अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कित्येक वर्षांपासूनच्या संघर्षाचा हा गोड शेवट जणू सोनियाचा दिवस! नवरात्रीच्या पहिल्या माळेचा मान आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून मिळाला. किती दुग्धशर्करा योग हा! विद्यमान मायबाप सरकारसह यासंदर्भात काम करणार्या अनेकविध समित्यांचे अहवाल व अनेक मान्यवरांसह समस्त मराठी जणांनी केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले. या आनंदाच्या क्षणी आपल्यासमोर अभिजात भाषा म्हणजे काय? हे सांगत मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न...
भाषा बोलणार्यांच्या प्रमाणाचा विचार केला, तर मराठी भारतात क्रमांक तीनवर व जगात क्रमांक दहावर सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत ५४ बोलीभाषा आहेत. घटनेनुसार १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. आता तिला अभिजात भाषेचाही दर्जा मिळाला आहे.
अभिजात भाषा म्हणजे ’वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा’ जो काल पर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया यांना मिळाला होता. तो आज मराठी सोबत पाली, प्राकृत, बंगाली, आसामी याही भाषांना मिळाला. पण, मराठीच्या व महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण-महाभारतापासून अनेक संदर्भ सापडतात .
रामायणात प्रभू रामचंद्र व सीतामाई सध्याच्या नाशिक येथील पंचवटीत वास्तव्यास होते, तर महाभारतातील भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी कौडिन्यपूर राजाची राजकन्या होती. कौडिन्यपूर आताच्या नागपूर जवळ आहे. पण, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करता इ. स. पूर्व तिसर्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोगलीपुत्त दिस्स याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठविल्याचा संदर्भ सापडतो. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील सोपारा आताचे नालासोपारा या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन असा व्यापार चालू असे.
इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करीत होते. हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड. या कालखंडात दोन समृद्ध ग्रंथ लिहिले गेले, ते प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिले, पहिला ग्रंथ ‘गुनाढ्याचा कथासरित्सागर’ किंवा ‘बृहत कथासरित्सागर’, त्यात वर्णन असलेला मराठी समाज वैभवसंपन्न आहे. दुसरा ग्रंथ सातवाहन राजा हालने रचलेली ‘गाथासप्तशती.’ या कालखंडात भाषेचे वहन झाले ते शौरसेनी पैशाचीचे पुढे मराठीकडे मार्गक्रमण झाले. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने इ. स. ७८ मध्ये ‘शालिवाहन शक’ सुरू केले. सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पराक्रमी व प्रगतीशील होते.
सातवाहनांनंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते, त्यांची राजधानी विदर्भातील वत्स्यगुल्म म्हणजे आताचे वाशिम. वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच इ. स. चौथे, पाचवे, सहावे शतक.
वाकाटकांनंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवासी युवानश्वांगने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याची गोदावरीच्या काठी असलेल्या त्याच्या प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण नामक राजधानीत भेट घेतल्याचा संदर्भ त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवला आहे. त्यात तो मराठी माणसाचे वर्णन करताना सांगतो. मराठी वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले तर जीव घेणारेही आहेत. वाकाटक, चालुक्य, व राष्ट्रकुट राजांच्या काळात अजिंठा-वेरूळची लेणी तयार झाली. दक्षिणेत ‘रठीक’ नावाचा जनसमूह होता या रठीकचे संस्कृतीकरण झाल्यावर ‘राष्ट्रीक’ असा शब्द तयार झाला, त्यातूनच पुढे ‘महाराष्ट्र’ हा शब्द तयार झाला, असे मत अनेक इतिहास लेखकांचे आहे. अशा या महाराष्ट्रातील मराठीची पहिली आद्याक्षरे सापडतात ती कर्नाटकातील म्हैसूर जवळील श्रवण बेळगोळ येथील वर्धमान महावीरांच्या भव्य पुतळ्याखाली मराठीची आद्याक्षरे कोरलेली आहेत.
’श्री चामुंडराये करवियले गंगाजे सुत्ताले करवियले’
ही मराठीची आद्याक्षरे मोडी लिपीत असून, त्या पुतळ्याचे नाव ‘भद्रबाहू’ आहे. या शिलालेखावर इ.स.नववे शतक असे कोरले आहे . मराठीचा जन्म प्राकृतोद्भव की संस्कृतोद्भव? पण, या प्रश्नाचे उत्तर शोधताना बहुसंख्य भाषाशास्त्री मान्य करतात की मराठी संस्कृतोद्भव आहे. तिच्यावर प्राकृताचे सुद्धा सखोल संस्कार आहेत. शब्दसंख्येचा विचार केला तर मराठीत 95 टक्के शब्द संस्कृतमधून आले आहेत. अनेक इतिहास संशोधकांच्या मते, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधु’ असून तो मुकुंदराज यांनी लिहिला. ते मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील आहेत. हा ग्रंथ 12व्या शतकात लिहिला गेला. त्यानंतर सुमारे ७५ ते १०० वर्षांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला.त्यानंतर मराठी भाषेचा विकास वेगाने झाला. यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. यादवांचे राज्य अनेक अर्थाने शांततेचे, संपन्नतेचे व विकासाचे राज्य होते. या कालखंडात संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना केली व त्यातून ‘अवघे विश्वचि माझे घर’ हे सांगताना आपली जागतिकीकरणाची दृष्टी स्पष्ट केली. शंकराचार्य मूळचे केरळातील पेरिया उर्फ पूर्णा नदीच्या काठावरील केरली गावचे. त्यांनी मांडलेला विचार निवृत्तीनाथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळाला. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी भक्तीचा मार्ग सांगितला व वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पुढे हा विचार ज्ञानेश्वरांचे शिष्य नामदेवांनी उत्तरेत नेला. महाराष्ट्रात संत तुकारामांनी याच विचाराचा विकास केला म्हणूनच म्हणतात, ’ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.’
मराठीची गौरव पताका ज्या जोडगोळीमुळे अभिमानाने डोलते ती हीच ज्ञानबातुकोबाची जोडी. इ.स.१३१० पर्यंत महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. यादवांनी ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी हेमाडपंथी मंदिरे बांधली, याच काळात भास्कराचार्यांनी ‘लीलावती’ हा गणितावर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला.
१३२५ ते १५६५ दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य होते. पण, १३व्या शतकापासून महाराष्ट्रावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, मुघल व सुलतानशाही यांनी १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राच्या बर्याच मोठ्या भागावर राज्य केले. यादवांच्या अस्तानंतर समाज जागृत व एकसंघ ठेवण्याचे काम संतांनी केले.संतांचे कार्य, यादवांचा इतिहास व छत्रपती शिवरायांची प्रेरणा यातून मराठ्यांनी देशभर साम्राज्य उभे केले .
कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी राज्यनिर्मितीसोबत भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले. त्यांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. स्वराज्याच्या सीमेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले आहे- ’सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत म्हणजेच पेशावर पासून तंजावरपर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा.’ जेव्हा मराठे १७५७ ला अटकेपार पोहोचले तेथून रघुनाथरावाने पेशवे नानासाहेबांना पत्राद्वारे कळविले. थोरल्या आबासाहेबांनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) दिलेले स्वप्न आपण पूर्ण करीत आणले आहे. पुढे आपण आदेश द्याल, तर मराठी जरीपटका काबूल कंदाहार वर फडकवू. पण, त्याचवेळी इकडे प्लासीच्या लढाईत इंग्रजांची सरशी झाली होती, तेव्हा तुम्ही परत या, कारण पेशव्यांसहित समस्त मराठ्यांना समजत होते की इंग्रजांपासून आपल्याला धोका आहे.
महाराष्ट्र नेहमी देशासाठी लढला, पानिपतचे युद्ध केवळ मराठे मराठी सत्तेसाठी नाही, लढले दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती ती वाचवण्यासाठी लढले. आज पानिपतच्या आठवणीने ही प्रत्येक मराठी मन सुन्न होते. अब्दाली ही कळून चुकला होता व युद्ध जिंकल्यावरही परत गेला.
१८१८ ला मराठी सत्तेच्या अस्तानंतर ही इंग्रजांना महाराष्ट्रात सुखासुखी राज्य करता आले नाही. शिवरायांचा वारसा पुढे महाराष्ट्राने सुरू ठेवला. कारण, आपण पारतंत्र्यात का गेलो, हा विचार तेवढ्याच वेगाने सुरू झाला. आत्मगत चिंतन सुरू झाले. शाळा सुरू झाल्या पाहिजे. इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे. विषमता दूर केली पाहिजे. १८२१ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले. पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी आपल्या दोषांचा अभ्यास करत ‘शतपत्रे’ लिहिली. येथे स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच अधोरेखित होताना दिसते .
१८५७च्या उठावात भाग घेणारे मराठी सेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचे स्वप्न एकच होते फिरंग्यांच्या तावडीतून देश मुक्त करू. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेच्या रूपात क्रांतिकारकांचे किंवा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रूपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रुपात समाज व धर्मसुधारणेचेही महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच वेळी चातुर्वर्ण व्यवस्थेशी लढा दिला, दलितांवर होणार्या अन्यायाविरुद्ध लढले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संविधान निर्मितीचे अभ्यासपूर्ण कार्य केले.
हिंदू राष्ट्रवादाचा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या विचारधारेचे एक तर दुसरे रा. स्व. संघाचे प्रणेते डॉ. हेडगेवार मूळचे आंध्रचे असले तरी विचारांचे मुख्य केंद्र महाराष्ट्रातील नागपूर हे होते. भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्रातील. टाटांच्या बरोबरीने लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू केले. ‘लुनिए ब्रदर्स’ने पहिला चित्रपट केला तो दादासाहेब फाळकेंनी बघितला, त्यातून त्यांनी पहिला मराठी चित्रपट बनविला तो पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनातून व त्या चित्रपटाचे नाव होते ’अयोध्येचा राजा’ म्हणून त्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ मानले जाते. शेतीतील सहकार चळवळीचा जन्म महाराष्ट्रातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथून सहकारातून उद्योग-व्यवसाय विकसित केला. पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ व नंतर देशभर चळवळ विकसित झाली .
शेतकरी संघटित करणे हे अशक्य वाटणारे काम शरद जोशींनी करून दाखविले. ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे’ हा विषय घेऊन त्यांनी चळवळ उभी केली, त्याचा देशाच्या धोरणावर प्रभाव पडला, कृषी आयोग बनवावा लागला, शरद जोशी त्याचे अध्यक्ष झाले.
स्त्रीमुक्ती चळवळ - महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे यासारख्या अनेक स्त्रियांनी शिकून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महाराष्ट्रात साठोत्तरी साहित्यात दलित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. ‘महाराष्ट्रभूषण’ पु. ल. देशपांडे या साहित्यासंदर्भात म्हणतात, मनुष्य, समाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दु:खांनी गदगदलेल्यांच्या व्यथा आणि वेदना प्रकाशात आणल्या. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, दया पवार, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, माधव कोंडविलकर, नामदेव ढसाळ, शरणकुमार लिंबाळे यांची नावे घेता येतील.
संगीत - हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा वैभवशाली कालखंड महाराष्ट्रापासून सुरु होतो. दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत व हिंदुस्तानी क्लासिकल म्हणजे उत्तर भारतीय संगीत या दोघांचा संयोग महाराष्ट्रात दिसतो, म्हणूनच पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर, परविन सुलतान, प्रभाताई अत्रे, कुमार गंधर्व असा वारसा महाराष्ट्रात निर्माण होण्यास मदत झाली. जगातील सर्वात मोठा शास्त्रीय संगीताचा महोत्सव सवाईगंधर्व महोत्सव पुण्यात होतो.
आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा १८५३ साली सांगलीच्या राजवाड्यात ’सीता स्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला आणि मराठीतील नाट्य परंपरेचा जन्म झाला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन महाराष्ट्रातील भारत रत्नांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या देदीप्यमान कामगिरीने जग जिंकले. पुण्यातील बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटना बांधायला सुरुवात केली पुढे १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी लक्ष घातले व ग्राहक संरक्षक कायदा अस्तित्वात आला.
इतरांनी केले त्याचे निरीक्षण करून त्यात नवी भर घालून नवे काम करणे, हेच मराठी माणसाचे खरे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या इतिहासातील अत्यंत गौरवपूर्ण क्षण व्यक्त करताना मला शब्द सापडत नाहीत. इतका हा क्षण आपल्या सर्वांसाठी गौरवपूर्ण आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा व मराठी माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडला आहे.
(लेखक के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली येथे शिक्षक आहेत.)
लेखक - प्रशांत शिरूडे