शुभमंगलाची नवकथा

    16-Jun-2025
Total Views |
 
Maratha community announced model code of conduct for marriage
 
 
विवाह हा हिंदू धर्मशास्त्रानुसार सोळा संस्कारांपैकी एक! मात्र आज त्याचे स्वरुप बदललेले दिसते. पूर्वी नसलेल्या असंख्य नवीन पद्धती आल्या आणि परंपरांचा भाग झाल्या. काही जुन्याच प्रथा नव्याने सुरु झाल्या. त्यापैकीच हुंडा ही प्रथा होय. या प्रथेने अनेक बळी घेतले आहेत. हे टाळण्यासाठी मराठा समाजाने विवाहाची एक आदर्श आचारसंहिता जाहीर केली आहे, त्याचा घेतलेला आढावा...
 
राज्यात वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर मोठ्या प्रमाणावर लग्नावरील उधळपट्टी, हुंडा यावर चर्चा सुरू झाली. राज्यात हुंड्यासंदर्भाने कायदा असूनही हुंड्याची देवाणघेवाण होत आहे. त्याची कदाचित सार्वजनिक स्वरुपात चर्चा होत नसेल, मात्र हुंडा दिला जातो आणि घेतला जातो, यावर शिक्कामोर्तब झाले. कधीकाळी रेडिओ, भांडी, सायकल, अर्धा-एक तोळ्याची सोन्याची अंगठी दिली-घेतली जात होती. आता मात्र हुंडा घेण्याच्या रकमेचे आकडे, सोन्याच्या तोळ्यांचे आकडे, महागड्या गाड्या, फ्लॅट यांसारख्या गोष्टी आता हुंड्यात दिल्या जाऊ लागल्या आहेत. दिल्या जातात असे नाही, तर मागितल्या जातात. मुलींच्या पालकांना नाईलाज म्हणून द्याव्या लागतात. आर्थिक श्रीमंतीचा स्तर उंचावत आहे आणि त्या प्रमाणात हुंड्याचे आकडेही उंचावत आहेत. हुंडा घेण्याबरोबर लग्नदेखील मोठ्या प्रतिष्ठेच्या मार्गाने उधळपट्टी करतच करावे लागते. त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. माणसांचे माणसांसोबतचे असणारे नाते हरवत चालले असून, माणसांना प्रेमाची भूक लागण्याऐवजी पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठेची भूक लागली आहे. या भूकेतून आत्महत्या, हत्या, छळ होताना दिसतो. लग्नाच्या या प्रतिष्ठेच्या मुळाशी भ्रष्टाचाराचे मूळ दडले आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजातील धुरिणांनी पुढे येत मराठा समाजातील मुलामुलींचे लग्न करताना काही नियम पाळावेत, म्हणून आचारसंहिता जारी केली आहे. या आचारसंहितेचे पालन झाले, तर महाराष्ट्राचे सामाजिक चित्र पालटलेले अनुभवता येईल. केवळ मराठा समाजानेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनीच या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे.
 
मराठा समाजाच्या कर्त्या लोकांनी एकत्रित येऊन समाजात जे काही घडत आहे, ज्या चुकीच्या पाऊलवाटा निर्माण होत आहेत, त्याबद्दल चिंतन करत, समाजाला वाईट परंपरेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सामान्य लोकांनीही या निर्णयाचे स्वागतच केले. समाजमनात याबाबत परिवर्तनाचा विचार होताच, मात्र सामान्यांना आवाज नसतो. त्यामुळे समाजातील कर्त्या लोकांनी भूमिका घेतली की, सामान्य माणसं चांगल्या गोष्टींच्या मागे उभी राहतात, हा सामाजिक अनुभव आहे. मुळात सामान्य माणसांच्या शहाणपणावर नेहमीच विश्वास ठेवावा, इतके शहाणपण त्यांच्याकडे निश्चित असते. विवाह निमित्ताने मराठा समाजाच्याच नव्हे, तर समाजातील विविध जाती, धर्मांतही लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. हे सारे दुर्दैवाने उघड्या डोळ्यांनी पाहिले जात आहे. त्यावर सरकार काही बोलत नाही. उलट समाजातील एक वर्ग आपल्या कुटुंबातील विवाहसोहळे अधिक देखणे, डोळ्याचे पारणे फेडणारे व्हावेत, म्हणून अधिकाधिक प्रयत्न करतात. त्यासाठी लाखो रुपये उधळले जात असून, यातूनच संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवले जात आहे. त्यासंदर्भानेच आचारसंहिता जाहीर करताना, या उधळपट्टीवरच लगाम घालण्याचा निर्णय घेतला गेला. मुळात विवाहसोहळे यांचे एक आर्थिक गणित आहे. त्यावर जणू अनेकांचे व्यवसाय टिकून आहेत आणि त्यातूनच सावकारशाहीदेखील टिकून आहे. हे सारेच गणित समजून घेतले, तर तोंडात बोट घालावे, असेच आहे.
 
वैष्णवी हगवणेंच्या हुंडाबळीनंतर समाजातील लग्नसमारंभाचा मुद्दा ऐरणीवर आला. समाजात गेल्या काही वर्षांमध्ये लग्नात प्रचंड उधळपट्टी केली जात आहे. लग्न हा एक कौटुंबिक आणि धार्मिक विधी असून, तो संस्कार म्हणूनच पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. त्याचवेळी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने परिवर्तनाची गरज आहेच. मात्र, हे परिवर्तन विवेकी असायला हवे, दुर्दैवाने हे परिवर्तन तसे नाही. गेले काही वर्षे ‘प्री वेडिंग शूट’, ‘डेस्टिनेशन वेडिंग’, ‘रिसॉर्ट वेडिंग’, ‘थीम वेडिंग’, ‘संगीत पार्टी’चा कार्यक्रम, अलीकडे विवाह सोहळ्यात ऑर्केस्ट्रासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या विवाह संस्कारांत नसलेल्या अनेक गोष्टींचा समावेश आधुनिकतेच्या नावाखाली झाला आहे. या गोष्टींचा संस्कारांशी, मूल्यांशी, भविष्याशी काहीतरी संबंध आहे का? या गोष्टींमुळे समाजाचे काय भले होणार आहे? यातून कोणाच्या सुख, समाधान, आनंदात भर पडणार आहे का? या सार्‍याचा आज विचार करण्याची गरज आहे. यासाठी मुलीच्या आईबाबांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. जवळच्या एखाद्या नातेवाईकाने लग्नात पैसे खर्च करून कार्यक्रम केला, म्हणून इतरही त्यामार्गाने जातात. अनुकरणाची वाट चालत असताना खरंच त्याने कुटुंबाचे, समाजाचे काही भले होणार आहे का? याचा विचार न करता, केवळ प्रदर्शन करण्यातच लोकांना आनंद वाटतो. मात्र, हे सारे करताना त्याचे सादरीकरण लग्न सोहळ्यात केले जाते. खरं तर यातील अनेकदा केले जाणारे ‘शूट’ संस्कृतीचा विचार न करता, ओंगळवाण्या स्वरुपात लग्नाच्या गर्दीसमोर सादर केले जाते. आता नव्याने घोषित केलेल्या आचारसंहितेत असे करू नये आणि केले तर किमान दाखवू नये, असा विचार पुढे आला आहे. आपले व्यक्तिगत जीवन दर्शनीय असावे; ते प्रदर्शनीय होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. हा सारा प्रवास घडत असताना आपण लाखो रुपयांची उधळपट्टी करत असतो, यातून नेमके काय साध्य होते, याचा विचार करायला हवा. मुळात ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, ते लोक हा मार्ग अनुसरण करतात. मात्र काहीजण ऐपत नसतानाही समाजाला दाखवता यावे, यासाठी हा सगळा मार्ग अनुसरतात. काही वेळा तर यासाठी मुलीकडील मंडळींकडून पैसे उकळले जातात. अनेकदा हा सर्व खर्च नवरीच्या मंडळींकडून होईल, याची वराकडील मंडळी पुरेपूर काळजी घेताना दिसतात.
 
लग्नाच्या निमित्ताने महानगरे आणि शहरे यांची तुलना केली, तर हा खर्च न परवडणारा आहे. शेवटी आपल्याला समाजातील प्रतिष्ठेसाठीच हे सारे करायचे असेल, तर परिस्थिती नसतानादेखील वाट चालावी लागणार आहे. लाखो रुपयाच्या खर्चासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अनुसरला जाणार, हे निश्चित. मुळात अलीकडे लग्नाच्या निमित्ताने होणारे प्रदर्शन पाहिले की, एखादी मध्यमवर्गीय व्यक्ती हे सारे करू शकेल अशी परिस्थिती नाही. मात्र, प्रतिष्ठा आणि त्यासाठीचा असलेला सामाजिक दबाव म्हणून, हे मार्ग अनुसरणे घडत आहे. सध्या आपल्या राज्यातील महानगरे आणि ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांतील विविध खर्चावर नजर टाकली आणि ही आर्थिक उलाढाल पाहिली, तर मन थक्क होते. साधारणपणे ‘प्री वेडिंग शूट’साठी 50 हजार ते पाच लाख रुपये मोजावे लागतात. लग्नासाठी, साखरपुड्यासाठी, हळदीसाठी लागणारा हॉलचा खर्च एक लाख ते दहा लाखांपर्यंत येतो. अर्थात, हा खर्च तर यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी हे करावे लागणार असल्याने, त्यात तडजोड होताना दिसत नाही. जेवणाचा खर्च सहा लाख ते 14 लाख रुपये येतो. त्यात उपस्थितांची गर्दी किती होते, यावरच ते अवलंबून असते. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ 15 लाख ते 50 लाख, ‘रिसॉर्ट वेडिंग 18 लाख ते 25 लाख, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी दोन लाख आणि बस्ता, मानपान तीन लाख ते दहा लाख इतका खर्च साधारण स्वरुपात येतो. आता हा खर्च विशेषतः मुलीच्या लोकांना न परवडणाराच असतो, मुलाकडील लोकांना मात्र तो हवा असतो. आपल्या मुलीच्या कल्याणासाठी मातापिता हा खर्चाचा बोजा पेलतात. मुलीच्या आयुष्यातील उद्याचा दिवस अधिक सुखमय असावा, म्हणून ही तडजोड केली जाते. मात्र, हा होणारा खर्च नवरीकडच्या मंडळींना कर्जात टाकणारा असतो. जीवनभर जे कमावले, ते गमावावे लागते. त्याप्रमाणेच, काढलेल्या कर्जाचे हप्ते भविष्यात भरण्यासाठीदेखील त्या मातापित्यांचे आयुष्य खर्च होते. ग्रामीण भागात अनेकदा शेती विकण्याचा प्रयत्नही पालक करतात आणि त्यातून लग्नाचा सोहळा पार पाडला जातो. यातील किती खर्च योग्य ठरेल, याचा विचार करण्याची गरज आहे. नव्या आचारसंहितेत 100-200 लोकांची उपस्थिती असावी, असे म्हटले आहे. तसे घडले तर जेवणाचा खर्च, मानापानाचा, हॉलचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल. 
 
कोरोनाच्या काळात लग्नाची उपस्थितीदेखील 50 लोकांचीच होती. त्या वाटेने आपला प्रवास झाला, तर बरेच काही साध्य होऊ शकेल. त्यामुळे त्यासंदर्भाने गंभीर विचार करण्याची गरज आहे. हुंडा म्हणून रोख रक्कम आणि मागितले जाणारे सोने, हे लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. समाजात भपकेबाज लग्न आणि हुंडापद्धतीमुळे निष्पाप विवाहितांचे हुंडाबळी जाऊ लागले आहेत. वाढत्या हुंडाबळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता, समाजातील धुरिणांनी हुंडा पद्धतीला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करावी, अशी सूचना समोर आली आहे. त्यादृष्टीने त्यांनी जाहीर केलेल्या आचारसंहितेत “लग्नात नवरीकडून हुंडा घेऊ नका. मुलामुलीच्या लग्नासाठी कर्ज काढू नका. ‘प्री वेडिंग’ बंद करा. मुलीच्या नावे मुदतठेव करा. साखरपुडा, हळदी, लग्न एकाच दिवशी करा. पाच पदार्थांचे मराठमोळे जेवण ठेवावे. लग्न सोहळ्याला 100 ते 200 लोकच बोलवा. लग्नात डिजे, बॅण्डऐवजी पारंपरिक वाद्ये ठेवा,” अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लग्न हा संस्कार आहे. त्याचे स्वरूप आहे तसेच राहील, याची काळजी घ्यायला हवी. आज हे भपकेबाज लग्न पाहिले की, मुलीच्या बापाची झोप उडते. त्यातून त्याच्या जीवाचा घोर वाढतोे आणि अशा आत्महत्या पाहिल्या की, त्याची काळजी जीवनभर वाढतच जाते. त्यामुळे या आचारसंहितेच्या निमित्ताने पावले पडतील, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. कोणी तरी एकाने पाऊल टाकले की, भविष्यात त्या मार्गाचा महामार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुले यांच्या पहिल्या शाळेत केवळ सहा मुली होत्या. आज देशात सुशिक्षित मुलींची संख्या आश्चर्यकारक दिसत आहे. त्यामुळे आज आचारसंहितेची असलेली अरुंद वाट उद्या निश्चित रुंदावेल, यात शंका नाही.
 
मराठा समाजाने हे टाकलेले पाऊल आदर्शाची वाट आहे. अर्थात हे केवळ मराठा समाजात घडत आहे असे नाही, तर समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या विवाह प्रथेमध्ये याच पाऊलवाटा चालल्या जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या धुरिणांनी आचारसंहितेचा विचार करत नव्या वाटा चालण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याच वाटा सर्व समाजाने चालण्याची गरज आहे. यात समाजाचे हित आहे. काल वैष्णवीचा बळी गेला आहे, त्या वाटेने समाजातील कोणत्याही मुलीचा बळी जाऊ नये. त्याचबरोबर लग्न सोहळा जेव्हा पार पडत असतो, तेव्हा दोन कुटुंबांमध्ये नात्याचा बंध बांधला जात असतो. त्या बंधात प्रेम, जिव्हाळा, ममत्वाचा धागा असायला हवा. मुळात दोन्ही कुटुंबांत हे घडणार नसेल, तर तो संस्कार कसा? त्याचबरोबर नातेच बांधणे घडत नसेल, तर तो व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. विवाह सोहळ्याचा संस्कार ठरेल, तर जीवनाच्या नव्या वाटा निर्माण होऊन समाजाचे उत्थान घडेल, अन्यथा हा सारा व्यवहारच राहण्याची शक्यता आहे.
 
- संदीप वाकचौरे 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121