“अहिल्यादेवींचे जीवनकार्य आजच्या युगातील स्त्रियांसाठी मार्गदर्शक”

रविवारी पार पडलेल्या इतिहास कट्टा कार्यक्रमात वक्ते रविराज पराडकर यांनी व्यक्त केला विश्वास

    22-Aug-2024
Total Views | 23
 
itihas katta
"शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा मराठेशाहीतच नव्हे तर सबंध भारतवर्षात सर्वार्थाने कुणी चालवला असेल, तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनीच " अशा शब्दांत इतिहास अभ्यासक व कार्यक्रमाचे प्रमुख रविराज पराडकर यांनी रविवारी १८ ऑगस्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटयसंकुलातील ज्ञानविहार ग्रंथालय येथे पार पडलेल्या ‘इतिहास कट्टा’ कार्यक्रमाच्या 'गोष्ट ती ची' या पर्वात अहिल्यादेवींचा गौरव केला. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त इतिहास कट्टयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात बोलताना रविराज म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनी इंदुर राज्याचा सर्वार्थाने विकास केला आणि होळकरशाहीच्या खाजगी मालमत्तेतून भारतभर मंदिरे, धर्मशाळा, वाडे, घाट, विहिरी, तलाव, अन्नछत्रे उभारून असंख्य धर्मकार्ये अहिल्याबाईंनी चालवली. वैयक्तिक जीवनातील दुःखांचे डोंगर पेलतानाही, कठोर आणि कर्तव्यदक्ष असणारी ही स्वामिनी गोरगरीबांसाठी पदरची पै न पै देऊन टाकणारी लोकमाता झाली. त्याकाळी भारतभराचे सर्व राजे आणि सत्ता स्वार्थी राजकारणाने बरबटलेल्या असताना, त्यांचा डामडौल, आपापसातील चढाओढ आणि ब्रिटीशांची फोडफोडी सुरु असताना आपल्या अजोड चारित्र्याने आणि सुशील स्वभावाने अहिल्यादेवींनी आपले राज्य अबाधित ठेवले. मराठेशाहीशी आणि छत्रपती-पेशवे यांच्याशी एकनिष्ठ राहून, अंगीभूत मुत्सुद्दी स्वभावाने त्यांनी आपल्याविरुद्ध झालेल्या प्रत्येक राजकारणाला तोडीस तोड उत्तर दिले. सुभेदार मल्हारराव आणि गौतमाबाई यांच्या तालमीत तयार झालेल्या अहिल्याबाईंनी आदर्श युद्धनीती, अर्थनीती, धर्मनीती आणि समाजोद्धारक राजनीतीचा वस्तुपाठ घालून दिला. उदात्त धोरणे, प्रशासन, शेती, व्यापार, उद्योग, कला-कौशल्य विकास, पाणीव्यवस्था, न्यायव्यवस्था, स्त्रीहक्क, परराज्यसंबंध, अशा नानाविध बाजूंनी त्यांनी आपल्या राज्यात सर्वदूर सुधारणा केल्या. मध्ययुगीन कालखंडातील सर्वांत यशस्वी राज्यकर्ती म्हणून इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. आजच्या युगातील प्रत्येक स्त्रीला त्यांच्या चरित्राच्या अभ्यासातून प्रेरणा मिळेल आणि स्त्रीशक्तीच्या अनेक आयामांतून सर्व क्षेत्रांत त्या अग्रेसर होतील , असा विश्वास श्री. पराडकर यांनी शेवटी व्यक्त केला.
 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठी रंगभूमीचे बोरीवलीतील ज्येष्ठ सिनेनाटय कलावंत श्री. नारायण जाधव आणि इतिहास कट्टयाची सह-आयोजक संस्था, बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे उपाध्यक्ष सुनील गणपुले, कार्यकारी समिती सदस्य संजीव राणे व कोंकण प्रांत समितीच्या महिला प्रमुख हेमा तन्ना व अन्य महिला सदस्यांच्या हस्ते, अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील गणपुले यांनी केले तर सौ. पूजा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी उपस्थित साऱ्या प्रेक्षकांनीही अहिल्याबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले आणि लोकमातेला भावांजली वाहिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121