विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोवळा॥
विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेला चाळाविश्व विठ्ठले॥
अशा या विश्वव्यापी विठ्ठलाची महती संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वर्णिली आहे. लेकुरवाळा विठ्ठल केवळ महाराष्ट्राचेच आराध्यदैवत नाही, तर देशभरात आणि सातासमुद्रापारही या विठुरायाच्या भक्तीची, वारकर्यांच्या अपरंपार श्रद्धेची भुरळ अनेक संशोधक-अभ्यासकांनाही पडली. खरं तर ‘विठ्ठल आणि विठ्ठलभक्ती’ या विषयावर आजवर विपुल वाङ्मयनिर्मिती झाली आणि अजूनही ही प्रक्रिया सुरुच आहे. याच विषयावर जवळपास 65 वर्षांहून अधिक काळ संशोधन आणि लेखन करणारे संतसाहित्याचे अभ्यासक वासुदेव लक्ष्मण मंजूळ. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशविदेशातील विठ्ठल माहात्म्याचे ज्ञात-अज्ञात पैलू उलगडणारी वा. ल. मंजूळ यांची ही विशेष मुलाखत..
मागील 65 वर्षांहून अधिक काळ तुम्ही संतसाहित्याचा अभ्यास करत आहात. तसेच, विठ्ठलभक्ती आणि संत साहित्याला वाहिलेली तुमची कित्येक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. एक हजाराहून अधिक संतांच्या हस्तलिखितांचा संग्रहदेखील तुम्ही केला आहे. तेव्हा, संतसाहित्याचे संशोधन, अभ्यासाची नेमकी कशी आणि कधी सुरुवात झाली?
माझा जन्म पंढरपूरचा. माझे वडील कीर्तनकार, नामवंत ज्योतिषी होते. त्यामुळे आमच्या घरातच विठ्ठलमंदिरात पुराण सांगण्याची परंपरा होती. पंढरपूरला भेट देणार्या लोकांना मी पंढरपूरविषयी आणि विठ्ठलाविषयी माहिती सांगायचो. त्यावेळी ती फक्त माहिती होती, ते काही संशोधन नव्हते. पुण्यातील ‘भांडारकर संशोधन संस्थे’च्या ग्रंथालयात मी 1959 साली नोकरीला लागलो आणि तेव्हापासून मी या विषयावरील अभ्यासाला, संशोधनाला सुरुवात केली. या अभ्यासावर, संशोधनावर आधारित माझी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
आयुष्यात एकदातरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तुमचा तर जन्म पंढरपूरचा. तुम्ही ते मंदिर जवळून पाहिले आहे, अभ्यासले आहे. तेव्हा, या मंदिराच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल?
मंदिराची जी पहिली पायरी आहे, ती ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखली जाते. संत नामदेवांनी तिथे समाधी घेतली होती. आतल्या बाजूला उजव्या हाताला सहा फूट उंचीचा हनुमान आहे. समर्थ रामदासांनी त्याची स्थापना केली आहे, असे म्हटले जाते. डाव्या बाजूला काही शिलालेख आहेत. त्यातला एक ‘84चा शिलालेख’ म्हणून ओळखला जातो. मंदिराला देणगी दिलेल्या 84 लोकांची नावे त्यावर कोरलेली आहेत. दक्षिणेला संत कान्होपात्रांची समाधी आहे. त्यावर तरटीचा वृक्ष लावला गेला आहे. मंदिराच्या दक्षिणेच्या दुसर्या बाजूला बाजीरावाची पडसाळी आहे. अशी या मंदिराची खास रचना आहे.
विठ्ठलभक्तीवर आधारित विपुल वाङ्मयनिर्मिती शतकानुशतके झाली आहे. तरीही विठ्ठलभक्तीची ही समृद्ध परंपरा नेमकी किती जुनी आहे?
विठ्ठलभक्तीची परंपरा फार जुनी आहे. यावर आधारित ‘पांडुरंगाष्टक’ हा शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ हा साधारण आठव्या शतकातील आहे. इसवीसन 516 मध्ये अभिदेव नावाचा कन्नड राजा होऊन गेला या राजाने विठ्ठलपूजेसाठी तीन जमिनी दिल्याचा पुरावा ताम्रपटामध्ये आढळतो. त्यावरून ही परंपरा फार जुनी आहे, हे समजते.
मराठी आणि संस्कृत भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमध्येही विठ्ठलमाहात्म्य लिहिले गेले. याविषयी तुम्ही तुमच्या काही लेखांमध्येही मांडले आहे, तर नेमक्या कोणकोणत्या भाषांमध्ये विठ्ठलमाहात्म्य शब्दबद्ध करण्यात आले आहे?
मराठीव्यतिरिक्त संस्कृत, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये विठ्ठलमाहात्म्य लिहिले गेले आहे. मराठी आणि संस्कृतमध्ये तर अनेकांनी लेखन केले आहे. तेलुगूमध्ये तेनालीराम आणि कन्नडमध्ये कवी हरीदास यांसारख्या मंडळींनी विठ्ठलमाहात्म्य लिहिलेले आहे. अनेक पाश्चात्य भाषांमध्ये त्यांचे अनुवादही होत आहेत.
विविध भाषांमध्ये विठ्ठलमाहात्म्य लिहिले गेले. म्हणजे विठ्ठलभक्ती कोणत्या ना कोणत्या रुपात विविध भाषांच्या माध्यमातून कानाकोपर्यात पोहोचली. मग या सगळ्या भागांमध्ये विठ्ठल कसा पोहोचला आणि तिथे त्याचे स्वरुप कसे आहे?
दक्षिणेत अनेक ठिकाणी विठ्ठलाची पूजा केली जाते. विठ्ठल आणि बालाजी हे एकच आहेत, असे तिथले लोक मानतात त्यामुळे दक्षिणेकडील लोकांची विठ्ठलावर श्रद्धा आहे. त्याशिवाय, उत्तर भारतातील हृषिकेश या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर आहे. त्या मंदिरात मराठी पुजारीही आहेत. विठ्ठल तिथे कसा पोहोचला, हे कोणाला सांगता आले नाही. पण, कदाचित भक्तांनीच ती मूर्ती तिथे स्थापन केली असावी. महाराष्ट्रातील लोक जेव्हा त्या ठिकाणी जातात, तेव्हा ते आवर्जून त्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतात.
विठ्ठलभक्तीची संपन्न परंपरा आज इतकी वर्षे उलटूनसुद्धा अविरतपणे सुरू आहे. तेव्हा ही परंपरा टिकून राहाण्यामागे नेमके काय कारण आहे, असे तुम्हाला वाटते?
याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना विठ्ठलाविषयी वाटणारे प्रेम. विठ्ठल ही लोकदेवता आहे. सर्वसामान्यांना तो आपला देव वाटतो. याच कारणामुळे ही परंपरा आजही तशीच टिकून आहे. फक्त आपल्या राज्यातील आणि इतर राज्यांतील लोकांनाच नाही, तर परदेशातील लोकांनाही या परंपरेने आकर्षित केले आहे. अनेक परदेशी अभ्यासक आणि संशोधकांचा विठ्ठलभक्ती आणि विठ्ठलपरंपरा हा आवडीचा विषय. त्यासाठी ते खास भारतात येऊन याचा अभ्यास करतात आणि वारीत सहभागीही होतात.
तुम्ही परेदशी अभ्यासक आणि संशोधकांचा उल्लेख केला. तर, आजवर किती आणि कोणत्या परेदशी अभ्यासकांनी या विषयाचा अभ्यास केला आहे? काही ठळक नावे सांगता येतील का?
डॉ. शालौत या फ्रान्सच्या अभ्यासिकेने ज्ञानेश्वरांच्या हरीपाठाची चिकित्सक आवृत्ती फ्रेंचमधून प्रकाशित केली आहे. लंडनचे अभ्यासक डॉ. रिसाईड यांनी पांडुरंग माहात्म्याचा बराच अभ्यास केला आहे. अमेरिकेचे अभ्यासक जॉन स्टॅन्ले यांनी ‘दि पंढरपूर पिलग्रिमेज’ आणि ‘रिच्युअल अॅण्ड प्रोसेसेस’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध वाचले आहेत. डेन्मार्कचे प्राध्यापक एरिक सॅण्ड यांनी दोनवेळा पायी वारी केली आहे. जपानी प्राध्यापक इवावो शिमा यांनी ज्ञानेश्वरीचे जपानी भाषेत भाषांतर केले आहे. अमेरिकेचे प्राध्यापक फिलिप एम्ब्लॉम यांनी ‘वारी’ या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. रशियाच्या अभ्यासक इरिता ग्लुश्कोवा यांनी संत तुकारामांविषयी अभ्यास करून त्यांच्या अभंगांचे रशियन भाषेत भाषांतर, रुपांतरण केले आहे. कॅथरिना नावाच्या जर्मन संशोधक आहेत, ज्या दरवर्षी पुण्यात येतात आणि आळंदी ते पुणे वारीत सहभागी होतात. ही व अशी अनेक नावे आहेत ज्यांना विठ्ठलभक्तीने आणि या परंपरेने आकर्षित केले आहे.
वा. ल. मंजूळ यांची साहित्यसंपदा
वा. ल. मंजूळ यांनी सुमारे 25 ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. तसेच, त्यांची ‘कथा पांडुरंगाच्या’, ‘कथा - संत-पंथ दैवताच्या’, ‘पंढरपूरच्या अलक्षित कथा’, ‘संत चोखामेळा विविध दर्शन’, ‘आपली संस्कृती’, ‘चाणक्यनीती’, ‘म्हणी सांगती कहाणी’, ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव - जीवन आणि कार्य’, ‘देशोदेशीच्या लोककथा’, ‘नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा’, ‘डॉ. ह. वि. सरदेसाई आत्मकथन आणि त्यांची निदानशैली’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
दिपाली कानसे