
मुंबई : आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले,” अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसटीच्या दिशेने जाणारी जलद लोकल आणि सीएसटीहुन ठाण्याच्या दिशने जाणारी पुष्पक एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या वळणावरून जात असताना प्रवाशांचा बॅग या ट्रेनला घासल्या गेल्या आणि अडकून प्रवासी रुळावर पडले. यापैकी काहींचा जागेवरच मृत्यू झाला. एका जखमी प्रवाशाने माहिती दिली की, अनेक प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत असताना पाठीला लटकलेली बॅग अडकल्यामुळे ही घटना घडली. दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटरचे असते. एक ट्रेन कसाऱ्याकडे जात होती. एक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असताना हा अपघात झाला.
लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे बसवणाररेल्वे बोर्डाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे की, मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जातील. याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे पुनर्रचना (रीडिझाईनिंग) करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये देखील ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. स्वप्नील नीला यांनी माहिती दिली की, सीएसएमटी ट्रॅक आणि कसारा ट्रॅकवरून दोन लोकल या ट्रॅकवर एकमेकांना क्रॉस करत होत्या. दोन लोकल आजूबाजूला येताच प्रवासी एकमेकांना धडकले आणि ट्रॅकवर पडले. प्रवासी ट्रॅकवर पडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले आले. यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींवर सध्या कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी सुरु : देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री .
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज : अजित पवार, उपमुख्यमंत्री.
मध्य रेल्वेमार्गावरील कोपर ते दिवा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी आणि क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंत:करणानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री.
मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात.ही अतिशय दुःखदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले आहेत. मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लगेच सामोरे येईल.