स्वरनाड्या आपल्या शरीराच्या चंद्र- सूर्य नाड्या (डावी आणि उजवी नाकपुडी) आपणहून बदलत असतात. त्यांच्या बदलाची काही कारणेही असतात. पण, साधकांशिवाय इतरांना ती कारणे गम्य नसतात आणि साधारणांना स्वतःच्या स्वरांवर नियंत्रणही ठेवता येत नाही. त्याकरिता स्वरोदय शास्त्राचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. संगीतशास्त्राचा योग्य अभ्यास, त्याकरिता कुंडलिनी जागृत करून सप्त स्वरांची स्थाने जाणणे, दीपक वा पर्जन्यादी घटना प्राप्तिकरिता सूर्य वा चंद्र नाड्यांचे स्थैर्य राखण्याइतके प्रगत स्वरोदय ज्ञान साधक गायकाला असणे आवश्यक आहे. हे सर्व न जमल्यास दीपक राग गायल्यावर दीपक लागणार नाहीत. मेघमल्हाराने पाऊस पडणार नाही. प्राचीन शास्त्रावर नितांत श्रद्धा ठेवणारे आजकाल मेघमल्हार वा तत्सम रागांची साधना करतात. परंतु त्याकरिता चंद्रसूर्यनाडी स्थैर्य व त्यांचे आवश्यक ज्ञान नसल्यामुळे कार्यभाग होत नसतो. त्यामुळे श्रद्धावानांची निराशा होऊन टिंगल करणार्यांना आणखी एक कारण मिळते.
सूर्य, चंद्र व सुषुम्ना नाडीतही पुन्हा चंद्र-सूर्य, सूर्य-चंद्र, चंद्र- सुषुम्ना, सूर्य-सुषुम्ना इत्यादी आवश्यक भेद असतात. चंद्र, सूर्य वा सुषुम्ना नाडीच्या गतीत पुन्हा पृथ्वी, आप, तेजस, वायू आणि आकाश ही तत्वे असतात. त्यांच्या गती स्थिर करण्याचेही एक साधन आहे. पृथ्वी तत्वातील वस्तुलाभ होण्याकरिता आकाश तत्वापासूनआप तत्वापर्यंतच्या तत्वांचा थोडा थोडा हातभार घेऊन चंद्र नाडी पृथ्वी तत्वात स्थिर करावी लागते. तेव्हा कोठे मेघमल्हार गायिल्यावर पावसाच्या सरीवर सरी वळतील, अन्यथा नाही. एवढा सगळा संगीत स्वरांचा, राग शुद्धतेचा, शरीर साधनेचा, स्वरोदय साधनेचा व तत्सम साधनांचा संभार सांभाळून गायकाला राग आळवावा लागतो. तेव्हा प्राप्य वस्तुलाभ पदरात पडतो. एवढे प्रयास व साधना करण्याची ज्याची पात्रता नसेल किंवा तयारी नसेल, त्याने साधे सरगमी म्हणून खुशाल तानबाजी करावी व स्वतःला तानसेन समजावे. परंतु, असे करताना प्राचीन भारतीय संगीतशास्त्र एक थोतांड आहे, असे म्हणून अज्ञान प्रकट करू नये, ही कळकळीची इच्छा आहे. वरील सर्व अनुसंधान सांभाळून गायन केल्यास भारतीय संगीत आजही पंचगुणात्मक बनून गायक आणि श्रोत्यांना रागानुसार फल देईल यात शंका नाही.
काही अनुभव निःसंकोचपणे उद्धृत करतो. त्यामुळे साधने करू इच्छिणार्या गायकांना प्रयोग करायला व संशोधन करायला उत्साह मिळेल असे वाटते. शिवाय अनुभव न दिल्यास सर्व विवरण सैद्धांतिक (थिअरॉटिकल) राहील. मार्गकल्याण रागिणी रात्री 8 वाजण्यादरम्यान गायिली. चंद्रनाडीत गायन चालू असावे, देहभान कमी झाले. भ्रूमध्यातून एक तेजोशलाका कडाडून चमकली व बाहेर पडली; इतकी की भोवतालच्या भिंतीवरही त्याचा प्रकाश लख्ख पडला होता. विहंग गातानाही असाच अनुभव आला. पण, विहंगात तीव्र मध्यमाचे प्राबल्य असले पाहिजे. हा अनुभव कल्याण थाटातील रागांच्या बाबतीत बर्याच वेळा आला. एकदा रात्री चंद्रकौस गात होतो. कोणती नाडी व तत्व होते हे सांगता येत नाही. घरची सर्व मंडळी गाढ झोपी गेली. स्वतः मी समाधी अवस्थेत निघून गेलो. बर्याच वेळानंतर देहभानावर आलो तो तंबोर्यावर हात कायम होता, पण तंबोरा बंद होता. आसनही कायम होते. तंबोरा हातचा पडला नाही की आसन डळमळले नाही. एकदा प्रत्यक्ष गंधर्व गात असताना पाहिले व त्यांचे स्वर्गीय संगीत ऐकले. राग कोणता असावा, हे निश्चित सांगता येत नाही. मालश्री आणि चंद्रकौंस रागाच्या मिश्रणाने एखादा श्लोक म्हणावा तसे ते गायन वाटले. पण, त्यांच्या प्रत्येक स्वरन्यासानुसार एक विलक्षण चेतना व आनंदोर्मिचा अनुभव येत असे. सारे विश्व विलक्षण तेजाने न्हाऊन निघाले आहे, असे दिसले.
गंधर्वांचा वर्ण शुभ्र गुलाबी होता आणि त्यांचे शरीर अतिशय प्रमाणबद्ध पण मांसल असे दिसले. त्यांच्या शरीराला हाडे नसावीत, असा भास होत होता. त्यांचे शरीर भूमीपासून अंमळ अलगच असावे. विशेष म्हणजे, त्यांचे गाल चांगले भरलेले पण दात नसावे असे वाटले. त्यांच्या अंगाचा एक प्रकारचा सुगंध येत होता. ते अप्सरांशी निर्वेध क्रीडा करीत होते. मी त्यांच्यासह असल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. मलाही त्यांची क्रीडा पाहून कसलाच संकोच होत नव्हता. देहभावावर आल्यावर मात्र त्यांची ती लीला आठवून अजून संकोच होतो. त्यांच्या अंगावर व डोईवर सुवर्णाचे भरपूर अलंकार होते. जरीची वस्त्रे व डोक्यावर सुंदरसे मुकूट होते. ते आपसात बोलत ती भाषा काहीही संस्कृतसारखी वाटली. पण, ती पुस्तू भाषेसारखी पुसटशी वाटली. एकदा गाता गाता भगवान श्रीकृष्णाची वेणू ऐकली. भ्रम मुळीच नव्हता. माझे गायन चालू असतानाच ते स्वर्गीय स्वर ऐकू येत होते. प्रथम मला वाटले की, गांधार पंचमाचे ते सहज निनाद असावेत. खर्ज साधन करताना खर्जाचे गांधार पंचम स्वर स्पष्ट ऐकू येतात हा सर्वांचा अनुभव आहे. पण माझ्या स्वरांपेक्षा ते वेणूस्वर क्वचितच भिन्न कंपाचे व स्वर्गीय होते. माझे गाणे आपोआप बंद पडले. राग कोणता असावा, हे सांगता येणार नाही. स्वर्गीय राग तो!
एक वेळचा अनुभव तर विलक्षण होता. मारुह राग गात होतो. शरीर अधांतरी असल्यासारखे वाटून विश्वाच्या एका दूर दूर कोपर्यात आपण दडलो आहोत, असे वाटले. श्वास बंद होता, पण गायन चालू होते. श्वासाशिवाय गायन! श्वासाच्या अभावामुळे या गळ्यातून ते स्वर निघणे अशक्य होते. मग ते स्वर कोठून निघत असतील? कदाचित ते अनाहतनाद असावेत. बराच वेळ त्या अवस्थेत होतो. माझे एक मित्र मला भेटायला येऊन अर्धा तास तरी बाहेर बसले असावेत. दीपक किंवा मेघमल्हाराचा प्रयोग केला नाही. एकदा विहंग राग गायिला. सायंकाळ झाली होती. चार तासांपर्यंत तोच राग चालला होता. साथीदार व ऐकणारे सारेच चार तासांपर्यंत एका विलक्षण समाधी तंद्रीत होते. कंटाळा येण्याकरिता कोणीच देहभानावर नव्हते. अनेक बैठकीबद्दल असेच लिहिता येईल. प्रत्यक्ष वस्तुलाभ झाल्याची मात्र एकही घटना घडली नाही. वस्तुलाभ वा घटना प्राप्ती कशी करावी याबद्दल बरेच ठिकाणी जिज्ञासा प्रकट केली. पण, दुर्दैवाने लेखकाला कोणीच काही सांगू शकले नाही. पण, स्वल्प अनुभवावरून गायनाने वस्तुलाभ व घटनाप्राप्ती होऊ शकते याचा विश्वास आहे यावर अधिक संशोधन व प्रयोग होणे आवश्यक आहे.
-योगीराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)