सागरी परिसंस्थेतील सफाई कर्मचारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारी समुद्री कासवे ही भूतलावर हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत. हिंदू पुराणांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. मात्र, वेगाने कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर असणार्या या कासवांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुढाकार घेत आहे. आजच्या ‘जागतिक समुद्री कासव दिना’च्या निमित्ताने राज्यातील कासव संवर्धनाच्या कामाचा घेतलेला हा सर्वंकष आढावा...
गुजरात आणि केरळच्या किनार्यांवर मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे कासव विणीच्या अनुषंगाने असणारी तेेथील किनार्यांची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सध्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीसाठी शिल्लक राहिलेला उत्तम प्रदेश हा उत्तर रत्नागिरीपासून गोव्यापर्यंत आहे.
उत्तर कोकणाचा विचार केल्यास पालघर, मुंबई आणि रायगड येथील किनारे पर्यटनकेंद्रित झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील किनार्यांची क्षमता कासव विणीच्या अनुषंगाने नष्ट झाल्याच्या बरोबरीने आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही किनार्यांवर अजूनही रात्र पर्यटन पोहोचलेले नाही.
रायगड - हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, मारळ, किहीम
रत्नागिरी - गावखडी, वाडावेत्ये, माडबन, लाडघर, दाभोळ, कोळथरे, केळशी, आंजर्ले, मुरुड, कर्दे, गुहागर, तवसाळ, रोहिले, वेळास, मालगुंड, भाट्ये, आडे, अणसुरे, जैतापूर, गणेशगुळे, आंबोळगड, काळबादेवी, कुर्ली, उंडी, वारे
सिंधुदुर्ग - तोंडवळी, सापळे बाग, तळाशील, देवबाग, वायरी, आचरा, वायंगणी, फळ्ये, कालवी बंदर, भोगवे, नवबाग, सागरेश्वर, उभादांडा, मूठ, मोचेमाड, टांक, सागरतीर्थ, वेळागर, कातवनेश्वर, तांबळडेग, मिठबाव, मिठमुंबरी, मुणगे, फणसे
महाराष्ट्रातील सागरी कासवे
जगभरात एकूण सात प्रजातींची सागरी कासवे आढळतात. त्यांपैकी महाराष्ट्रात पाच कासव प्रजातींच्या अस्तित्वाची नोंद झाली आहे. यामध्ये ’ऑलिव्ह रिडले’, ’ग्रीन सी’, ’हॉक्सबिल’, ’लॉगरहेड’ आणि ’लेदरबॅक’ कासवांचा समावेश आहे. ’डर्मोचिलिडी’ कुळामधील भारतात ’लेदरबॅक’ ही एकमेव प्रजात सापडते, तर ’चिलोनिडी’ या कुळामध्ये भारताच्या किनार्यावर आढळणार्या ’ऑलिव्ह रिडले’, ’ग्रीन सी’, ’हॉक्सबिल’ आणि ’लॉगर हेड’ या कवचधारी कासवांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील सागरी कासवांच्या बाबतीत फार पूर्वीपासून माहिती उपलब्ध नव्हती. परंतु, सन 2000 मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण किनार्यावर सागरी कासवे तुरळक संख्येने विणीसाठी येत असल्याची नोंद करण्यात आली. या पाहणीत प्रामुख्याने ’ऑलिव्ह रिडले’ कासव विणीसाठी येत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर ’ग्रीन सी’ कासवांचीदेखील काही ठराविक किनार्यावर वीण आढळली. त्यानंतर ’सह्याद्री निसर्ग मित्र’च्या भाऊ काटदरे यांनी राज्यात कासव संवर्धनाचे काम सुरु केले.
‘ग्रीन सी’च्या नोंदी
’ग्रीन सी’ कासवाच्या विणीचा पुरावा अगदी 1921 सालापासून आढळतो. ’केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे’च्या (सीएमएफआरआय) 1983 सालच्या प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रिकेनुसार मॉसन नामक संशोधकाने, 1921 साली प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रिकेनुसार साष्टी (सॉलसेट) बेटावर (आताच्या मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला वांद्रे ते मिरा-भाईंदरचा भाग) ’ग्रीन सी’ कासवाची विण होत होती. त्यानंतर 1976 सालच्या नोंदीनुसार मुंबईतील बॅक-बे आणि फोर्ट किनार्यावर ग्रीन सी कासवाची घरटी आढळून आल्याची नोंद आहे. ठाण्याच्या उपवनसंरक्षकांनी मार्च, 1983 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार मुरुड, काशीद, नांदगाव, वेळास, दिवेआगर, आरवी, हरिहरेश्वर, केळशी, आंजर्ले, गिरगाव चौपाटी, राजभवन किनारा, शिवाजी पार्क, जूह, वर्सोवा, मढ, गोराई, मार्वे, डहाणू, पालघर, आगर, सातपाटी या किनार्यांवरून ग्रीन सी कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मार्च, 2000 ते एप्रिल 2001 दरम्यान डॉ. वरद गिरी आणि नरेश चतुर्वेदी यांनी राज्यातील सागरी कासवाच्या विणीच्या किनार्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये त्यांना राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर तुरळक स्वरुपात ग्रीन सी कासवाची घरटी होत असल्याची माहिती मिळाली.
निरीक्षण ठरले महत्त्वाचे
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात वनविभागने स्थानिक बीच मॅनेजर मंडळींना नेमून त्यांना हाताशी धरून किनार्यावर गस्त घालून कासवांच्या निरीक्षणाचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे ‘ग्रीन सी’ कासवांच्या नोंदी कोकण किनारपट्टीवरून मिळाल्या आहेत. मादी कासवे ही सर्वसामान्यपणे एका ठराविक किनार्यावर घरटी करते. मात्र, काही मादी कासवे एकापेक्षा अधिक किनार्यांवर जाऊन अंडी घालत असल्याच्या नोंदी आहेत. थोडक्यात, मादी कासवाला तिच्या मुख्य किनार्यावर काही धोका जाणवल्यामुळेदेखील ती विणीचा किनारा बदलण्याची शक्यता असते. यापूर्वी महाराष्ट्रात ‘ग्रीन सी’ कासवांच्या नोंदी आहेत. त्यावेळी जन्मास आलेली मादी पिल्ले आता प्रौढ होऊन राज्याच्या किनार्यावर अंडी घालण्यासाठी परतत असण्याचीदेखील शक्यता आहे. यामध्ये भविष्यात वाढ होत आहे का, याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.
- नुपूर काळे, सागरी कासव संशोधक
कासवांविषयी
कासव, सरडे, साप, मगर, सुसर आणि न्यूझीलंडमध्ये सापडणारा तुआतारा हे सरीसृप वर्गात येतात. त्यामध्ये कासवाचा गण हा ‘चिलोनिया’ असून त्यांची उत्पत्ती साधारण 20 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. कासवांचे वर्गीकरण करताना मुख्यतः त्यांची डोके कवचात घेण्याची पद्धत विचारात घेतली जाते. भारतात जमिनीवरील, गोड्या पाण्यातील आणि सागरी कासवांची एकंदर पाच कुळे आणि 31 प्रजाती आहेत. सागरी कासवांचा समावेश यामधील ’डर्मोचिलिडी’ आणि ’चिलोनिडी’ या दोन कुळांत होता. ’डर्मोचिलिडी’ कुळामध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो, तर ’चिलोनिडी’ कुळात कठीण कवच असणार्या सागरी कासवांचा समावेश असतो.
सागरी कासवांविषयी...
सागरी कासवे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध
समुद्रातील अधिवास पसंत करतात.
समुद्री कासवांना डोके आणि पाय कवचामध्ये आत ओढून घेता येत नाहीत.
कासवांचे पुढील पाय वल्ह्यासारखे असतात. त्यांवर एक किंवा दोन नख्या असतात.
सरीसृप वर्गात नराचा आकार मोठा असतो; सागरी कासवांमध्ये मादी मोठी असते.
सागरी कासवांना उत्तम दृष्टी आहे. परंतु, प्रतिमा कृष्णधवल असते.
कासवांचे घ्राणेंद्रिय उत्तम असले, तरी स्वादेंद्रिय प्रगत नाहीत.
नर व मादी कासवांचे मिलन समुद्रात होते. नर सहसा किनार्यावर येत नाहीत.
मादी समुद्री कासव फक्त अंडी घालण्यासाठी किनार्यावर येते.
जनजागृतीने सुरूवात
यंदा कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच विभागाने 2024-25 सालच्या समुद्री कासव विणीच्या हंगामाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दाभोळ या किनार्यांवर मोठ्या संख्येने समुद्री कासवांची घरटी आढळली. पुढच्या हंगामात म्हणजेच 2025-26 सालचा समुद्री कासव विणीच्या हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सागरी कासवांच्या विणीची माहिती देण्यासाठी गावकर्यांना आवाहन करण्यात येणार आहे.
- कांचन पवार, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभाग
सॅटेलाईट ट्रान्समीटरविषयी
सागरी कासवांच्या कवचावर पुढच्या बाजूला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले जाते. त्याच्या पुढच्या बाजूला ‘अँटेना’ असून ’ट्रान्समीटर’ची संदेशवहन प्रणाली आहे. बॅटरीवर दोन ’स्कू’(‘स्क्रू’)सारखे बटन आहेत. ज्याला ’स्लॉट वॉटर स्वीच’ म्हणतात, जे बॅटरीला कार्यान्वित करून संदेशवहन प्रणालीला सॅटेलाईटला संदेश पाठवण्यासाठी मदत करतात. हे यंत्र पाण्यामध्ये असल्यावर पाण्याच्या दाबामुळे ’स्लॉट वॉटर स्वीच’ बंद असते. मात्र, सागरी कासवांना विशिष्ट काळाने समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावे लागते. अशा वेळी कासवाने श्वास घेण्यासाठी डोके वर काढल्यावर त्याच्या पाठीवरील ट्रान्समीटर पाण्याबाहेर येते. पाण्याच्या दाब कमी झाल्यामुळे ’स्वीच’ सुरू होऊन बॅटरी कार्यान्वित होते. अशा वेळी ट्रान्समीटरची संदेशवहन प्रणाली कासवाच्या स्थानाचे संदेश त्याला पाठवते. हे सॅटलाईट दर दिवशी भारताच्या अवकाशातून साधारण चार ते पाच तासांसाठी प्रवास करते आणि अशा वेळी ते पाच हजार किलोमीटर क्षेत्रातील संदेशांचा स्वीकार करते. यामुळे आपल्याला कासवाचे स्थलांतर मार्ग या सर्वांविषयी माहिती मिळते.
‘फ्लिपर टॅगिंग’चे फलित
‘फ्लिपर्स टॅग’ हे सर्वांत सामान्य टॅग आहेत, जे जगभरात समुद्री कासवांना चिन्हांकित करण्यासाठी वापरले जातात. ते एकतर धातूपासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेले असतात आणि ते कासवाच्या कातडीला छेदून लावण्यात येतात. ओडिशा राज्यात ‘फ्लिपर टॅगिंग’ केलेले मादी कासव गुहागरच्या किनार्यावर अंडी घालण्यासाठी आले, हे ‘फ्लिपर टॅगिंग’चे फलित आहे. याशिवाय, गुहागरच्या किनार्यावर ‘फ्लिपर टॅगिंग’ केलेल्या 59 माद्यांपैकी तीन मादी कासवे महिन्याभराच्या आतच पुन्हा गुहागर किनारी अंडी घालण्यासाठी आल्याचे ‘फ्लिपर टॅगिंग’मुळे कळले. त्यामुळे किती संख्येने मादी कासवे अंडी घालण्यासाठी, विणीच्या एकाच हंगामात किती मादी कासवे एकाच किनार्यावर पुन्हा अंडी घालण्यासाठी येतात आणि पर राज्यात टॅग केलेल्या मादी कासवे किती वारंवारतेने अंडी घालण्यासाठी येतात, याची माहिती ‘फ्लिपर टॅगिंग’ प्रभावी पद्धतीने अमलात आणल्यास मिळू शकते.
- मोहन उपाध्ये, साहाय्यक संशोधक - कांदळवन प्रतिष्ठान
अंडी व घरट्यांची जपणूक
समुद्राची भरती आणि किनार्यांवर भटके कुत्रे किंवा वन्यजीवांमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरट्यांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरित्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरट्यांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला ‘हॅचरी’ म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत, म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.
कासवांचा जन्मदारावर परिणाम
कासवांच्या जन्मदर हा त्यांच्या उबवणीसाठी आवश्यक असणार्या तापमानावर अवलंबून असतो. अंडी ही हॅचरीत किती वेळात आणि वेगाने हलवली जातात, यावर जन्मदर ठरतो. गेल्यावर्षी म्हणजेच 2023-24च्या कासव विणीच्या हंगामात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कासवांचा जन्मदर हा 64 टक्के होता. त्या हंगामात एकूण 2 हजार, 566 घरटी आढळून आली. त्यामाध्यमातून 2 लाख, 46 हजार, 609 अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या 1 लाख, 58 हजार, 873 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे जन्मदर उच्च ठेवायचा असल्यास किनार्यावर सापडणारी किमान 20 टक्के कासवांची घरटी ‘इन-सेटू’ पद्धतीने संरक्षित करणे गरजेची आहेत. म्हणेजच आहेत त्या ठिकाणी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासंदर्भातील उपाययोजना कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने सिंधुदुर्गच्या किनार्यांवर सुरू केली असून, सुमारे 250 हून अधिक घरटी ‘इन-सेटू’ पद्धतीने संरक्षित करण्यात आली आहेत.