‘श्री समर्थ रामदास ः एक अभ्यास’ हा सुरेश जाखडी लिखित सुमारे ४५० पानांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. लेखकाने विविधांगांनी सादर केलेला हा परिपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. एकंदर नऊ प्रकरणे व तीन परिशिष्टे यातून लेखकाने रामदासांचे अलौकिक चरित्र, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली, हे सांगताना लेखकाने डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, शंकरराव देव, ल. रा. पांगारकर, वि. का. राजवाडे, प्रा. के. पि. बेलसरे इत्यादी विचारवंतांचेे विचार वाचून प्रेरित केले असे सांगून त्यांचे ऋण मान्य केले आहे. ग्रंथात अनेक ठिकाणी या लेखकांचे ससंदर्भ दाखले देेण्यात लेखकाने आपली बहुश्रुतता व विस्तृत वाचन याचे दर्शन घडवले आहे. तसेच समर्थ संप्रदायातील गिरिधरस्वामी, दिनकरस्वामी, भीमस्वामी, आत्मारामस्वामी इत्यादींच्या साहित्यकृतींचा अभ्यास केल्याचे दिसून येते.
रामदास स्वामी हे भक्तिमार्गी संत असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे तयार होत गेले, हे लेखकाने दाखवून दिले आहे. समर्थांचे बालपण, तीर्थाटन, मठ-महंत, संप्रदाय, सामाजिक अवलोकन, दासबोध विचार दर्शन, विचारधन, शिवछत्रपतींची भेट ही प्रकरणे वाचनीय आहेत. यातील समर्थ-शिवछत्रपती भेट हे प्रकरण महत्त्वाचे असून दोघांचेही कार्यकर्तृत्व स्पष्ट करणारे झाले आहे. या ग्रंथाची सुरुवात समर्थांच्या,
माझी काया आणि वाणी।
गेली म्हणाल अंतःकरणी।
परी मी आहे जगज्जीवनी।
निरंतर॥
या अखेरीस उद्गारलेल्या दिव्य संदेशाने झाली आहे.
अनेक लेखकांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून, त्यावर चिंतन करून जाखडी यांनी आपली मते मांडली आहेत. तथापि, त्या अभ्यासाचा कोठेही गर्विष्टपणे उल्लेख नाही. प्रास्ताविकात लेखक संत तुकारामांच्या उक्तीचा आधार घेत, नम्रपणे पुस्तकातील विचारांविषयी, कबूल करतात की,
फोडिले भांडार धन्याचा हा माल।
मी तंव हमाल भारवाही॥
(संत तुकाराम महाराज)
ग्रंथातील सर्व प्रकरणांतून समर्थांच्या प्रवाही जीवनाचे, कार्यकर्तृत्वाचे दर्शन घडते. हा ग्रंथ कसा आकाराला आला, हे सांगताना लेखक म्हणतात की, “गेली अनेक वर्षे ते दर गुरुवारी दै. ’मुंबई तरुण भारत’मध्ये सातत्याने समर्थ रामदासांवर लेखन करीत आहेत. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद आहे. लेखनावर लोभ जडलेल्या अनेक वाचकांनी याचे पुस्तक व्हावे, अशी इच्छा प्रदर्शित केली. त्या लेखांसाठी झालेल्या अभ्यासातून हा ग्रंथ आकाराला आला.“ हे नुसते समर्थ चरित्र नाही, तर त्यातील जीवन तत्त्वज्ञान, सातत्य, विवेक, विचार, निजध्यास, नीतिमानता, शिस्त, प्रपंचविज्ञान, व्यवहार कुशलता (नेटका प्रपंच), दक्षता, अखंड सावधानता इत्यादी गुणांचा परामर्श घेताना, लेखक त्यात रंगून जातात आणि त्यावर विवेचन करताना कोठेही आखडता हात घेत नाहीत.
समर्थ चरित्र, त्यांचे कार्य प्रेरणादायी असूनही समर्थ विचार या ना त्या कारणाने दुर्लक्षित राहिले, अशी खंतदेखील लेखक व्यक्त करतात. आजवर समर्थांवर अनेक आरोप करण्यात आले. त्यात बहुतेक ठिकाणी कालविपर्यास आढळतो. अशा आरोपांचा यथोचित समाचार लेखकाने संधी मिळेत, तेथे घेतला आहे आणि टीकाकारांचे पितळ उघडे पाडले आहे. या ग्रंथातील ‘सावधान आणि पलायन’ हे प्रकरण छान झाले आहे. रामदास म्हणजे नारायण आपल्या लग्नमंडपातून पळाला, तेव्हा त्याचे वय ११ वर्षे व त्याच्या नियोजित वधूचे वय केवळ पाच-सहा वर्षांचे होते. त्या नियोजित वधूचा कळवळा घेऊन, टीकाकारांनी रामदासांना दोषी ठरवले. तथापि, ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हनुमंत स्वामींच्या बखरीचा व आत्माराम स्वामींच्या ’दासविश्राम धाम’ या ग्रंथातील अवतरणे देत लेखकाने हे सिद्ध केले आहे की, त्या बालिकेचा विवाह त्याच मंडपात दुसर्या वराशी लावून देण्यात आला. रामदासांच्या लग्नासाठी काढलेला मुहूर्त, त्यांच्या देव व देश कार्यासाठी घर सोडण्याचा होता, असे लेखकाने गमतीने म्हटले आहे.
या पुस्तकातील तत्कालीन सामाजिक स्थिती अस्मानी-सुल्तानी, दुराचार्यांची दुष्कृत्ये, एकनाथ आणि रामदास, रामदासांचा विनोद, कवी आणि कवित्व, चाफळचे राममंदिर, दासबोध अभ्यास मंडळे, प्रपंचविज्ञान, प्रयत्नवाद, भिक्षेचा महिमा, कल्याणस्वामी, वेणास्वामी, सत्संग, शिवछत्रपतींची पहिली भेट इत्यादी विवेचनात्मक भाग अभ्यासपूर्ण व विश्वासार्ह झाला आहे. तो वाचनीय आहे. मुद्रणाचा टाईप बारीक निवडला असला तरी पृष्ठसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तो योग्य आहे. ’विबग्योर इम्प्रेशन’चे मुद्रण, ग्रंथबांधणी छान आहे. तसेच रुपाली जोशी यांचे ग्रंथनामाला साजेसे मुखपृष्ठ आकर्षक आहे, तेे लक्ष वेधून घेते. प्रा. शरयू जाखडी, विजया प्रकाशन यांनी हा उत्तम ग्रंथ प्रकाशात आणला म्हणून त्या अभिनंदनास पात्र आहेत.
‘ज्ञानेश्वरी’, ’एकनाथी भागवत’, ’तुकारामांची गाथा’, ’दासबोध’ हे ग्रंथ मराठी भाषेचे, महाराष्ट्राचे वैभव आहे. सत्य, चारित्र्य, नैतिकता, भक्तिप्रेम, उपासना यांवर हे ग्रंथ आधारित असल्याने प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या घरी ते असावेत. ’श्री समर्थ रामदास ः एक अभ्यास’ परिपूर्ण असून या ग्रंथातील अभ्यासदर्शन ते विचारांना चालना देणारे आहे, हाच निष्कर्ष निघतो. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील ओघवती भाषाशैली, सरळ, साधी अर्थवाही भाषा त्यामुळे केवळ समर्थवाङ्मय अभ्यासकासाठी या ग्रंथाची रचना झाली नसून ती सामान्य वाचक, समर्थप्रेमी, समर्थ संप्रदायी संघटनांची आवड असणार्या सर्वांसाठी उद्बोधक अशी झाली आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ समर्थांचे लौकिक चरित्र नाही, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या कार्यकर्तृत्वाकडे पारदर्शीपणे पाहाण्याचा प्रयत्न केलेला ग्रंथ आहे. हे नुसते लेखकाने लिहिलेले लेख नाहीत, तर त्यात विचारवंतांच्या उक्ती, अभ्यासकांचे विचार यांचे दर्शन आहे. या ग्रंथाकडे एक संदर्भग्रंथ म्हणून बघता येईल. तसेच संग्रही ठेवावा असा हा बहुमोल ग्रंथ झाला आहे. याचाही वाचकांनी विचार करावा.
पुस्तकाचे नाव : श्री समर्थ रामदास : एक अभ्यास
लेखक : सुरेश जाखडी
प्रकाशक : विजया प्रकाशन, मुंबई (९८२१३०७५०१)
पृष्ठसंख्या : ४४८
मूल्य : रु.५००
प्रतिभा बिवलकर
७०४५४००८८२ (पुस्तकासाठी संपर्क : सुरेश जाखडी ७७३८७७८३२२)