‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जसा भारतीय सैन्याचा पराक्रम चर्चेत आला, तसेच पकिस्तानच्या फाळणीच्या चर्चेलाही उधाण आले होते. त्यातच बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित करून भारत, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांकडे पाठिंबादेखील मागितला. त्यामुळे पाकिस्तानचे तेथील प्रांतांवर होणारे जुलूम उघड झाले. पाकिस्तानातील परिस्थितीचा हा आढावा...
महाभारतात किरात आणि अर्जुन यांच्या युुद्धाची कथा आहे. तीर्थयात्रा करीत फिरत असलेल्या अर्जुनाला एक महावराह-खूप मोठा रानडुक्कर दिसतो. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतो. त्याचवेळी समोरून एक किरात शिकारीही त्या वराहावर बाण सोडतो. किरात म्हणजे वनामध्ये राहणारी एक जमात. वराह ठार होतो. तो कुणाच्या बाणाने ठार झाला; म्हणजेच शिकारीवर हक्क कुणाचा, यावरून अर्जुन आणि किरात यांच्यात चांगलीच जुंपते. एका सामान्य किराताने आपल्याशी भांडण करावे, याचा अर्जुनाला सहाजिकच संताप येतो. गोष्टी बोलाचालीवरून द्वंद्वयुद्धावर येतात आणि अर्जुन आश्चर्याने थक्क होतो. महाधनुर्धर अर्जुनाचे मर्मभेदक बाण तो सामान्य किरात लीलया परतावून लावत असतो. यथावकाश भगवान शंकर ते किरातरूप टाकून आपले मूळ रूप प्रकट करतात आणि ‘युद्धात कुणालाही सामान्य समजण्याची चूक करू नये,’ हा महत्त्वाचा घडा अर्जुनाला देऊन नाहीसे होतात.
ही झाली पाच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. किरात ही वन्य जमात म्हणून ओळखली जात असे. पण किरात लोक हे अत्यंत कुशल आणि शूर असे योद्धे होते, हा मुद्दा यातून अधोरेखित होतो.
आता दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट ऐका. जग जिंकण्याच्या ईष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इत्यादि प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झाले आणि पर्शियन सम्राट दरायस दुसरा याच्या सैन्याचा चक्काचूर उडाला. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळले.
आणि आता गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ पडली अनेक छोट्या छोट्या गणराज्यांशी. एक नगर म्हणजे एक राज्य इतकी छोटी असणारी ही गणराज्ये, तलवारीला भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवले, रडवले. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरु किंवा पोरसची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमधले एक होते किरात जमातीचे राज्य.
म्हणजेच आधुनिक जगातले कलात. आजच्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले एक शहर कलात! ऋग्वेद काळातला भलान आणि बौद्ध ग्रंथांमधला बलोक्ष म्हणजेच, आजचा बलोक्षस्थान किंवा बलुचिस्तान.
आपणा मराठी माणसांची काही नमुनेदार वैशिष्ट्ये आहेत. कुणाही दक्षिण भारतीयाला आपण खुशाल ’मद्रासी’ ठरवून टाकतो. दक्षिण भारतात तामिळनाडूसह कर्नाटक, आंध्र आणि केरळ हे प्रांतसुद्धा आहेत नि तिथल्या रहिवाशांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, हे आपल्या गावीच नसते. तसेच, सगळे उत्तर भारतीय म्हणजे ’भय्ये’ आणि जरा पिचपिचे डोळे दिसले की ’चिनी’ अशी समीकरणे आपण ठामपणे ठरवून टाकलेली आहेत. याच चालीवर कुणीही उंच, धिप्पाड दाढीवाला दिसला की, आपण त्याला ’पठाण’ म्हणून मोकळे होतो.
प्रत्यक्षात पख्तुन किंवा पश्तुन किंवा पठाण वेगळे नि बलुची वेगळे. बलुची लोकांचा बलुचिस्तान हा वेगळा प्रांत आहे. भारताचे जसे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इत्यादि 28 प्रांत आहेत, तसेच पाकिस्तानचे पंजाब, सिंध, वायव्य प्रांत आणि बलुचिस्तान असे प्रांत आहेत. प्राचीन किरांताप्रमाणेच आधुनिक बलुचीदेखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ’लढवय्या जाती-मार्शल रेसिस’ असे नाव दिले होते. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे रॉयल इंडियन आर्मीमध्ये नियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये ’बलुच रेजिमेंट’ होतीच.
हिरा, माणिक, पाचू या रत्नांप्रमाणेच वैडूर्य नावाचे एक रत्न आहे. निळ्या रंगाच्या या रत्नाला संस्कृतमध्ये वैडूर्यप्रमाणेच असितोपल असेही नाव आहे. इंग्रजीत त्याला लापिस लाझुली म्हणतात. या रत्नांच्या खाणी गांधार प्रदेशात म्हणजे अफगाणिस्तानातल्या बदख्शान भागात आहेत. तिथून ती रत्ने बलुचिस्तानमार्गे पंजाब, राजस्थान, गुजरातपर्यंत येत असत. हिंगलाज माता मंदिर हे नाव आपण नक्कीच ऐकले असेल. ही हिंगला किंवा हिंगुला देवी हे आजच्या बलुचिस्तानातले एक अत्यंत जागृत देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू, विशेषतः मारवाडी आणि कच्छी हिंदू पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात.
इस्लामी आक्रमकांनी आणि पोर्तुगीज पाद्-यांनी भारतातील असंख्य तीर्थस्थाने उद्ध्वस्त केली. असंख्य मंदिरे मोडून तिथे मशिदी, दर्गे आणि चर्चेस उभारली. पण अशीही काही ठिकाणे आहेत की, जिथे त्या दैवताने या आक्रमकांना चांगलाच धडा शिकवला. हिंगलाज माता हे त्यांपैकीच एक स्थान आहे. त्यामुळे बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ’बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असे कालीमातेचे स्थान आजही आहे.
स्वातंत्र्यासाठी अलेक्झांडरसारख्या बळवंताशी बेधडक टक्कर घेणारे बलुची, इस्लामी आक्रमणासमोर मात्र फिके पडले. गांधार, पश्तुन, बलुची सगळेच मूळचे हिंदू. ते बाटून मुसलमान झाले. वायव्य भारताने आपली युगयुगीन हिंदू परंपरा सोडून परकीय अरबी, तुर्की उपासना पद्धती का स्वीकारली, हा एक मोठाच प्रश्न आहे.
पण तरीही अल्पप्रमाणात का होईना, तिथे हिंदू होते. भारतातल्या असंख्य संस्थानांमध्ये कलात हेदेखील एक संस्थान होते. यार मुहम्मद खान हे कलातचे संस्थानिक नवाब होते. बलुचींना पाकिस्तानात सामील होण्यात कसलेही स्वारस्य नव्हते. पाकिस्तान बनवण्याची कल्पना मुंबई आणि लंडनमध्ये राहणार्या, मूळ गुजराती भाषिक असलेल्या महमंद अली जिनांची आणि त्यांच्याजोडीने उत्तर प्रदेशी मुसलमानांची. नंतर त्यांच्या पंगतीला आले पंजाबी मुसलमान. पण ही सगळ्या घडामोडी नि कारस्थाने शिजत होती लंडनमध्ये, मुंबईत, दिल्लीत, लाहोरात नि कोलकात्यात. ज्या खैबर नि बोलन खिंडींमधून इस्लामने भारतावर आक्रमण केले असे म्हटले जाते, या खिंडीच्या परिसरातल्या पठाणांना आणि बलुचींना या बनावात काहीही स्वारस्य नव्हते.
पण अकस्मात फाळणीच्या रुपाने आकाशीची कुर्हाड कोसळली. कोट्यवधी हिंदू परागंदा झाले. लक्षवधी हिंदू कत्तल झाले. फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे 54 हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारांवर आली. हिंदू देशोधडीला लागले. पठाण नि बलुची हे मुसलमान होते म्हणून मोठेसे सुखात होते असे नाही. पठाणांचे नेते अब्दुल गफारखान यांनी तर भारताच्या निधर्मी नेत्यांना ’आम्हाला लांडग्यांसमोर टाकण्यात आले आहे,’ अशा शब्दांत फटकारले. कोण होते हे लांडगे? पाकिस्तानची सगळी सत्तास्थाने हडपून बसलेले पंजाबी मुसलमान.
पाकिस्तानात पंजाब, सिंध, वायव्य प्रांत आणि बलुचिस्तान असे प्रांत आहेत. भारताकडून हडपलेला दोन तृतीयांश काश्मीर हाही एक प्रांत आहे. मुळात बंगाल हासुद्धा एक प्रांत होता. तो 1971 साली बांगलादेश या नावाने स्वतंत्र झाला. पण उर्वरित पाकिस्तानात काय स्थिती आहे? सिंधी, पठाण, बलुची, काश्मिरी हे कुणीही सुखी नाहीत. कारण संपूर्ण सत्ता पंजाब्यांच्या हाती एकवटलेली आहे. अयुबखान, याह्याखान, झिया-उल-हक, परवेझ मुशर्रफ हे सगळे लष्करशहा पंजाबी होते. झुल्फिकार अली भुत्तो आणि बेनझीर भुत्तो हे सिंधी होते; पण बहुधा यामुळेच त्यांचा काटा काढण्यात आला. पंजाब्यांच्या खालोखाले वजन असलेल्या सिंध्यांची ही दशा, तर पठाण नि बलुची यांना कोण विचारतो! सगळ्यांत केविलवाणी स्थिती उत्तर प्रदेशी मुसलमानांची. त्यांनी दंगे करून भारताच्या निधर्मी नेत्यांना घाबरवून सोडले आणि पाकिस्तानचे दान पदरात पाडवून घेतले. याबद्दल त्यांना बक्षीस काय मिळाले; तर त्यांना ‘मुहाजीर’ म्हणजे ’परके’ ही पदवी मिळाली.
अलीकडेच इस्लामाबादच्या ‘डेली टाईम्स’ या वृत्तपत्रात मुहम्मद अकबर नोटेझाई नावाच्या पत्रकाराने, ‘बलुचिस्तानातल्या हिंदूंची दयनीय स्थिती’ या विषयावर एक लेख लिहिला आहे. “1947 पूर्वी बलुचिस्तान प्रांतात 54 हजार हिंदू होते; ते फाळणीनंतर फक्त साडेतीन हजार राहिले,” असे त्यानेच म्हटले आहे आणि “आता सततच्या धमक्या, जबरदस्तीची धर्मांतरे, बायका पळवणे यांना कंटाळून तेदेखील स्थलांतर करीत आहेत,” असे तो म्हणतो. नोटेझाई पुढे म्हणतो की, “जुन्या बलुची मुसलमानांना हे माहीत होते की, हे हिंदूदेखील आपल्यासारखेच पिढ्यान्पिढ्या येथे राहात आहेत. त्यामुळे लाहोर आणि कराचीत जशा हिंदूंच्या बेछूट कत्तली झाल्या, तितक्या बलुचिस्तानातल्या क्वेट्टा आणि कलातमध्ये झाल्या नाहीत. पण आता नव्या बलुची पिढीला हे काहीच माहीत नाही. यामुळे हिंदूंचा छळ वाढत चालला आहे.”
नोटझाईच्या या लेखावर एक बलुची विद्वान डॉ. शाह मुहम्मद मर्री याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डॉ. मरी म्हणतो, “हिंदूंनाच जीणे अवघड झालेय असे नव्हे; आम्ही बलुची, पठाण, हाजरा, ख्रिश्चन सगळेच हैराण झालोय. ही सगळी भूमीच (म्हणजे बलुचिस्तान प्रांत) जळत आहे. सगळ्याच जाती आणि जमाती सुरक्षित आसरा शोधण्यासाठी स्थलांतर करतायत.”
पाकिस्तान निर्माण होऊन आता 78 वर्षे उलटली. प्रशासन आणि लष्कर यांवरची पंजाब्यांची पकड काही सुटत नाही. त्यामुळेच बलुची, पठाण, सिंधी सगळ्यांनाच स्वतंत्र व्हायचेय आणि त्यामुळेच, त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरतोय. देशाच्या उत्पन्नाचा (म्हणजे अमेरिकेकडून येणार्या कोट्यवधी डॉलर्सचा) सगळा ओघ पंजाबमध्येच अदृश्य होतो. इतर प्रांतांना काहीच मिळत नाही. अशी आहे बलुचिस्तानची सध्याची दशा.
मल्हार कृष्ण गोखले