ऋतुसंधिकाल आणि आहार-विहार नियोजन

    24-Jun-2024
Total Views | 174
hrutusandhikal diet plan


आज कडक ऊन, उद्या धो धो पाऊस... सध्याच्या वातावरणाची ही अशी मनकवडी स्थित्यंतरे. पण म्हणतात ना, ऋतूही बघता बघता आपली कूस बदलत जातो. अशा या ऋतूबदलांचा मानवी आरोग्यावरही साहजिकच परिणाम जाणवतो. त्यामुळे ऋतूबदलातील स्थित्यंतराचा काळ म्हणजेच ऋतुसंधिकालात, आपल्या शरीरातही बरेच बदल होत असतात. त्यानुसार आहार-विहाराचे नियोजन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...

भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे जरी ढोबळमानाने तीन ऋतू. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत दोन-दोन महिन्यांचे मिळून एकेक ऋतू असतो. या ऋतूनुसार शरीरातील तिन्ही दोषांची स्थिती बदलत असते. त्याचबरोबर जठराग्नी, शरीराचे बळ, व्याधिक्षमता या गोष्टीही बदलतात. जरी हल्ली कधीही पाऊस पडत असला तरी तो पावसाळा नव्हे, तसेच 12 महिने उकडतंय म्हणणारे असले तरी उन्हाळा मात्र केवळ ठरावीक कालावधीचाच असतो. इंग्रजी महिने आणि भारतीय तिथी या दरवेळेस सारख्या येत नाहीत. तरी ढोबळमानाने मार्च ते मे असे दोन महिने ग्रीष्माचे असे म्हणण्यास हरकत नाही.

प्रत्येक ऋतूतील आपली दिनचर्चा वेगवेगळी असते. उदा. पावसाळ्यात उन्हाळ्यापेक्षा तहान कमी लागते. थंडीत भूक इतर ऋतूंपेक्षा थोडी जास्तच लागते. या शरीरातील बदलांकडे सांकेतिक म्हणून बघणे गरजेचे आहे. अग्नी (जठराग्नी) उत्तम असण्याचे द्योतक म्हणजे भूक अधिक लागणे, जास्त खाणे आणि खाल्लेले पचणे शरीरातील हे बदल त्रिदोषांवर वात-पित्त-कफावर अवलंबून आहेत. ऋतू बदलताना दोन ऋतूंमधील काही दिवस, म्हणजे जाणार्‍या ऋतूतील शेवटचे दिवस आणि येणार्‍या ऋतूतील सुरुवातीचे दिवस हे फार महत्त्वाचे असतात. कारण, हा ‘ट्रान्झिशन पीरिएड’ आहे. एका ऋतूतून अलगद पुढील बदलाचे संकेत या दिवसांमध्ये दिसतात.

या ‘ट्रान्झिशन पीरिएड’चा अवधी 15 दिवसांचा असतो. यालाच ‘ऋतुसंधिकाल’ म्हणतात. हल्लीच्या ट्रान्झिशनमधील एक उदाहरण बघूयात. मे महिन्याच्या शेवटाला व जूनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बर्‍याच रुग्णांमध्ये पोटाच्या तक्रारी सुरु झाल्या. कोणाला पोट फुगण्याचा त्रास सुरु झाला, कोणाकोणामध्ये शौचास साफ होईना, पोट, गुरगुरणे इ. लक्षणे उत्पन्न झाली. तीच दिनचर्या, तरी तक्रारी सुरु झाल्या. याचे कारण शरीरात बदलत असलेली दोषांची स्थिती होय.

प्रत्येक ऋतूतील वैशिष्ट्य असते. जसे वसंत ऋतूमध्ये नवनिर्मिती निसर्गात अधिक दिसून येते, फुलं बहरणे, नवीन पालवी फुटणे इ. ग्रीष्म ऋतूत उकाडा वाढतो. पण, सिझनल विशेषतः आंबा, फणस इ. याच ऋतूमध्ये येतात. रानफळ- बोर-करवंदं इ. याच ऋतूत येतात. वर्षा ऋतूमध्ये तर विविध रानभाज्यांचा मोसम असतो. या रानभाज्या प्रामुख्याने तुरट चवीच्या असतात. काही भाज्या आंबट असतात. या ऋतूमध्ये वर्षावाताची वृद्धी स्वाभाविक होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातील व दिनचर्येतील बदल अपेक्षित आहेत. या भाज्या त्यातीलच एक भाग आहे.

याचप्रकारे सर्व ऋतू एकानंतर एक येतात आणि प्रत्येक दोन ऋतूंमध्ये ऋतुसंधिकाल असतो. आपल्या आताच्या ऋतुसंधिकालाबद्दल थोडे विस्तृत जाणून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता वाढते, शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी अतिघाम येतो. उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये तळी-तलावांमधील पाणी आटते, विहिरी कोरड्या होतात. ग्रीष्म ऋतूतील वाहणारा वारा खूप गरम असतो. आल्हाददायी अजिबात नसतो. उन्हाळ्यात जसा बर्फ वितळतो, तसेच काहीसे शरीरातील कफाचे होते. बरेच रुग्ण सांगतात नाकावाटे-तोंडावाटे कफ पडू लागला आहे, पण सर्दीचा त्रास होत नाहीये. याचे कारण म्हणजे, शरीरात आधीपासून साठलेला कफ उन्हाच्या तीव्रतेमुळे वितळू लागतो आणि बाहेर पडू लागतो. याच कारणामुळे वसंत ऋतूत कफाच्या त्रासांपासून सुटका व्हावी, या उद्देशाने पंचकर्मातील ‘वमन’ हे कर्म सर्वांनी करुन घ्यावे, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.

पंचकर्म म्हणजे शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या दोषांचे शरीराबाहेर निष्कासन. विशिष्ट ऋतूंमध्ये दोषांची वाढ होते (प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कुठलीही प्रकृती असली तरी) ती वाढ रोगनिर्मिती करते, ते टाळण्यासाठी त्या त्या ऋतूमध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन, वर्षा ऋतूमध्ये बस्ती आणि शरद ऋतूमध्ये विरेचन व रक्तमोक्षण करून घ्यावे. हा जो नियम आहे, तो व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने सांगितला आहे. रुग्णांसाठी ऋतुसापेक्ष पंचकर्माची अट लागू होत नाही. जसा जेव्हा त्रास असेल, तसे शरीरातील रुग्णांची दोषस्थिती समजून घेऊन पंचकर्म करावे. पण, पंचकर्म हे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. बरेचदा रुग्ण षटक्रिया (वमन, नेति, नौली इ.) योगातील शुद्धी शिकून दररोज घरी करतात. पण, या क्रियांमधून होणारे संशोधन आणि पंचकर्मातील शोधन भिन्न आहे, ते घरच्या घरी किंवा वैद्य इतर व्यक्तींकडून करवून घेऊ नये.

ग्रीष्म ऋतूमध्ये तहान अधिक लागते. म्हणून, स्वाभाविकतः भूक मंदावते. अशा वेळेस तहान शमेल, शरीरातील वाढलेली उष्णता कमी होईल, यासाठी आंबट फळांचा रस/सरबत जसे की, लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत इ. प्यावे. भूक मंदावणे म्हणजे पचनशक्ती पण मंदावलेली असते. अशा वेळेस पचायला जड आहार घेऊ नये. खूप तेलकट, तिखट, चमचमीत अन्न टाळावे. जसा आहारातील बदल करतो तसेच या दिवसांमध्ये उन्हात दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत जाणे टाळावे. अतिकष्ट, अतिव्यायाम चिडचिड, त्रागा करू नये. सुती कपडे, हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. मद्यपान टाळावे. व्यायाम, मद्य, कष्ट याने घाम येतो. या ऋतूमध्ये असाही घाम अधिक असतोच. तो वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

वषार्र् ऋतूमध्ये आकाशात ढग भरू लागतात. निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरते. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू होतो. तापमानात फरक पडतो. नदी-विहिरी-तलाव दुथडी भरून वाहू लागतात. जसे सृष्टीत बदल होतात, तसेच शरीरातील दोषांची स्थितीही बदलते. या ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो. पित्त दोषाचा संचय साठवणूक सुरू होते. प्रत्येक दोष तीन अवस्थांमधून जातो-संचय (म्हणजे शरीरात साठवणूक), प्रकोप-म्हणजे अति वाढ. या स्थितीमध्ये त्या दोषांचे शरीरातून निर्हरण, निष्कासन जर केले नाही किंवा त्यांना समस्थितीत आणले नाही, तर पुढे जाऊन व्याधी उत्पन्न करतात. प्रकोपानंतर जर दोषांची चिकित्सा केली, तर दोष प्रथम पावतात- ते समस्थितीत राहतात आणि व्याधी उत्पन्न करण्याची क्षमता त्यांच्यात उरत नाही. पण, जर प्रकोप अवस्थेत दोषांची चिकित्सा केली नाही, तर त्या दोषाचा शरीरात प्रसर होतो आणि ज्या स्थानी ते पसरतात, तिथे रोग उत्पन्न करतात.
 
प्रकृतिनुरुप दोषांनी होणार्‍या त्रासांची तीव्रता कमी- अधिक बदलते. पण, त्रास मात्र होतोच.

वर्षा ऋतूमध्ये पचनशक्ती अधिक मंदावलेली असते. व्याधिक्षमता (जी ऋतुनुरूप बदलते) ती पण सगळ्यात कमी होते. म्हणून आजारी पडण्याचे प्रमाण या ऋतूत सगळ्यात अधिक असते. वाताच्या प्रकोपामुळे जठराग्नी कधी खूप चांगला असतो, तोे मंदावलेला असतो. पण, भूक जरी लागत असली, तरी खाल्लेले पचविणे नीट होत नाही. त्यामुळे या ऋतूमध्ये पचायला हलके, भाजके पदार्थ खावेत. पाणीही उकळून प्यावे.

ग्रीष्म ऋतू आणि वर्षा ऋतूमधील दोषांची स्थिती वेगवेगळी आहे, हवामान भिन्न आहे. त्यामुळे ट्रान्झिशन-बदलदेखील हळूहळू करणे गरजेचे आहे. ग्रीष्मातील दिनचर्या हळूहळू कमी करत वर्षातील दिनचर्या अवलंबावी. उदा: पाण्याचे/सरबताचे प्रमाण हळूहळू कमी ठरत जावे. पाणी उकळलेले प्यायला सुरू करावे. इ. यानुसार केल्यास ऋतूबदलाचा त्रास होत नाही.

वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
vaidyakirti.deo@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121