(व:) तुम्हां सर्वांचे (प्रपा) पाणवठे (समानी) एकसमान असोत. तुम्हां सर्वजणांची (अन्नभाग:) भोजनव्यवस्था (सह) एकसारखी राहो. मी (व:) तुम्हांस (समाने) एकसमान अशा (योक्त्रे सह) जुशी, त्याच्याशी संयुक्त दोरीशी (युनज्मि) जोडत आहे. (इव) ज्याप्रमाणे (अरा:) चाकाचे आरे (अभित: ) चोहीबाजूंनी (नाभिम्) नाभीच्या धुर्यांचा, केंद्रबिंदूचा आधार घेतात, त्याप्रमाणे (सम्यञ्च:)सर्वजण मिळून (अग्निम्) प्रकाशस्वरूप परमेश्वराला (सपर्यत) भजावे, उपासना करावी.
विवेचन
कालपरत्वे निर्माण होणार्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या भूतलावर नानाविध विचारप्रवाह उदयास आले. पण, त्यांच्यात त्या त्या समस्यांना दूर करण्याचे पूर्णांशाने सामर्थ्य नसल्याने ते विचार कालबाह्य ठरले. साम्यवादी ही विचारसरणी मुळातच ज्या उद्देशाने पुढे आली, ती धनिक, श्रीमंत वर्गांना संपवून मजूर व कामगारांचे राज्य आणण्यासाठी. पण, हा एकांगीपणा नव्हे काय? एखादा राजा आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळत असेल किंवा एखादा उदारहृदयी श्रीमंत माणूस परोपकाराच्या व दातृत्वाच्या भावनेतून गोरगरिबांचे पालन-पोषण करत असेल, तर मग अशावेळी साम्यवादी दृष्टी कुचकामी ठरत नाही काय? म्हणूनच वेदांची साम्यभावना ही सर्वार्थाने व्यापक ठरते.
आधुनिक साम्यवादात गोरगरिबांना आर्थिक दृष्टीने न्याय मिळावा. तसेच, श्रीमंत हा गरीब व्हावा, राजा रंक बनावा, याच उद्विग्न भावनेतून ती उदयास आली. पण त्यात शत्रुता, वैरभावना, ईष्या, द्वेष, मत्सर इत्यादी दोष दडले आहेत. जर काय राजा हा किंवा श्रीमंत माणूस उदार, दानशूर व गरिबांना न्याय देणारा, सर्वांना समान लेखणारा असेल, तर तो खर्या अर्थाने साम्यवादी म्हणावा म्हणून समानता ही शाश्वत विचारांची, सद्गुणांची व पवित्र भावनांची असली पाहिजे.सृष्टीच्या प्रारंभी वेदांनी आम्हांस साम्यवाद शिकविला आहे. वेदप्रतिपादित साम्यवाद हा मानवतेवर सद्विचारांवर, नैतिकतेवर आधारित आहे. आधुनिक साम्यवादी लोकांप्रमाणे कोणाशीही शत्रुत्व वा वैरविरोध प्रस्थापित न करता किंवा कोणाचाही द्वेष, मत्सर अथवा भेदभाव न करता, दुराग्रह न बाळगता प्रेम, दया, करुणा आणि सहृदयतेतून व्यक्त होतो.
साम्य म्हणजेच समत्वाचा भाव, समानता, समदृष्टी, समानता इत्यादींना प्रतिपादित करणारा विचारप्रवाह म्हणजे साम्यवाद! हा साम्यवाद समाज व राष्ट्रांचा मूलभूत आधार आहे. माणूस म्हणून जगताना सर्वांनी समानता ठेवावी. कधीच कोणाशीही भेदभाव करू नये. आपण सारे एकाच परमेश्वराची संतती. जसे निसर्गातील ऊन, वारा, पाऊस, नद्या, झाडे,पर्वत, चंद्र, सूर्य इत्यादी सर्वांकरिता एकसमान आहेत, त्याचप्रमाणे मानवानेदेखील व्यवहारातील वस्तूंविषयी कधीही भेदभाव बाळगता कामा नये. जगातील प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा अधिकार आहे. ‘सब है भूमि गोपाल की.’ अथवा ‘हे विश्वची आमुचे घर’ अशा प्रकारची उदार व उदार भावना ठेवत प्रत्येकाने व्यवहार करावा. यात कधीही कोणत्याही प्रकारचा स्वार्थी दृष्टिकोन असता कामा नये. सर्वांशी प्रेमाने व सद्भावनेने वागत समत्वाचे नाते जोडावे. यासाठी या मंत्रात प्रारंभीच म्हटले आहे- समानी व: प्रपा, सह वो अन्नभाग:।
पाणी व अन्न ही मानवाची अत्यावश्यक गरज. कारण, यांच्यामुळेच तर मानव अथवा अन्य सर्व प्राणी जीवन धारण करतात. या दोन्हींवरच जगतात. या मूलभूत गोष्टींबाबत जर काय भेदभाव बाळगला, तर मग इतरही क्षुद्र मतभेदांना प्रारंभ होतो. पाणी व अन्न या दोन्हींच्या समानतेतून माणसां-माणसा जवळीकता साधली जाते. ’प्रपा’ म्हणजे पाणवठे अथवा पेयजलाची स्थाने ही सर्वांसाठी खुली असावीत. तिचा वापर करण्याचे अधिकार सर्वांना असावेत. इतरांच्या स्पर्शाने पाणी कधीही अशुद्ध होत नाही. सर्वांनी मिळून पाणवठ्यात पाणी साठवावे. त्यांचे रक्षण करावे आणि ते पाणी उपयोगात आणावे. दुसरा घटक म्हणजे अन्न होय. भोजनाची व्यवस्था कधीही वेगळी असता कामा नये. एखाद्या खालच्या दर्जाची किंवा सामान्य कुळातील व्यक्ती जर काय मनसा-वाचा-कर्मणा पवित्र व निर्मळ असेल, तर त्याच्या हातचे का जेवू नये? त्याने सात्विक व शुद्ध भावनेने, पवित्र अंतःकरणाने बनवलेले अन्न हेच सर्वांनीच ग्रहण करावे. विशेष करून सण, उत्सव किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये भोजनाच्या पंक्ती सर्वांसाठीच मुक्त असाव्यात. सर्वांच्या ताटाला ताट लावून जेवण केल्यास उच्च-नीचतेची दरी नाहीशी होण्यास मदत मिळते.
अन्न व पाण्याच्या बाबतीत झालेला भेदभाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक ठरतो. हे आजपर्यंतच्या इतिहासातून आपण पाहिलेच आहे. सामाजिक समरसता स्थापन करावयाची असेल, तर अन्न-पाण्याच्या वापराबाबतची समानता अंगी बाळगावयास हवी. कारण, हाच समभाव भेदभावनांच्या भिंती मोडीस काढतो व परस्परांना जोडण्याचे काम करतो. वेदमंत्रात परमेश्वराचा संकेत आहे- समाने योक्त्रे सह वो युनज्मि! म्हणजेच हे मानवांनो, मी तुम्हां सर्वांना जुवाप्रमाणे किंवा दोरीप्रमाणे समानतेने जोडतो. योक्त्रम् म्हणजे बैलाच्या खांद्यावरील जू किंवा त्या जुला बांधली जाणारी दोरी शेतात काम करणारे किंवा गाडीला जुंपलेले दोन्ही बैल हे समानगतीने कार्य करतात.
कोणीही मागेपुढे होत नाही. दोघेही एकसारखेच परिश्रम करतात. त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांनी आपापली कर्तव्ये एकसमान गतीने बजावावीत. सर्वांनी मिळून कष्ट करावे. परिश्रमाचा भार प्रत्येकाने उचलावा. लहान असो की मोठा सर्वांनीच कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर एक समानशक्तीने, समान विचारांनी कार्यप्रवण व्हावे.ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी सर्वजण मिळून कामे करतात, तीच भावना सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारही वर्णांनी समानतेने कार्याचा भार वाहावा. कोणीही विश्रांती घेता कामा नये. एकानेच कामे करावीत आणि दुसर्यांनी मात्र आराम करावा, असे झाले तर त्या देशाची प्रगती खुंटल्याशिवाय राहणार नाही म्हणून श्रमाची साम्यता महत्त्वाची ठरते.
सर्व प्रकारची कामे करण्यासाठी सर्वांनी परमेश्वराला केंद्रबिंदू मानावे. समग्र विश्वाचा निर्माता प्रकाशस्वरूप परमेश्वराची उपासना सर्वांनी समानतेने करावी. ज्याप्रमाणे रथाच्या चाकाचे आरे हे चहुबाजूंनी आपल्या मध्यभागीय नाभिकेंद्राचा आधार घेतात, त्याचप्रमाणे सर्वांनी सृष्टीनिर्मात्या भगवंताचा आधार घ्यावयास हवा. वैदिक एकेश्वरवाद हा खर्या अर्थाने वैश्विक ऐक्य वाढवण्याचा मूलभूत उपाय आहे. जर काय जगातील प्रत्येक मानवाने इकडे तिकडे न भटकता एकाच सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, सर्वशक्तिमान, अजर, अमर, न्यायकारी, निराकार अशा प्रभू परमेश्वराची मनोभावे उपासना केली, तर सारा मानव समाज एक होईल. अशीही पाणवठा, भोजनव्यवस्था, श्रमप्रतिष्ठा आणि परमेश्वर उपासना यासंदर्भातील साम्यता निश्चितच समग्र मानवाच्या कल्याणासाठी व वैश्विक एकात्मतेसाठी अतिशय पूरक मानली जाते, म्हणूनच वैदिक साम्यवाद हा खर्या अर्थाने समग्र व्यवस्थेला तारणारा ठरतो.