भारताच्या अस्मितेचे प्रतीक भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

    20-Mar-2024
Total Views | 642
 National Calendar

आज १ सौर चैत्र १९४६. आजपासून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा नव्या वर्षाची सुरुवात होते आहे. ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे.पण, भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यानिमित्ताने या दिनदर्शिकेचे महत्त्व विशद करणारा हा लेख...

'कलनात् सर्वभूतानां स: काल: इति परिकीर्तितः।’ अर्थात, या विश्वात उत्पन्न प्रत्येक गोष्टीची, भूतमात्रांची जो न थांबता गणना करतो तो काळ, अशी काळाची व्याख्या भारतीय परंपरेत केलेली आढळते. भारतातदेखील अगदी वैदिक काळापासूनच अचूक अशा कालगणनेचा उपयोग झाल्याचे आढळते. वैदिक काळात सूर्याचा वसंत संपात बिंदू हा वर्षारंभ मानला जात असावा, तर वेदांग ज्योतिष कालखंडात माघ शुद्ध प्रतिपदा हा पंचवार्षिक युगातील पहिल्या वर्षाचा आरंभ दिन होता.भारताच्या बहुआयामी संस्कृतीचे प्रतिबिंब भारतीय कालगणनेत उमटल्याचे आढळते. देशात जशी भाषा, वेशभूषा, खानपान यांच्यात विविधता आहे, अगदी तशीच कालगणनेतदेखील आहे. शुद्ध सौर/चांद्र-सौर, सायन/निरयन, अमान्त/ पौर्णिमान्त अशा प्रकारच्या आणि यांच्या मिश्रणातून बनणार्‍या अनेक कालगणना आपल्या इथे अगदी प्राचीन काळापासून प्रचलनात आहेत. पण, तरीही ‘विविधतेत एकता’ या भारतीय संस्कृतीच्या सूत्राप्रमाणे सगळ्या भारतात सणउत्सव एकाच दिवशी साजरे होत आहेत.

कालगणना ही फक्त व्यवहाराची गरज उरत नाही,तर राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीकदेखील ठरते. दिग्विजयानंतर भव्य साम्राज्य स्थापन होते, तेव्हा अधिकारदर्शक काही प्रतीके अंगीकारली जातात. राज्याचे चलन, राजमुद्रा, ध्वज याचबरोबर नवीन कालगणनेचा आरंभ करणे हे सार्वभौमत्व दर्शवते.असा शककर्ता सम्राट स्वतःच्या नावाने नवा शक सुरू करून इतिहासाच्या पानांवर आपले नाव अजरामर करतो. स्मृतीकारांच्या मते, युधिष्ठिर, विक्रम, शालिवाहन, विजयाभिनंदन, नागार्जुन आणि कल्की हे कलियुगातील सहा शककर्ते आहेत.ऐतिहासिकदृष्ट्या मौर्य, सातवाहन, गुप्त अशा अनेक भारतीय राजवटींनी आपले संवत सुरू केल्याचे आढळते.शिवाजी महाराजांनी पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्येष्ठ त्रयोदशी शके १५९६, (६ जून १६७४) या मंगलदिनी राज्याभिषेक होऊन शिवराय ‘छत्रपती’ झाले. ‘शिवराई’ हे चलन, जरीपटका हा ध्वज, राजमुद्रा अशी हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची प्रतीके झाली. याचबरोबर ‘शिवराज्याभिषेक शक’ या नव्या कालगणनेचा करून शिवाजी महाराज शककर्ते झाले.स्वराज्याची प्रशासकीय पत्रे, दानपत्रे, इनामपत्रे अशा सर्व व्यवहारात जुन्या परकीय कालगणांचा वापर थांबून शिवराज्याभिषेक शकाचा वापर सुरू झाला.

पंचांगशुद्धीसाठी कृष्ण दैवज्ञ या खगोलतज्ज्ञाकडून त्यांनी ’करणकौस्तुभ’ ग्रंथाचे लेखन करून घेतले. स्वदेशी आणि अचूक कालगणनेसाठी आग्रह धरणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील अनेक राज्यकर्त्यांमध्ये सर्वार्थाने वेगळे ठरतात.
पुढे इंग्रजांसोबत ग्रेगेरियन कालगणनेचा भारतातप्रवेश झाला. ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात प्रशासकीय सोयीसाठी संपूर्ण भारतभर ही कालगणना प्रचलनात आणली गेली. दि. १५ ऑगस्ट, १९४७ला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची पहाट झाली. पण, कालगणना मात्र अजूनही परकीयच राहिली. याच धर्तीवर देशाची एखादी राष्ट्रीय कालगणना असावी, असा विचार पुढे आला. १९५२ मध्ये भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि प्राद्यौगिक अनुसंधान परिषदेने प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅलेंडर पुनरर्चना समिती स्थापन केली. भारतात प्रचलित सर्व कालगणना पद्धतींचा अभ्यास करणे आणि सर्वांना समान वाटेल, व्यवहारात वापरणे शक्य होईल, अशी शास्त्रीय कालगणना सुचवणे हा या समितीचा उद्देश होता. समितीने भारतातील विविध पंचांगांचा सखोल अभ्यास केला.

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात ‘शालिवाहन संवत’ आणि बहुतांश उत्तर भारतात ‘चैत्रादी विक्रम संवत’ प्रचलित आहे. या दोन्ही चांद्र-सौर कालगणना आहेत, पण यात महिन्याचा आरंभ दक्षिणेत अमांत, तर उत्तरेत पौर्णिमांत आहे. यांचा वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला होतो. पण, गुजरात प्रांतात प्रचलित अमांत विक्रम कालगणनेचा आरंभ दिन कार्तिक शुद्ध प्रतिपदा असतो. पंजाब, तामिळनाडू, ओडिशा, बंगाल इथे प्रचलित सायन सौरपंचांगांचा आरंभ दिन सूर्याने निरयन मेष राशीत प्रवेश केल्यावर म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार दि. १४ एप्रिलला असतो. इस्लामी आक्रमणानंतर शेतीसाठी प्रचलित फसली, शुहूर अशा कालगणनांत सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश ही वर्षाची सुरुवात मानली जात होती.या समितीने सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल दि. १४ सप्टेंबर, १९५४ ला परिषदेला सोपवला. या अहवालात नमूद केलेली सौर दिनदर्शिका भारत सरकारने स्वीकारली. दि. २२ मार्च, १९५७ या दिवसापासून सार्वभौम भारताच्या संसदेने कायद्याद्वारे या दिनदर्शिकेला ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ म्हणून अधिकृतपणे स्वीकारले. १ सौर चैत्र म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार २२ मार्चला सुरू होणारी भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका भारत देशाची आणि पर्यायाने सगळ्या भारतीयांची अधिकृत ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ झाली.
 
भारत सरकारचे सगळे व्यवहार, संसदेचे कामकाज, भारतीय राजपत्र, राष्ट्रपती, पंतप्रधान आदींचे पत्रव्यवहार हे सर्व काही तांत्रिकदृष्ट्या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे चालते. दूरदर्शन, आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या यातदेखीलहिचा उल्लेख केला जातो. ‘राष्ट्रीय सौर दिनांक’ चेकवर लिहिणे ग्राह्य आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार केले जाणारे सर्व आर्थिक व्यवहार ग्राह्य धरावे, अशा स्पष्ट सूचना ‘रिझर्व्ह बँके’ने सर्व बँकांना दिल्या आहेत.राष्ट्रीय दिनदर्शिका ही ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे, शुद्ध सौर सायन कालगणना आहे. म्हणजेच पंचांगाप्रमाणे यात चंद्राच्या कलांचा उपयोग केला गेला नाही. त्यामुळे यात प्रतिपदा, द्वितीया अशा तिथी नसून १ ते ३१ असे दिनांक आहे. तसेच यात अधिकमासदेखील नाही. भारतीय कालमापनात सूर्योदय हा दिवसाचा प्रारंभ मानला जातो. पण, भारतासारख्या खंडप्राय देशात पूर्वोत्तर आणि पश्चिमेत्तर प्रदेशात सूर्योदयाच्या वेळात तब्बल दोन तासांचा फरक असू शकतो. त्यामुळे व्यावहारिक सोयीसाठी राष्ट्रीय दिनदर्शिकेत भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता दिवसाची सुरुवात मानली गेली आहे. वर्ष हे सांपातिक असून वर्षात ३६५.२४२२ दिवस आहेत. यात वर्षमापनासाठी शालिवाहन शक घेतला गेला आहे. वर्षमान जरी सौर असले तरी यात महिन्यांची नावे मात्र चैत्र, वैशाख अशी चांद्रमासांची ठेवली आहे. मार्गशीर्षाचे नाव यात ‘अग्रहायण’ असे आहे. पारंपरिक चैत्र -वैशाख या नावांशी साधर्म्य होऊन गोंधळ होऊ नये म्हणून राष्ट्रीय दिनदर्शिकेतील महिन्यांना सौर चैत्र, सौर वैशाख असे म्हणत येऊ शकेल.

१ सौर चैत्र म्हणजे ग्रेगेरियन दिनदर्शिकेसुसार दि. २२ मार्च हा वर्षारंभाचा दिवस आहे. वैशाख ते भाद्रपद या सलग पाच महिन्यांचे ३१ दिवस, तर उर्वरित सात महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवस असतात.वर्ष हे ३६५ दिवस, पाच तास, ४८ मिनिटे, ४५ सेकंद असल्याने अतिरिक्त साधारण सहा तास चार वर्षांत २४ तास म्हणजे एका दिवसाएवढे होतात.त्यामुळे ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे यातदेखील दर चार वर्षांनी हा अधिकचा एक दिवस घेऊन समायोजन केले जाते. व्यावहारिक सोयीसाठी जे ग्रेगेरियन वर्ष लिपवर्ष असते, त्या वर्षात राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षारंभ २२ मार्चऐवजी २१ मार्चला घेतला जातो. दोन्ही सौर कालगणना असल्याने राष्ट्रीय दिनदर्शिका आणि ग्रेगेरियन दिनदर्शिका यांच्यातील दिवसांची जोडी कायम राहते. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट हा २४, सौर श्रावण या दिवशी येतो, तर प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी हा ६, सौर माघ या दिवशी येतो.भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित कालगणना आहे. ग्रेगेरियन दिनदर्शिकेत वर्षात १ जानेवारीला घेण्यात कुठलाही खगोलीय आधार नाही.

राष्ट्रीय दिनदर्शिकेत नवीन वर्षाची सुरुवात १, सौर चैत्र म्हणजे वसंत संपात दिनी होते. या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. यानंतर तीन महिन्यांनी १, सौर आषाढ सूर्य कर्कवृत्तावर दिसत असताना दक्षिणायन सुरू होते.पुढे शरद संपात दिनी सहा महिने पूर्ण होऊन १, सौर अश्विन येतो. यावेळी पुन्हा दिवस-रात्र समान असतात, तर २२ डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन १, सौर पौष येतो. अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे. या दिनदर्शिकेत महिन्याचे दिवस ३०/३१ घ्यायलादेखील शास्त्रीय आधार आहे. तसेच यात ऋतुचक्राशी सांगड उत्तमरित्या घातली गेली आहे.राष्ट्रीय दिनदर्शिका अंगीकारल्यापासून सरकारी पातळीवरदेखील हिचा प्रचार-प्रसार होण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. परिणामी, सामान्य जनतेच्या व्यवहारातदेखील ही दिनदर्शिका येऊ शकली नाही. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या व्यवहारात वापर तर दूरची गोष्ट, पण अशी कुठली दिनदर्शिका अस्तित्वात आहे, हेच मुळात बहुतांश भारतीयांना माहीत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. राष्ट्रीय दिनदर्शिकेतील काही त्रुटीदेखील याला काही प्रमाणात कारणीभूत ठरल्या, असे म्हणता येईल.वर्षमापनासाठी शालिवाहन शक घेतल्यामुळे विक्रम शक मानणार्‍या उत्तर भारतात यामुळे काहीसा नाराजीचा सूर दिसतो.

महिन्यांची नावे पारंपरिक चैत्र-वैशाख अशीच ठेवल्याने सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो. तसेच व्यवहारात ग्रेगेरियन दिनदर्शिका आणि धार्मिक कार्यासाठी प्रादेशिक पंचांगे असताना अजून एक तिसरी कालगणना कशाला हवी, हादेखील सूर आढळतो.या अडचणी असल्या तरीही भारतीय संसदेने स्वीकारलेल्या आणि आपल्या राष्ट्राची अधिकृत दिनदर्शिका असलेल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा उपयोग आणि प्रचार-प्रसार करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही. ‘राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंच’, ‘शिवमुद्रांकन’सारख्या अनेक संघटना अनेक वर्षांपासून याच प्रयत्नात आहेत. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या प्रचारातील अडचणी दूर होण्यासाठी अनेक संघटनांकडून उपायदेखील सुचवले गेले आहेत. शालिवाहन किंवा विक्रम संवतऐवजी त्यापेक्षाही जून असणारे कलियुगाब्द वापरले गेले, तर बरेच विवाद संपू शकतील. तसेच भारतीय कालगणना पद्धती प्राचीन आहे, हेदेखील आपसूकच दर्शवले जाईल. चांद्र महिन्याच्या नावांऐवजी महिन्यांना इतर काही वेगळी नावे देऊन जनसामान्यांच्या होणार गोंधळ टाळता येऊ शकेल. वैदिक कालखंडातील महिन्यांची मधु, माधव, शुक, शुची, नभ, नभस्य अशी ऋतुनिदर्शक नावे कदाचित यासाठी आदर्श ठरतील.

अर्थात, यासाठी जनसामन्यांनी ही मागणी करून भारतीय संसदेला अशी सुधारणा करावी लागेल.पण, तोपर्यंत दैनंदिन व्यवहारात या दिनदर्शिकेचा प्रचार व्हावा, यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. ही दिनदर्शिका घरात लावणे, जिथे जिथे इंग्रजी तारीख लिहितो तिथे सौर दिनांकसुद्धा लिहिणे, चेक, निमंत्रण, लग्नपत्रिका वगैरे सगळ्या दैनंदिन व्यवहारात वापर करणे अशा सोप्या उपायातून हे कार्य घडू शकेल. अनेक संघटनांकडून राष्ट्रीय दिनदर्शिका, दैनंदिनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.आलोक मांडवगणे या तरुणाने बनवलेले ’खपवळरप छरींळेपरश्र उरश्रशपवरी’ हे सोपे अ‍ॅप गुगल प्लेस्टोरवर निशुल्क उपलब्ध आहे. या विविध माध्यमातून रोजचा सौर दिनांक सहज कळू शकेल.आज १, सौर चैत्र १९४६. आजपासून नव्या राष्ट्रीय वर्षाची सुरुवात होते आहे. सर्व भारतीयांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वदेशी आणि अचूक कालगणनेसाठी आग्रही असणार्‍या शककर्ते शिवरायांनी आरंभ केलेल्या शिवराज्याभिषेक शकाला ३५० वर्षे पूर्ण झाली असताना याच उद्देशांना पूर्ण करणारी स्वतंत्र सार्वभौम भारताची ही राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात रुजावी ही सदिच्छा !


विनय जोशी

(लेखक खगोलशास्त्र अभ्यासक आहेत.)

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121