‘चार नगरातील विश्व’ स्थिरावले!

    20-May-2025
Total Views | 17
Jayant Narlikar a scientist who inspired many
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या निधनाने ज्ञानयात्रेतील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला हेच खरे...

भारताच्या वैज्ञानिक विकासाच्या वाटचालीत योगदान देणार्‍या शास्त्रज्ञांचा विचार करताना आपल्याला लक्षात येते की, त्यांचे कार्य हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसते. शास्त्रज्ञ समाजाला विचार देतात, प्रश्न विचारायला शिकवतात आणि विज्ञान सुलभपणे सामान्यांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे कोणत्याही शास्त्रज्ञाचे निधन म्हणजे एका युगाचा अस्तच! ही झालेली हानी केवळ शास्त्राच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीवरही तिचा व्यापक परिणाम दिसतो. संशोधन असो वा विज्ञानाचा प्रचार-प्रसार अशा सर्वच क्षेत्रांत मौलिक योगदान देणारे शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. त्यांच्यासारख्या बहुविध कार्यकर्तृत्वाच्या शास्त्रज्ञाचे निधन ही देशाची अपरिमित हानीच म्हणावी लागेल.
डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दि. १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील, वि. वा. नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जयंतरावांचे बालपण व शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले. जयंतरावांचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने बनारसच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणातच घडले. हिंदी माध्यमातून त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि ‘बी.एस्सी’ पदवीही बनारसमधूनच पूर्ण केली. एका विद्वत घराण्यातील संस्कार, तसेच आई सुमतीबाई यांचे संस्कृतविषयक प्रगल्भ ज्ञान यांनी जयंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया अधिकच मजबूत केला. जयंतरावांचे मामा संख्याशास्त्रज्ञ वसंतराव हुजूरबाजार आणि गणिततज्ज्ञ मोरेश्वर हुजूरबाजार हे ‘एम.एस्सी’साठी जयंतरावांच्या घरीच राहायला होते. त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव जयंतरावांवर होता. त्या काळातील शैक्षणिक परिसंस्थेतील ज्ञानसंपदा आणि प्राध्यापक-विद्वान यांचा सततचा संवाद यांचा सिहांचा वाटा जयंतरावांच्या जीवनामध्ये दिसतो. अशा प्रेरणादायी वातावरणामुळेच त्यांनी विज्ञान क्षेत्रात अपूर्व योगदान देत, भारतीय शास्त्रजगतात आपल्या अलौकिक कामगिरीचा ठसा कायमचा उमटवला. १९५७ साली जयंतराव त्यांच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ‘जे. एन. टाटा’ स्कॉलरशिप मिळवून केंब्रिज विद्यापीठात गणितातील रँग्लरची परीक्षा देण्यासाठी गेले. तेथील वातावरणाशी जुळवून घेत ते या परीक्षेत फक्त उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले नाहीत, तर परीक्षेत प्रथम क्रमांकही मिळवला. या परीक्षेतील तिन्ही भागांत जयंतरावांना उत्तम गुण मिळाले. जयंतरावांना खगोलविज्ञानाबद्दल विशेष गोडी. त्यामुळे याच विषयात संशोधन करण्याचे निश्चित करून तिसर्‍या भागासाठी त्यांनी ‘खगोलविज्ञान’ हा विषय निवडला. या परीक्षेत जयंतरावांना १९६० साली ‘डिस्टिंशन’ मिळाले व त्यांना ‘टायसन’ पदकाने सन्मानित करण्यात आले. १९३० साली हेच पदक जयंतरावांच्या वडिलांनाही मिळाले होते. त्यानंतर हे पदक कोणाही भारतीयाला मिळाले नव्हते.
या संपूर्ण काळात जयंतरावांवर फ्रेड हॉईल यांच्या ‘नेचर ऑफ द युनिव्हर्स’ आणि ‘फ्रन्टियर्स ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या पुस्तकांचा आणि विद्युत चुंबकीय शास्त्रावरील त्यांच्या व्याख्यानांचा विशेष प्रभाव होता. त्यामुळे पुढील संशोधन काळात हॉईल यांचेच मार्गदर्शन लाभावे, अशी जयंतरावांनी इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्णही झाली. जगात अनेक गुरूशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत, ‘हॉईल-नारळीकर’ ही त्यापैकीच एक.
विश्वाच्या उत्त्पतीशास्त्राला अधिक स्पष्ट करणारे अनेक सिद्धांत विज्ञान विश्वात प्रसिद्ध आहेत. स्थिर स्थिती आणि ‘बिगबँग’ हे त्यापैकीच. ‘बिग बँग’ सिद्धांत विश्वाची निर्मिती अब्जावधी वर्षांपूर्वी एका महाप्रचंड स्फोटातून झाल्याचे मानतो, तर स्थिर स्थिती सिद्धांतांचा विश्वाच्या अनादि असण्यावर विश्वास. हॉईल-नारळीकर या गुरूशिष्याच्या जोडीने प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या ‘जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ या सिद्धांतावर अधिक संशोधन करत या विश्वाला उत्पत्ती आणि लय नाही असा सिद्धांत मांडला. स्थिर स्थिती सिद्धांतांच्या जवळ जाणारा हा सिद्धांत विज्ञानविश्वात ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ नावानेच प्रसिद्ध आहे. ‘हॉईल-नारळीकर सिद्धांता’मुळे विश्वाच्या ‘स्टेडी स्टेट थेअरी’ला आधार मिळाला. या सिद्धांतामध्ये विविध वस्तुमान निर्मितीमागचे कारकत्व स्पष्ट करणारी ‘सी-फिल्ड’ ही संकल्पना मांडण्यात आली. दुसरे म्हणजे कोणत्याही वस्तुमान निर्मितीसाठी मूळ वस्तुमान आवश्यक असल्याने त्याशिवाय ‘विश्वनिर्मिती’ होऊ शकत नसल्याचेही या सिद्धांताने अधोरेखित केले. मात्र, १९६० साली नव्या संशोधनाने पुन्हा ‘बिग बँग थेअरी’ला चालना मिळाल्याने स्थिर स्थिती सिद्धांत मागे पडत गेला. तरीही जागतिक विज्ञानक्षेत्रामध्ये दोन मतप्रवाहांपैकी एका सिद्धांतात मोलाची भर घालणारे शास्त्रज्ञ म्हणून नारळीकरांचे नाव अजरामर झाले.

खगोल वैज्ञानिक म्हणून देशविदेशांतील अनेक विद्वानांशी जयंतरावांच्या भेटी-चर्चा झाल्या, संशोधनेही प्रसिद्ध झाली. अनेक ठिकाणी जयंतरावांनी ओजस्वी व्याख्यानांतून क्लिष्ट असा विज्ञान विषय सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत नेला. विज्ञानातील अनेक संकल्पना गुंतागुंतीच्या आणि जनसामान्यांना अगम्य असल्याचे लक्षात आल्यावर जयंतरावांनी विज्ञानातील संशोधनावर सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहिण्याची सुरुवात केली. सुगम्य आणि सुरस भाषेत विज्ञानकथा लिहिण्याची त्यांची हातोटी ही वादातितच! त्यांच्या अनेक विज्ञानकथांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक लहान मुलेही आहेत, ज्यांना जयंतरावांच्या कथा वाचून विज्ञानाची आवड निर्माण झाली. जयंतरावांना परदेशात त्यांचे विज्ञान विषयक संशोधन कार्य चालू ठेवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत्या. मात्र, स्वदेशाविषयीची आत्मीयता त्यांना स्वस्थ बसू देईना. पुढे १९६९ साली त्यांनी एक धाडसी निर्णय घेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधत भारतात परतण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार १९७२ साली ते भारतात परतलेही. आजकाल करिअरसाठी सातत्याने परदेशात जाणाचे वेध लागलेल्या आजच्या तरुणाईला जयंतरावांचा हा निर्णय निश्चित आदर्शवत असाच. जयंतरावांनी विज्ञानातील संशोधनाबरोबरच परदेशातील सुखसंसाधने स्वदेशातील शास्त्रज्ञांना उपलब्ध व्हावीत या विचाराने त्यांनी ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’ या संस्थेची स्थापना केली. ‘आयुका’च्या या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे, या वास्तूमध्ये जागतिक दर्जाच्या अनेक शास्त्रज्ञांच्या पुतळ्यांमध्ये आर्यभट यांचाही पुतळा आहे. जयंतरावांच्या मनातील स्वदेश प्रेमाचा हा उत्तम दाखलाच म्हणावा लागेल.
भारतातील तरुण पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यात त्यांच्या लेखणीचे कार्य लाखमोलाचे असेच. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. कदाचित साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला असावा. जयंतरावांच्या आयुष्याकडे पाहताना एक विशेष बाब लक्षात येते ती म्हणजे, ज्या क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला, त्यात त्यांनी उत्तुंग उंची गाठली. विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्‍या जयंतरावांनी ९४व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही भूषवले. ‘चार नगरातील विश्व’ या आत्मचरित्रातून जयंतरावांचा कार्यबोध होतो. देशातील नवीन पिढीपर्यंत विज्ञान विषय पोहोचविण्याचे जयंतरावांचे कार्य लक्षात घेऊनच पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनिताताईंनी ‘आयुका’ला आर्थिक मदत देऊ केली होती, यावरूनच जयंतरावांचे साहित्यविश्वातील महत्त्वही अधोरेखित होते. असा विज्ञान प्रसाराच्या ज्ञानयात्रेतील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. चार नगरातील विश्व अखेर स्थिरावले! परंतु, नारळीकरांच्या कार्यातून उमजलेली जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भारतातील येणार्‍या पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देत राहील, हे निश्चित!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121