आपले मत किती अमूल्य आहे, हे त्याला चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले की लक्षात येते. असे असले तरी, अलीकडील काळात म्हणजेच, हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून, या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो मतदार. त्याला राजा म्हणूनच गौरविले जाते. निवडणुकीत हा राजा कुणा कुणाचा ‘कार्यक्रम’ करतो, हे आपण नेहमीच बघत आलो आहोत. त्यामुळे निवडणुकीत जेवढे महत्त्व मताला आहे, तेवढे अन्य कशालाच नाही. मात्र, या मतदार राजाची उदासीनता अलीकडील काळात अधिक जाणवते. लोकशाही बळकट होण्यासाठी, त्याचा मतदान प्रक्रियेतील सहभाग खूप मौलिक असतो हे सर्व राजकीय पक्षांसहित, समाजातील सुजाण घटकांना देखील उमजले आहे. आयोग आणि प्रशासनाने तर अनेक युक्त्या शोधल्या आहेत. मतदाराने लोकशाही बळकटीसाठी, या मतदान प्रक्रियेकडे उत्सवासारखे बघावे आणि त्यात योगदान द्यावे, हा त्यामागील खरा हेतू आहे. तथापि उथळ आवाहन, राजकारणातील वाईट घटनांना घेऊन मतदार कुठल्यातरी विशिष्ट हेतूने किंवा न्यूनगंड बाळगून, मतदानासाठी बाहेर पडत नाही. अर्थात आपले मत किती अमूल्य आहे, हे त्याला चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले की लक्षात येते. असे असले तरी, अलीकडील काळात म्हणजेच, हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून, या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करताना, मुख्य निवडणूक आयुक्तांनी या मूल्यवान मताचे महत्त्व पटवून सांगितले आणि या मतदारांचे अभिनंदनही केले. अलीकडील काळात तर समाजातील अनेक घटक देखील, यासाठी पुढाकार घेत असल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. आपल्या प्रांताच्या विकासासाठी, विश्वासार्ह व्यक्ती निवडून देण्याची संधी ही पाच वर्षातून एकदाच येत असते. त्यामुळे मतदाराने सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून, हा प्रयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान करायचे नाही ही उदासीनताच मोठी धोकादायक आहे. आपल्या राज्यात देखील लोकसभा निवडणुकीच्या वेळी, प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने हा उत्सव अधिक उत्सहात साजरा व्हावा म्हणून, अनेक चांगले प्रयोग केलेले आहेत. तरीही मतदानाची टक्केवारी तितकी लक्षणीय नव्हती, त्यामुळे मतदारांनी किमान यावेळी ही जाणीव ठेऊन, आपल्या अमूल्य मताचा प्रयोग करावा एवढेच सुचवावे वाटते.
प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाचा
जचा काळ हा तंत्रज्ञान मैत्रीचा. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या देशाची सूत्र हाती घेतली, तेव्हापासून खरेतर देशातील प्रत्येक नागरिक तंत्रज्ञानप्रेमी झाल्याचे बघायला मिळत आहे. केवळ हे त्याचे प्रेम म्हणजे मनोरंजनापुरते राहिले नाही, तर अगदी सामान्य व्यक्तीपासून ते उच्च दर्जाच्या व्यक्तीपर्यंत या तंत्रज्ञानाचा उपयोग करताना, हे घटक आपल्या रोजच्या गरजांशी एकरूप झालेले बघायला मिळत आहे. डिजिटल पेमेंट असो की, एकमेकांशी संवाद, माहितीचे आदान-प्रदान असो की, शिक्षण-प्रशिक्षण या तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या उमेदी जाग्या होत आहेत. काळानुसार बदलले पाहिजे हे रोज डिजिटल व्यवहार होत आहेत आणि त्यात सामान्य माणूस देखील सहभागी होत आहे, यामुळे सिध्द झाले आहे. रोजच्या वस्तुच्या खरेदी-विक्री अथवा अन्य आर्थिक व्यवहार असोत, ते तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांमार्फत केले गेले पाहिजेत, हे प्रतिबिंबित होणे आपल्या देशाच्या प्रगतीचे चांगले लक्षण मानले पाहिजे. याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्यामुळे देशाच्या प्रगतीला गेल्या दहा वर्षात केवळ या तंत्रज्ञानानेच हातभार लावला आहे. विशेष म्हणजे आता जे ‘एआय’ हे नवे तंत्रज्ञान आले आहे. त्याने तर विविध क्षेत्रात प्रगतीची दारे खुली केली आहेत. केवळ याचा उपयोग सकारात्मक रित्या केला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी लागेल.
इथे हे सर्व अधोरेखित करण्याचे प्रयोजन एवढेच की, आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपल्या निवडणूक यंत्रणेने, याच तंत्रज्ञानाचा आधार घेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबिवले आहेत. मतदाराने हे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि लोकशाही सुदृढतेची जाणीव ठेवून निभवावे, म्हणून ‘स्वीप टीव्ही व्होट-रोबो’ असे प्रयोग अंगिकारले आहेत. अहिल्यानगरच्या निवडणूक यंत्रणेने, मतदार जागृतीसाठी ‘एआय’चा वापर करत तरूण पिढीला मतदान केंद्र, विधानसभा आणि संसद भवनाची व्हर्चुअल टूर घडविण्याचे ठरविले आहे. शिवाय ‘व्होट-रोबो’च्या माध्यमातून, गर्दीच्या ठिकाणी मतदान जागृती, क्युआर कोडच्या माध्यमातून वेबसाईट लिंक डॉक्यूमेंट अॅप, असे सुमारे ५० क्यूआर कोड निर्माण केले आहेत. देशातील पहिला अहिल्यानगर ‘स्वीप केअर’ 9002109003 असा व्हॉट्सअॅप क्रमांकही त्यात असणार आहे.
अतुल तांदळीकर