त घेऊन, पुण्यकर्मे करून क्रमशः शुद्धकाम बनलेले असतात. पण, शंकराचा देह हा असा. अपापकशिन्. ज्याच्याकडून पाप मुळी कधी घडलच नाही, असा देह. तात्याराव म्हणतात, “आण तुझे ते सैन्य, दाखव तुझे बळ. तुझी सगळी यंत्र, सगळी तंत्र इथे निष्प्रभावीच ठरणार आहेत. कारण,
स पूर्वेषां अपि गुरुः कालेन अन् अवच्छेदात्! (स.पा.26)
तो ईश्वर, पूर्वजांचासुद्धा गुरू आहे आणि कालाकडून ही त्याचा नाश होत नाही, अवच्छेद होत नाही. कालाकडूनही ज्याचा अवच्छेद होत नाही, त्याचे शत्रू काय बिघडवू शकणार आहे, कपाळ. त्याला वाटते आहे की, मी देह आहे. पण, खरोखरच कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे, मला देहरूपी समजणारा खरोखरच कीव करण्यास पात्र मात्र ठरला आहे. म्हणूनच ‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्’ असे व्यासांच्या थाटात म्हणत, स्वतःस शरीरापासून तात्याराव विलग करीत आहेत आणि तेवढ्यावरच न थांबता, शंकरांनी जसे देवांनाही भयप्रद असे हलाहल विष सहज कंठात धारण केले आणि तत्त्वतः पचवले, तसेच मी तुमच्या शस्त्र आणि अस्त्रांसकट तुम्हाला गिळून जिरवून टाकतो,” अशी गर्जना करीत आहेत.
खरोखरच स्वा. सावरकरांपुढे ब्रिटिशांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. जे आत्मबल त्यांनी या कवचमंत्राने प्राप्त केले ते अंदमानातली शिक्षाच नाही, पण पुढेसुद्धा जी असंख्य व्यवधाने नियतीने त्यांच्या पदरी लाधली, त्यांनाही पुरून उरले. अशा वृत्तीने जो मनुष्य आयुष्य जगतो, त्यास योगमार्गात ‘विषेशदर्शिन्’ किंवा ‘दीर्घदर्शिन्’ असे म्हटले गेले आहे. असे पुरुष हे वज्रासारखे कठोर असतात. संकटांमध्ये आणि स्वतःच्या आचरणाच्या बाबतीत आणि इतरांच्या चुकांबद्दल मात्र क्षमाशील असतात, कृपाळू असतात. असामान्य सहनशीलता त्यांच्यामध्ये दिसून येते. लोकांच्या कल्याणासाठी हलाहल पिण्याची आणि पचविण्याची त्यांची तयारी असते. स्वा. सावरकर हे असेच विशेष होते. वज्रांग होते. पुरुषविशेष होते. अशा “विशेषदर्शिनाच्या भावना आणि आत्मभाव हे विशेष रितीने निवृत्त झालेले असतात,” असे पतंजली म्हणतात.
विषेशदर्शिनः आत्मभावभावना विनिर्वृत्तिः।(कै.पा.25)
अथर्ववेदातल्या ज्ञानवृद्ध ब्रह्मर्षींनी जो मनाच्या बलवत्ततेस कारणीभूत ठरणारा उपाय अवलंबला, तोच उपाय जो कृष्णाने शिष्टाईच्या वेळेस अवलंबला, तोच उपाय, तीच गर्जना, तेजाची परंपरा आणि तीच देवांची तत्त्वे अनुसरीत 1920 सालच्या जुलै महिन्यात, फ्रान्सच्या समुद्री मार्गावर स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी केली. लेखाच्या शेवटी ‘शम्’ हा कल्याणकारक आणि शांत करणारा, शमविणारा म्हणून वापरला जातो. पण, हा अग्नी शमणारा नाही, तर शत्रूहंता आहे. शत्रूचा जो अहम्, त्यास चीत करून शमविणारा आहे. तो वाचकांना अशीच प्रेरणा देत राहो, ही इच्छा ईश्वराकडे व्यक्त करतो.
आदित्य विवेक शेंडे.
9834004346
(‘गांधर्वसूत्रम्’ आणि ‘यमाष्टकम्’चे लेखक)