सेवा समर्पण भाव

    02-May-2023
Total Views | 162
idc

भारत विकास परिषद १९६३ पासून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या पंचसूत्रीद्वारे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे सेवा समर्पण भाव ठेवून अनेक प्रकल्प चालविले जातात. यापैकी एक आहे पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्र. १९९७ पासून गेली २६ वर्ष हा प्रवास न थांबता चालू आहे. हा समाजाने समाजासाठी चालविलेला मोफत व कोणतीही सरकारी मदत न घेता चालविलेला उपक्रम आहे. अनेक दिव्यांगाना विविध प्रकारचे मोफत अवयव बसवून आत्मविश्वास मिळवून दिला आहे. संस्थेच्याबद्दल माहिती या लेखात मांडली आहे.

भारतात अनेक संस्था दिव्यांगाच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय विचाराची स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व राष्ट्रभाव व राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी संस्था आहे. सेवा आणि संस्कार क्षेत्रात निस्वार्थीपणे १९६३ पासून कार्यरत आहे. भारतभरात १ हजार, ४०० शाखा आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त सभासद या संस्थेशी निगडित आहेत संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या पंचसुत्रीद्वारे शैक्षणिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक विकास साधण्यात संस्था अग्रेसर आहे.

१९६२ साली झालेल्या चीनच्या युद्धात प्रधानमंत्री नेहरूंनी आखलेल्या चुकीच्या धोरणांमुळे भारताला मानहानी स्वीकारावी लागली. या युद्धात भारतीय सैन्याची अपरिमित हानी झाली अनेकांना वीरगती प्राप्त झाली, तर हजारो भारतीय सैनिक जायबंदी होऊन विकलांग झाले. या सैनिकापुढे काय असा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी जयपूर फुटची निर्मिती होऊन या जायबंदी सैनिकांना तात्पुरता आधार मिळाला व कोणावरही विसंबून न राहता हालचाली करणे सोपे होऊ लागले. तरी या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भारत विकास परिषदेने ६० वर्षांपासून विकलांग नागरिकांसाठी काम सुरू केले. आज विविध राज्यांमध्ये मिळून कायम स्वरुपी १३ विकलांग केंद्र कार्यरत आहेत. दरवर्षी यातून २० हजार नागरिकांना मोफत हातपाय कँलिपर बसवले जातात.

२०१४ पूर्वी दिव्यांग व्यक्तीला अपंग म्हणून ओळखले जायचे. पण, मोदी सरकारने दिव्यांग हे नाव प्रचलित केले. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगातवाचे एकूण २१ प्रकार आहेत अंधत्व, कर्णबधिर, वाचा दोष, अस्थीभंग, मानसिक आजार, स्वमग्नता, बहुविकलांगता, कुष्ठरोग, मतिमंद, कंपवात, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, असे त्यातील प्रमुख प्रकार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, सुमारे २.६८ दिव्यांगजन भारतात आहेत म्हणजे लोकसंख्येच्या दोन टक्के दिव्यांग आहेत, तर त्यातील ५४ लाख व्यक्ती हातापायांने विकलांग आहेत व त्यात दरवर्षी चार लाख लोकांची भर पडत आहे.

दिव्यांगातील काही व्यक्तींनी आपल्या सर्व दोषांवर मात करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. आपल्यातील व्यगाचे अवडंबर न माजवता सशक्त व्यक्तींना लाजवेल, अशी कामगिरी केली आहे. लहानपणी रेल्वे अपघातात पाय गमवावे लागलेल्या गिरीश शर्मा यांनी बॅडमिंटन स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केली आहे. फक्त एका पायावर बॅडमिंटन खेळत पँरा ऑलिंम्पिकच्या आशियाई स्पर्धेतसुवर्णपदक पटकावले. शेखर नाईकसारख्या कर्नाटकातील अंध क्रिकेटपटूला त्याच्या कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा चंद्रन भरतनाट्यम् नृत्यांगना व अभिनेत्री आहेत. १७ वर्षांची असताना अपघातात एक पाय गमवावा लागला. पण, त्याची तमा न बाळगता भरतनाट्यम् क्षेत्रात प्रावीण्य मिळविले व अनेक चित्रपट व मालिकात काम करून रसिकांची वाहवा मिळवली. डॉ. सुरेश अडवानीची कथा आगळीवेगळी आहे. आठव्या वर्षी पोलिओमुळे दोनही पाय गमवावे लागले. सुरेशजी मुंबईतील जसलोक, रहेजा, व टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००२ मधे ‘पद्मश्री’पुरस्कार व २०१२ साली ‘पद्मभूषण’पुरस्काराने सुरेश यांना सन्मानित केले.अरूणिमा सिन्हा याची कामगिरी उल्लेखनीय आहे.

या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना योग्य सहकार्य मिळाले, तर त्या ध्येय गाठू शकतात या जाणिवेनेच भारत विकास परिषदेचा विकलांग पुनर्वसन केंद्र हा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे. १९९७ पासून पुणे महापालिकेच्या एरवंडणा येथील थरकूडे दवाखाना केंद्रात कायम स्वरूपी विकलांग केंद्र कार्यरत आहे. दरवर्षी सुमारे दोन हजार नागरिकांना मोफत पाय, हात व कँलिपर बसविण्यात येतात. या केंद्राचे ब्रीदवाक्य ‘नरसेवा नारायणसेवा’ असे आहे. कृत्रिम अवयव देऊन आपण कुणावर उपकार करत नाही, तर त्यांच्यात आपण परमेश्वर पाहातो व त्यांची सेवा करायची संधी उपलब्ध झाली आहे, असे यातून प्रस्तुत होते. १९६३ साली तयार करण्यात आलेल्या जयपूर फूट केवळ पाच वर्ष टिकतो, तर या केंद्रातून तयार होणार्‍या अवयवांचे आयुष्य सरासरी २० वर्षांचे असते.

जयपूरच्या फूटपेक्षा वजनाने ही उपकरणे ९० टक्के हलकी आहेत. या विकलांग केंद्रातील वर्कशाँपमध्ये आत्यानुधिक यंत्र सामुग्री वापरून प्रशिक्षित तंत्रज्ञ याद्वारे कृत्रिम पाय, हात, कँलिपर व अर्थासिस सपोर्ट उपकरणे बनवली जातात. दिव्यांगास पाय बनविल्यावर ती व्यक्ती पोहणे, चालणे, पळणे, उडी मारणे, वाहन चालविणे या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत केंद्रावर तज्ज्ञामार्फत सराव व मार्गदर्शन केले जाते. आत्यानुधिक कृत्रिम मॉड्युलर पाय वजनाने हलका, टिकाऊ अणि वापरताना पायाचा घोटा आणि गुडघा इत्यादी सांधाच्या हालचाली सहजरीत्या व विनासायास करता येत असल्यामुळे दिव्यांगाना चालणे बसणे सोपे होते आणि कृत्रिम पाय लावला हे सहज लक्षातही येत नाही.

‘भारत विकास फाऊंडेशन’ व ‘विकलांग केंद्र’ यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. वैयक्तिक देणगीदार व सामाजिक संस्थाचा आर्थिक सहयोग आणि कंपनी ‘सीएसआर’ यांच्या देणगी निधीद्वारे हा सेवा प्रकल्प गेली २५ वर्ष अखंडित चालू आहे. आत्यानुधिक कृत्रिम अवयवांची कमर्शियल किंमत जरी जास्त असली तरीही या केंद्रातील वर्कशॉपमधे केवळ मटेरियल खर्च विचारात घेतला जातो. या केंद्रात चेर्वीश्ररी षेेीं तयार करण्यासाठी रुपये १२ हजार खर्च येतो,तर हाच पाय व इतर अवयव दिव्यांगाना मोफत पुरविले जातात. पण, बाजारात हाच पाय तयार करण्यासाठी रुपये ५० हजार खर्च येतो. याशिवाय कृत्रिम हात, पोलिओ कँलिपर, जयपूर फूट, अँकल फूट,आथाँसिस ही उपकरणे तयार केली जातात. पुणे केंद्रातील सेवेबरोबरच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने भारत विकास परिषदेच्या शाखाच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग शिबीर आयोजित करण्यात येतात वर्षात अशी आठ ते दहा शिबीर आयोजित करण्यात येतात.

केंद्राच्या वाटचालीत दत्तात्रेय चितळे, राजन जोग, विनय खटावकर, अनिरुद्ध पाटणकर इ. सामाजिक कार्यकर्ते मोलाचे योगदान देत आहेत. तसेच, या केंद्रात आठ ते दहा तंंत्रज्ञ व कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करत आहेत. १९९७ मध्ये एका शिबिरात भारत विकास परिषदेच्या माध्यमातून पाय बसविलेल्या एका दिव्यांगाला पाय तयार करण्याचे प्रशिक्षण अहमदाबाद केंद्रात दिले. त्याच कारागिरांची नेमणूक करून पुणे केंद्र सुरू झाले. आता नुकतेच त्याने स्वतःचे वर्कशॉप काढले आहे. आता तो खर्‍या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा आहे. यावर्षी या केंद्राचे २५ वे वर्ष असल्याने पाच हजार विकलांग नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. हा समाजाने समाजासाठी चालविलेला उपक्रम आहे. या समाजोपयोगी प्रकल्पाने नवीन कात टाकली आहे. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करताना समाजाच्या या दुर्लक्षित घटकांकडे माणुसकीच्या नात्याने पाहिले पाहिजे. या कृत्रिम अवयवांमुळे अनेकजण समाजात ताठ मानेने उभे राहात आहेत आणि नेहमीप्रमाणे दुसर्‍या वर अवलंबून न राहता स्वबळावर हालचाली करू शकणार हा आत्मविश्वास या केंद्राने विकलांग नागरिकात निर्माण केला आहे.

वासुदेव कालरा ९४०४२३३७५५

विनय खटावकर ९३२६७३०६६६

सचिन साठ्ये ९१४६८६८४२५

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121