विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या सामरिक स्वावलंबनाचे नाणेही खणखणीत वाजवले.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही एकविसाव्या शतकातील भारताच्या संरक्षण धोरणातील एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी संकल्पना ठरली आहे. भारताच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल 1999 सालच्या कारगिल युद्धानंतर झाला. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कडक लष्करी कारवाई करत पाकिस्तानच्या घुसखोरीचा निर्णायक प्रतिकार केला. मात्र, त्यानंतर काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पाकिस्तानबाबतचे धोरण अधिक मवाळ आणि संयमशील राहिले, ज्यामुळे पाकिस्तानला आक्रमक भूमिका घ्यायला प्रोत्साहन मिळाले. 2014 सालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. सर्जिकल स्ट्राईक (2016) आणि ‘एअर स्ट्राईक (2019) यांसारख्या धाडसी मोहिमा राबवून, भारताने पाकिस्तानला थेट त्याच्या सीमांवर आणि आत खोलवर घुसून धडा शिकवला. यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे जाळे आणि सैनिकी तळ कमकुवत करण्यात मोठे यश मिळाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने तर या यशाच्या मालिकेत पराक्रमाचा कळस गाठला.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने कराची ते इस्लामाबादपर्यंतच्या अनेक ठिकाणी अचूक आणि समन्वित हल्ले केले. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला, ज्यामुळे त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार सिस्टम पूर्णतः निकामी झाली. यामुळे पाकिस्तानच्या लष्कराचे मनोबल खचले आणि त्यांची प्रतिकारशक्तीही खूपच कमकुवत झाली. पाकिस्तानने अनेकदा अण्वस्त्रांच्या धोक्याचा वापर करून भारताला ‘न्यूक्लियर ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ने या ‘ब्लॅकमेलिंग’च्या धोरणावर कडक प्रहार केला. भारताने यावेळी अत्यंत मर्यादित ‘ऑपरेशन’मध्येही पाकिस्तानला निर्णायक धक्का दिला, ज्यामुळे त्यांचे ‘न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग’ कचर्यात पडले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, पाकिस्तानच्या कारवायांना आता भारत आपल्या पद्धतीने आणि आपल्या अटींवरच उत्तर देईल. यापुढे पाकिस्तानला उत्तर फक्त भाषणांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कारवाईतून दिला जाईल. यामुळे भारताने केवळ सामरिक विजय मिळवला नाही, तर जगभरात आपली सामरिक शक्ती आणि स्वावलंबनाची ओळखही अधोेरेखित केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ एक लष्करी मोहिमाच नव्हे, तर भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक निर्णायक टप्पा ठरला. या मोहिमेने भारताचा जागतिक स्तरावर संरक्षण आणि तांत्रिक स्वावलंबनात एक नवा मानदंड स्थापित केला. एवढेच नाही तर, यापुढील संघर्ष अधिक तांत्रिक, जलद आणि निर्णायक असतील, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. त्यामुळे भारत या नव्या युगातील युद्धासाठी सज्ज असल्याचे आपण जगाला दाखवून दिले.
आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपात जिथे तांत्रिक नवकल्पना आणि कुशल युद्धनीती सैन्य धोरणाला आकार देतात, तिथे भारताने राष्ट्रीय हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने ओळखले जाणारे हे ‘ऑपरेशन’ फक्त सामरिक यश नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे एक प्रभावी उदाहरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ उदयास आले, तेव्हा नवनवीन युद्धप्रकारांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या अचूक सैन्य प्रतिसादाचा विचार करण्यात आला. एप्रिल 2025 साली पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा (एलओसी) किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याशिवाय दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक आणि समन्वित हल्ले केले.
दि. 7 आणि दि. 8 मे रोजीच्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील प्रमुख लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा नापाक प्रयत्न केला. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट यांसारख्या ठिकाणांवर झालेले हे हल्ले भारताच्या एकात्मिक ‘काऊंटर युएएस’ (मानवरहित हवाई प्रणाली) आणि हवाई संरक्षण प्रणालींनी प्रभावीपणे निष्फळ केले. या यंत्रणांमध्ये रडार, नियंत्रण केंद्रे, तोफखाना, जमिनीवर आधारित क्षेपणास्त्र प्रणाली, तसेच ‘आकाश’सारखी स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली समाविष्ट होती. ‘आकाश’ ही कमी पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाईल प्रणाली आहे, जी एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा लक्ष्यभेद करू शकते आणि अत्याधुनिक ‘इलेक्ट्रॉनिक काऊंटर-काऊंटर मेजर्स’ (इसीसीएम) वैशिष्ट्ये असलेली आहे.
दि. 8 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील लाहोरजवळील अनेक महत्त्वाच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. हे हल्ले लोहक टार्गेट्सना नष्ट करण्यासाठी ‘सुसाईड ड्रोन’ (लोइटरिंग म्युनिशन)चा वापर करून करण्यात आले. या मिशनमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केवळ 23 मिनिटांत चिनी पुरवठादार प्रणालींना हद्दपार करीत मोहीम यशस्वी केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानच्या चिनी मूळच्या ‘पीएल-15’ क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांसह तुर्कीये-मूळाच्या ड्रोनचे तुकडे जप्त केले, ज्यामुळे भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची कार्यक्षमता अधोरेखित झाली. या यशात ‘इस्रो’च्या 24 तास सक्रिय असलेल्या किमान दहा उपग्रहांचे महत्त्वपूर्ण योगदानही तितकेच होते. त्यांनी भारताच्या सीमांचे सतत निरीक्षण करून सैन्य दलांना अचूक माहिती दिली, ज्यामुळे युद्धभूमीवरील निर्णयक्षमता सुधारली.
सध्या 550 हून अधिक कंपन्या आणि 5 हजार, 500 पेक्षा अधिक ड्रोन पायलट्ससह, ‘ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया’ (डीएफआय) भारताला 2030 सालापर्यंत ‘जागतिक ड्रोन हब’ बनवण्याच्या दिशेने पुढे नेत आहे. यात ‘अल्फा डिझाईन टेक्नोलॉजीज’, ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स’, ‘पारस डिफेन्स’ आणि ‘आयजी ड्रोन’ यांसारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने या उद्योगाला नवीन उंचीवर नेले आहे. अत्याधुनिक ड्रोन आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानावर आधारित प्रणालींची निर्मिती या क्षेत्रात भारताला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यास मदत करेल. 2029 सालापर्यंत भारताचे संरक्षण निर्यात 50 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणार आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात तांत्रिक प्रगतीमुळे भारताला फक्त सामरिक आघाडी मिळाली नाही, तर आर्थिकदृष्ट्याही मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24 हजार कोटी रुपयांची विक्रमी निर्यात झाल्याचे नोंद झाले आहे. हे एक स्पष्ट संकेत आहे की, स्वदेशी संशोधन, विकास आणि उत्पादनातील गुंतवणूक भारताच्या सामरिक सामर्थ्याला अधिक मजबूत करते.
एकूणच काय तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ एक सामरिक विजय नाही, तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. खासगी क्षेत्रातील नवोपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील अंमलबजावणी आणि लष्करी धोरण यांच्या प्रभावी संयोजनाने भारत एक प्रगत आणि आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उभे राहत आहे. भविष्यातील संघर्ष तंत्रज्ञानाच्या बळावर लढले जातील आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले आहे की, भारत या नव्या युगासाठी पूर्णपणे सज्ज आहे.