स्वरयोगीचे अंतरंग!

    13-Jun-2025   
Total Views | 4

पंडित शशांक कट्टी यांनी आपल्या कारकिर्दीत शास्त्रीय संगीताची मनोभावे सेवा केली. त्यांचे सतारवादन म्हणजे एक निर्मळ प्रवाह आहे, ज्याच्या अंतरंगात श्रोते स्वतःला विसरून अगदी मंत्रमुग्ध होतात. आज, दि. १४ जून रोजी सायंकाळी त्यांच्या ‘दिड दा.. दिड दा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील विलेपार्ले (पू) येथे लोकमान्य सेवा संघ तथा श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला येथे सायंकाळी ५.४५ वाजता पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पंडित शशांक कट्टी यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...

पंडितजी, इतया वर्षांच्या अथक साधनेनंतर मागे वळून पाहताना आज मनात काय भावना दाटून येतात?

मागे वळून पाहताना मला माझ्या जीवनातील संघर्ष आठवतो. आताच्या काळात ज्या सुविधा आहेत, तशा त्या काळात नव्हत्या. पंडित कमलाकर भाटवडेकर जे उस्ताद विलायत खान यांचे शिष्य होते, त्यांनी मला घडवलं. सतारवादन करता करता मी नवनवीन गोष्टींचा शोध घेत गेलो. उस्ताद रईस खान यांचा सहवास मला लाभला. त्यांच्या काही कार्यक्रमांमुळे मला गोष्टी शिकता आल्या. काही चुकीच्या संस्कारांमुळे गोष्टी जुळत नव्हत्या. म्हणून त्यांनी माझा हात साफ करून घेतला. साधनांच्या बाबतीत आजची नवीन पिढी भाग्यवान आहे, त्यांच्याकडे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु, ज्या काळात मी शिक्षण घेत होतो, तेव्हा या गोष्टी उपलब्ध नव्हत्या.

गुरू-शिष्य परंपरेला भारतीय संगीतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व. आपले आपल्या गुरूंसोबत नाते कसे होते?


भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गुरू हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. योग्य संगीत म्हणजे नेमकं काय, याचं ज्ञान हा गुरू आपल्या शिष्यांना देत असतो. शास्त्रीय संगीत अनेक वेगवेगळ्या नियमांमध्ये बांधले गेले आहे. या नियमांची ओळख हा गुरू आपल्या शिष्यांना करून देतो. माझी पहिली गुरू म्हणजे माझी आई. काणे बुवा आणि वसंतराव राजोपध्याय यांच्याकडे माझी आई शिकल्यामुळे तिने मला अनेक गोष्टी शिकवल्या. पंडित यशवंतबुवा जोशी यांनी मला बंदिश, राग शिकवले. पंडित बाबुराव कुलकर्णी यांच्याकडे मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर पंडित कमलाकर भाटवडेकर यांच्याकडे मी माझं नंतर संपूर्ण शिक्षण घेतले. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला शिकवलं. उस्ताद रईस खान यांनीसुद्धा त्यांच्या घराण्यानुसार मला काही गोष्टी शिकवल्या. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट कुठल्याही प्रकारचे हातचं राखून न ठेवता, त्यांनी माझ्यावर संगीताचे संस्कार केले.

सतारवादनाच्या या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा नेमका कोणता होता?

माझी सतार ही इतरांपेक्षा वेगळी वाजते, असं अनेकांनी मला सांगितलं. वास्तविक प्रत्येक वादकाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं, त्याच्यावर केलेला त्याचा एक संस्कार असतोच. परंतु, मी या गोष्टीचा खोलात जाऊन विचार केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की, माझे गुरुजी भाटवडेकर हे स्वतः सतारवादक नव्हते. त्यावेळेला मीसुद्धा कुठल्याही सतारवादकाकडे शिकलेलो नव्हतो. त्या काळात एखादी हरकत असेल, तर ते ती मला तोंडाने म्हणून दाखवायचे. आता ती हरकत विलायत खान यांच्या बाजूने कशी यायची हे त्यांना माहीत असायचे, पण मला ठावूक नसायचे. म्हणून मी त्या वेळेला ती हरकत वेगवेगळ्या तर्हेने त्यांना वाजवून दाखवायचे. यामुळे माझी तालीम व्हायची. त्यामुळे हा माझ्या सतारवादनातला अत्यंत वेगळा आणि मला स्वतःला समृद्ध करणारा टप्पा होता, असं मला वाटतं.

आपण जेव्हा एखादा विशिष्ट राग सतारीच्या माध्यमातून सादर करता, तेव्हा आपल्या मनामध्ये कोणती प्रक्रिया सुरू असते?

एखादा राग ज्यावेळेला मी सादर करत असतो, त्यावेळेला मी त्या रागाची पूजा करत असतो, असं मला वाटतं. तो राग नेमका काय सांगायचा प्रयत्न करत आहे, त्या रागाला काय अर्थ आहे, त्या रागातून काय बोध होतो, याचा विचार माझ्या मनात येतो. रागाला शरण गेल्याशिवाय पूर्णपणे आपण तो सादर करू शकत नाही. रागाचा अर्क टिकवणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या भवितव्याकडे आपण कसं बघता ?

भारतीय शास्त्रीय संगीत ही अत्यंत वेगळी कला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने मी ही गोष्ट सिद्ध करू शकतो की, हे संगीत आरोग्याशी निगडित आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे इतर संगीतांप्रमाणे सोपे नाही. त्यामुळे त्याच्याकडे वळणार्या कलाकारांना सहज ते शिकता येत नाही. त्याच्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते. मेहनत घेणारे अनेक कलाकार आपल्याला देशाच्या कानाकोपर्यात भेटतील, त्यांच्या या साधनेमुळेच शास्त्रीय संगीत पुढेदेखील समृद्ध होत राहील.

‘दिड दा.. दिड दा’ या पुस्तकामध्ये वाचकांना काय वाचायला मिळणार आहे?

वास्तविक, मी लेखक नाही. माझ्या जीवनात मी ज्यांच्या संपर्कात आलो, त्यांच्याशी संबंधित गोष्टी मी कायम सांगत असतो. मेधा राजहंस यांनी मला ही कल्पना सूचवली की आपण या अनुभव संचिताचे एक पुस्तक तयार करूया. या पुस्तकामध्ये माझे आत्मकथन आहे. मला लाभलेले गुरू, सतारवादक म्हणून माझा झालेला विकास, यात वाचकांना वाचायला मिळणार आहे. अनेक संगीत कार्यक्रमांचे दिग्दर्शन मी केले आहे. पंडित जसराज, किशोरी आमोणकर, आशा भोसले अशा अनेक दिग्गजांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग मी केले आहे. या सर्व थोर कलाकारांसोबतचा अनुभव मी या पुस्तकात मांडला आहे.

शास्त्रीय संगीताचा ध्यास घेणार्या पिढीला आपण काय सांगू इच्छिता?

आजचा काळ बदलेला आहे. सगळीकडे झगमगाटाला किंमत आली आहे. रियालिटी शोज्चा हा जमाना. यामध्ये एखाद-दुसर्या गाण्यासाठी काही गायक प्रकाशझोतात येतात. नंतरच्या काळात मात्र त्यांचं नाव आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु, ज्यांच्या संगीतामध्ये सातत्य आहे, आपल्याला असं दिसून येतं की, त्यांची बैठक शास्त्रीय संगीताची आहे. शास्त्रीय संगीतामध्ये सुरांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु, त्याच्याहून अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही सुरांकडे लक्ष द्यायला शिकता. शास्त्रीय संगीताचा ज्यांनी ध्यास घेतला आहे, त्यांना मी ऐवढेच सांगू इच्छितो की, निष्ठेने आपल्या मार्गावर चालत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121