‘एआय’मुळे भारताच्या जीडीपी वाढीला चालना

    24-Feb-2024
Total Views | 66
AI Helps Indian GDP

‘ब्लूमबर्ग’ अब्जाधीश निर्देशांकावर गेल्या वर्षी वाढलेल्या संपत्तीपैकी ९६ टक्के संपत्ती ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे वाढल्याचे समोर आले आहे. आता भारतानेही ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर राहिले पाहिजे. त्याही पुढे ‘एआय’चा वापर करून, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशी क्रांती घडवून आणता येईल, जीडीपीचा दर कसा वाढविता येईल, यावरही संशोधन होणे आवश्यक.

’मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नडेला भारताच्या दौर्‍यावरती होते. त्यावेळी त्यांनी ’भारत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ‘एआय’ हे तंत्रज्ञान जगभरात वेगाने विकसित होत आहे आणि भारतासारख्या देशासाठी यातून अनेक संधी उपलब्ध आहेत. सत्या नाडेला यांच्या मते, “ ‘एआय’मुळे भारताची जीडीपी वाढीला फ़ार मोठी चालना मिळू शकते. भारत आणि अमेरिकेसारख्या देशांनी ’एआय’ नियम आणि इतर नियमांवर सहकार्य करणे आवश्यक आहे.” सत्य नाडेला यांची ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे. आपल्याला आठवत असेल की, दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने सत्य नाडेला यांचा ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मान केला होता आणि त्यानंतर ‘मायक्रोसॉफ्ट’चा भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा वेग नक्कीच वाढला आहे. सत्या नाडेला ‘एआय’च्या प्रसारासाठी भारताला एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पाहतात, भारतीय इन्फोटेक उद्योगासह तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, ‘मायक्रोसॉफ्ट’चे प्रतिस्पर्धीसुद्धा हाच दृष्टिकोन बाळगतात. त्यांच्या अंदाजे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेतील ५०० अब्ज हे तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज केलेल्या उत्पादकता सुधारणांमुळे असतील.

’मायक्रोसॉफ्ट’ दोन अब्ज भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडर्सना प्रशिक्षण देणार आहे; कारण त्यांना वाटते ही क्षमता भारतीयांमध्ये आहे. याशिवाय इतक्या मोठ्या संख्येमध्ये आणि कमी किमतीमध्ये कोडर्स हे फक्त भारतातच मिळू शकतात. नाडेला यांना वाटते की, यामुळे ’मायक्रोसॉफ्ट’ला खूप फायदा होईल आणि ‘एआय’मुळे जगात क्रांती होईल. अर्थात, यामुळे भारताचासुद्धा खूप फायदा होईल. भारताला आपल्या आर्थिक प्रगतीचा दर वाढवायचा आहे.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारताची जीडीपी वाढ

सत्या नाडेला यांच्या मते, ‘एआय’ आणि भारताची जीडीपी यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, भारताची जीडीपी लक्षणीयरित्या वाढवता येऊ शकते.
 
’एआय’ जीडीपी वाढवू शकते

उत्पादकता वाढवणे : ‘एआय’मुळे अनेक कामे स्वयंचलित होऊ शकतात. ज्यामुळे मानवी श्रम आणि वेळेची बचत होते आणि व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल. उत्पादकता वाढून उत्पादनात आणि सेवांमध्ये वाढ होऊ शकते.

दक्षता आणि कार्यक्षमता वाढवणे : ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होते. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
 
सरकारी सेवांमध्ये सुधारणा : ’एआय’मुळे सरकारी सेवांमध्येही सुधारणा होतात. सरकारी अधिकार्‍यांना नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करता येतील आणि भ्रष्टाचार कमी करता येईल.

ग्राहकांना चांगल्या सुविधा : ‘एआय’मुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि सेवा उपलब्ध होऊ शकतात. यामुळे ग्राहकांचे समाधान वाढून व्यवसायांना चालना मिळते.
 
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा: ‘एआय’मुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणता येईल. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारून, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ’एआय’मुळे डॉक्टरांना रोगांचे निदान आणि उपचार अधिक चांगल्या प्रकारे करता येतील आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवता येईल.

नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती: ‘एआय’मुळे अनेक नवीन उद्योग आणि व्यवसाय निर्माण होतील. ’एआय’ तंत्रज्ञान विकसित करणारे, ’एआय’ आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणारे आणि ’एआय’ तंत्रज्ञान वापरणारे यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन, अर्थव्यवस्थेची भरभराट होईल.

भारताकडे ‘एआय’ची क्षमता

भारताकडे ’एआय’ क्षेत्रात प्रगती करण्याची मोठी क्षमता आहे. भारतात तरूण आणि कुशल लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. याव्यतिरिक्त भारत सरकार ‘एआय’ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, अनेक योजना राबवत आहे. ’एआय’चा योग्य वापर करून, भारताची जीडीपी लक्षणीयरित्या वाढवता येऊ शकते. भारत सरकार आणि उद्योगांनी या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करून, ’एआय’ तंत्रज्ञानाचा लाभ घेणे गरजेचे आहे.
 
’एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची काही आव्हाने
 
डाटा आणि पायाभूत सुविधा : ’एआय’ तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात डाटा आणि मजबूत पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. भारतात डाटा गोळा करणे आणि व्यवस्थापित करणे अजूनही एक आव्हान आहे. सरकारने डाटा गोळा करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी योग्य धोरणे आणि पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे.

कौशल्य अंतर : ’एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, आवश्यक कौशल्ये असलेले कामगार भारतात मर्यादित आहेत. सरकारने ’एआय’ शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून, आवश्यक कौशल्ये असलेले कामगार तयार करणे आवश्यक आहे.
 
नियामक वातावरण : ’एआय’ तंत्रज्ञानासाठी योग्य नियामक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. सरकारने ’एआय’ तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य कायदे आणि नियम बनवणे आवश्यक आहे.
 
‘डीप टेक’च्या निधीसाठी एक लाख कोटी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचे बजेट दि. १ ़फेब्रुवारीला सादर केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘डीप टेक ’(ज्यामध्ये ‘एआय’ सामील आहे)च्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या नवीन निधीची निर्मिती करणे आहे. हा निधी संरक्षण क्षेत्रासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाचा लाभ घेऊ शकतील, अशा कंपन्या आणि व्यक्तींना उपलब्ध असेल. परंतु, या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा भारतीय सैन्यामध्ये आणि इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर करण्याकरिता आपल्याला पुष्कळ संशोधन करावे लागेल.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारताची जीडीपी

सरकारला ’एआय’ शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ’एआय’चा योग्य वापर करून, भारत आपली जीडीपी लक्षणीयरित्या वाढवू शकतो. ’एआय’चा विकास प्रचंड वेगाने होत आहे. भारताने यामध्ये मागे पडता कामा नये. जितक्या जास्त वेगाने कोडर्स/तज्ज्ञ भारतात विकसित करता येतील तेवढे चांगले! गेली अनेक वर्षं भारतातील अत्यंत हुशार विद्यार्थी हे ’आयआयटी’मधून उत्तीर्ण झाल्यानंतर अमेरिका किंवा युरोपच्या दिशेने वळायचे. हे भारतातल्या बुद्धिमान लोकांचे एक मोठे ‘ब्रेन ड्रेन’ होते. परंतु, आता काळ बदलला आहे आणि अनेक अतिहुशार भारतीय जे अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या उच्चपदावरती आहेत, ते आता भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. म्हणजे थोडक्यात आता भारतामध्ये ‘रिव्हर्स ब्रेन ड्रेन’ हे सुरू झालेले आहे, ज्याचा भारताला नक्कीच मोठा फायदा होत आहे.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121