‘हमास’च्या नृशंस हल्ल्यानंतर इस्रायलनेही युद्धाची घोषणा करत, पूर्ण ताकदीने गाझा पट्टीत दहशतवाद्यांच्या नायनाटाची मोहीम राबविली. यानिमित्ताने इस्रायलमध्ये काही वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या, तेथील सामाजिक-धार्मिक समीकरणे जवळून अनुभवलेल्या डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी एकूणच तेथील सद्यस्थितीवर टाकलेला हा कटाक्ष...
इस्रायलमधून परत येऊन, आता मला सहा वर्षे उलटली. तसा माझा काही इस्रायली मित्रमंडळींशी नियमित संपर्क नसतो. पण, वर्षातून दोन-तीन वेळा आम्ही व्हॉट्सअॅपवर बोलत असतोच. या सहा वर्षांतदेखील बर्याच वेळा गाझा-इस्रायल संघर्ष उफाळून आला. गाझा पॅलेस्टाईनला पूर्णपणे दिल्यानंतर आणि गोलन हाईट्स पूर्णपणे इस्रायलच्या ताब्यात घेतल्यापासून, दर वर्षी एकदा तरी गाझामधून इस्रायलच्या हद्दीतील गावांमध्ये रॉकेट हल्ले, जळते फुगे सोडणे, मधूनच कधीतरी जेरूसलेम, वेस्ट बँकमध्ये चाकूने हल्ला करून हत्या करणे, अशा घटना घडत असतात. पण, मी स्वतः इस्रायलमध्ये राहिल्याने तिथे इस्रायली डिफेन्स फोर्सेस इतकी तैनात असतात की, इस्रायलमध्ये काहीही संकट आलं तरी इस्रायली नागरिक तसेच बाहेरून आलेले नागरिक सुरक्षित असतात, असा एक ठाम विश्वास होता. त्यामुळे गाझातून रॉकेट हल्ले, पेटते फुग्यांचे हल्ले जरी झाले, तरी इस्रायलकडून दुप्पट प्रत्युत्तर मिळेल, याची खात्री असायची आणि त्यातच एक समाधान असायचं.
पण, दि. ७ ऑक्टोबरला जे काही घडलं आणि अजूनही जे चालू आहे, ते खूप वेगळं घडलंय. खरंतर दोन दिवसांपूर्वीच इस्रायलमध्ये पाऊस न झाल्याने आणि उष्णतेची लाट असल्याने सगळीकडे आगी लागत आहेत, असं काही वाचण्यात आलं आणि आम्ही हैफामध्ये असताना लागलेली आग आणि नंतरचे सगळे प्रसंग आठवले. इस्रायली मित्रमंडळींशी संपर्क केल्यावर त्यातील भयानकता लक्षात आली. याआधी कधीच माझ्या इस्रायली मित्रांनी ‘आम्हाला भीती वाटतेय’ असं म्हटलेलं नव्हतं. पण, यावेळी सगळे आतून हादरलेले होते, हे त्यांच्या प्रतिसादांमधून जाणवलं. त्याला कारणंही तशीच आहेत. हल्ला गाझामधून झाला. पण, संघर्ष वेस्ट बँकमध्ये चालू होता. गाझा पूर्णपणे पॅलेस्टाईनकडे आहे. तिथे एकही इस्रायली राहत नाही. पण, वेस्ट बँक ही इस्रायली ऑक्युपाईड टेरिटरी आहे. तिथे ज्यू सेटलमेंट्स आहेत. आतापर्यंत गाझातून पेटते फुगे आणि रॉकेट हल्लेच व्हायचे. रॉकेट हल्ले परतवायला ‘आयर्न डोम सिस्टीम’ आहे. म्हणून ’आयडीएफ’ची सर्वाधिक तैनाती वेस्ट बँकमध्ये सेटलमेंट्सना संरक्षणासाठी असायची. ७ तारखेचा हल्ला हा खूप नियोजन करून, रेकी करून काळ-वेळ साधून थंड डोक्याने केलेला आहे. गाझा पॅलेस्टाईनच्या ताब्यात देण्यामागे ते पूर्णपणे ‘हमास’ या अतिरेकी संघटनेच्या हातात जाईल, ही भीती कधीच खरी ठरलेली आहे.
‘रॉयटर्स’च्या हवाल्याने असं सांगितलं जातंय की, या हल्ल्याची तयारी ‘हमास’ने २०२१ मधील संघर्षापासूनच चालू केलेली होती. पॅराग्लायडर्स, मोटरसायकल ग्लायडर्स यांनी इस्रायलमध्ये उतरण्याचा सराव, या आधी कधीतरी केलेला होता, असा व्हिडिओ ‘रॉयटर्स’कडे आहे. तो नक्की २०२१ पासून २०२३ मधील कोणत्या काळाचा आणि कुठे चित्रीत केलाय, हे समजलेलं नाही. पण, यावेळी ‘हमास’ने सकाळी ६ वाजताच हवाई मार्ग, भूमार्ग आणि जलमार्ग, अशा तीनही मार्गांनी गाझाच्या आसपासच्या इस्रायली गावांमध्ये घुसखोरी केली आणि दिसेल त्याला गोळ्या घालायला सुरुवात केली. जीप्स, कार्समधून आलेल्या अतिरेक्यांनी इस्रायली नागरिकांचे (विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुले) अपहरण करून त्यांना जीप्समध्ये कोंबून गाझाच्या हद्दीत नेले. ज्यांना नेता आले नाही, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांना मारले. ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत मशीनगन्स उंचावत जीपमधून जाणारे हे अतिरेकी पाहिल्यावर ही माणसे नसून, पशूदेखील नाहीत. कारण, प्राण्यांनादेखील काही नीतिमत्ता असते. हा हल्ला करून ‘हमास’ने पॅलेस्टाईन विरुद्ध खूप मोठ्या युद्धाला आमंत्रण दिलेले आहे.
इस्रायलमध्ये असताना जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला वेस्ट बँकमध्ये आमच्या बरोबर येण्याविषयी विचारलं असता, ती म्हणाल्याचे आठवते की, “मी तिकडे गेले तर माझा गळा कापून मारून टाकतील.” मला त्यावेळी ते जरा अतिरेकी विधान वाटलं होतं. पण, आता हे पाहिल्यावर त्या वाक्याचं प्रमाणच मिळालं.माझ्या एका मित्राची आई आणि बरेचसे नातेवाईक अश्खलॉन, बेरशेव्हा, अश्दोद या ठिकाणी राहतात. तो म्हणाला की, “त्या भागात अंधार पडला की, गाझाकडून रॉकेट हल्ले चालू होतात आणि दिवसा अतिरेकी घरात घुसून लोकांना मारत आहेत.” या भागात बर्याच घरांमध्ये खाली बंकर्स वगैरे नाहीत. त्यामुळे तर अजूनच दहशतीमध्ये जगावे लागते. इस्रायली संरक्षण दलाने आतला भाग ‘क्लिअर’ करीत आणला आहे (म्हणजे आत शिरलेल्या अतिरेक्यांना मारणं) तरी देखील २०० हून अधिक अतिरेकी ठिकठिकाणी लपून बसले आहेत. त्यांना शोधून यमसदनी पाठवणं, हे पहिलं काम इस्रायली लष्कराने हाती घेतलं. त्याचबरोबर जखमींना वैद्यकीय सेवा पुरवणं, घरात दडून बसलेल्या आणि घरातून बाहेर न पडू शकणार्या नागरिकांना मदत पोहोचवणं, अशी खूप कामं जोरदार सुरु आहेत. यातच शक्य तिथे गाझावर बॉम्बहल्लेदेखील थांबलेले नाहीत. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी पुढच्या आठवड्यापासून आर्मी जॉईन करतेय. त्यामुळे त्या मैत्रिणीला काळजी वाटत होती. एका मैत्रिणीचा मुलगा आणि सून बेरशैव्हामध्ये राहतात. त्यांनी त्यांच्या मित्राच्या घराच्या शेल्टर रूममध्ये आश्रय घेतलाय.
इस्रायली लष्कराने गाझात घुसण्यासाठी राखीव सैन्यदलालादेखील पाचारण केले आहे. इस्रायलने गाझाच्या सीमेवर त्यांचे ‘मेरकाव्हा एम के ४’ रणगाडे हलवले आहेत की, जे भयंकर हल्ले घडवून आणू शकतात. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हे इस्रायलवरील अधिकृत युद्ध आहे, असं आधीच जाहीर केलं आहे. गाझावर इस्रायलचे जबरी हवाई हल्ले चालू झालेले आहेतच. कालच लेबेनॉनमधून इजिप्तने तिथे उत्तरेकडील सीमारेषेवर असलेल्या रोश हानिका या पर्यटनस्थळावर रॉकेट्स टाकली असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे ‘हमास’ही या युद्धात उतरण्याचा प्रयत्न करतंय, हे स्पष्ट होतंय. अमेरिकेने आधीच आपली विमानवाहू युद्ध नौका सायप्रसच्या दिशेला भूमध्य समुद्रात हमासच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात न येईल, इतक्या अंतरावर आणून ठेवलेली आहे. त्यामुळे जर ‘हिजबुल्ला’ या युद्धात उतरले तर अमेरिका आपले विमान हल्ले लेबेनॉन, सीरिया, इजिप्त या ठिकाणी तेथील अतिरेक्यांचा पडाव करण्याच्या मागे लागेल. आणि मग हे आखाती युद्धासारखं एक भूमध्य समुद्रातील युद्ध ठरेल. परिस्थिती इतकी क्षणाक्षणाला बदलत आहे की, कुठलेही अंदाज बांधणं धाडसाचंच ठरेल.
जसं आपल्याकडे ‘आयबी’ (इंटेलिजन्स ब्युरो) राष्ट्रीय स्तरावर (देशांतर्गत) आहे आणि ‘रॉ’ आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, तसेच इस्रायलमध्येही आहे. ‘मोसाद’चे कार्यक्षेत्र इस्रायलच्या बाहेर आहे आणि अंतर्गत गुप्तहेरगिरी ‘आयडीएफ’चीच एक डिव्हिजन करते. त्यामुळे गाझा, वेस्ट बँक हे ‘आयडीएफ’च्या त्या डिव्हिजन अंतर्गत येतं. इस्रायलमध्ये काही अंतर्गत राजकीय संघर्ष चालू आहे. तेथील वेस्ट बँकमधील ज्युडाह आणि समारिया या जिल्ह्यांत जे जुन्या जेरुसलेमचा भाग आहे, या भागावर पॅलेस्टिनी अरब आणि इस्रायली ज्यू दोघेही आपापला परंपरागत दावा सांगतात. त्यामुळे तिथे सारखीच संघर्षाची स्थिती असते. ‘आयडीएफ’ या भागाच्या सुरक्षेत आणि ‘कॉनफ्लिक्ट रेझोल्युशन’मध्ये गुंतलेलं होतं. त्यांची सर्वाधिक कुमकही तिकडेच ठेवलेली होती. गाझामधून अशाप्रकारे घुसखोरी केली जाईल, याची सुतराम शक्यताही कोणाला वाटली नव्हती. गाझा सीमारेषेवर कायम पॅलेस्टिनी नागरिक काहीतरी कारण काढून आत येत असत आणि त्यामुळे कुंपणावरील सायरन वाजणं, हे नित्याचेच होते. याची एकप्रकारे तिथल्या सैनिकांना सवय झाल्याने त्यात फारसा धोका नाही, या समजुतीखाली ते असत. याचाच फायदा ‘हमास’ने घेतला आणि त्यांनी अशाप्रकारच्या हल्ल्यांसाठी ज्यूंच्या सणाचा दिवस निवडला.
ज्यामुळे बरेचसे सैनिक रजेवर होते. ‘मोसाद’चा इथे काही संबंध नाही. माझ्या इस्रायलमधील एकूण अनुभवावर आधारित सांगते की, इस्रायल यावेळी झालेल्या चुकांमधून शिकून त्या दुरुस्त करून अधिकच शक्तिशाली बनून बाहेर पडेल. यात ‘मोसाद’ने हे सगळं मुद्दाम होऊ दिलं किंवा इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘फेल’ गेली,असले निष्कर्ष काढणे फारच धाडसी ठरेल. त्यामुळे ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच’ हे धोरण अधिक संयुक्तिक. इस्रायलमध्ये जे घडलंय, ते भारतात २६/११चा जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्यापेक्षाही भयानक घडलंय. यातून गाझाचं नक्की काय होणार, ते काही दिवसांतच कळेल.५० वर्षांपूर्वीच्या योम किप्पुर युद्धाची की, जे तिसरे अरब-इस्रायली युद्ध म्हणून ओळखले जाते, जे जवळ जवळ दोन-अडीच आठवडे चाललेले होते. त्याची आठवण होते आहे, असेही मित्रमंडळी म्हणताहेत. पुन्हा तीच लक्षणे दिसत आहेत. त्यावेळीही इस्रायलविरुद्ध आजूबाजूची सगळी अरब राष्ट्रे असं चित्रं होतं. आता युद्ध तर होणार हे निश्चित; फक्त यात कोण-कोण इस्रायलविरुद्ध सहभागी होणार, हे पाहावं लागेल.
५० वर्षांत बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. अतिरेकी धर्मांधांची मानसिकता बदललेली नसली तरी जगातले आर्थिक सहकार्य वाढले आहे आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे अरब देश आणि इस्रायलही सामील आहे. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेच्या तसेच जगातील इतर मोठ्या देशांच्या विरोधात जाणे अरब राष्ट्रांना कितपत परवडेल, हे सांगता येत नाही. माझ्या अंदाजाने, अरब देश ‘अब्राहम करारा’शी जोडलेले राहतील. अशातच गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ युक्रेनच्या आडून युरोप, ‘नाटो’ आणि रशिया यांच्यात युद्ध चालू आहेच. त्यामुळे हे सगळं केवढ्यात पडेल सांगता येत नाही. एकूणच जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याकडे कल दिसतो. यात भारताची भूमिका खूप महत्त्वाची राहील. भारत हा सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठसुद्धा. भारत कोणत्याच युद्धात उतरण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे भारताने जशी युक्रेन-रशिया युद्धात भूमिका घेतलेली होती, तशाच पद्धतीत आताही भारत फक्त इस्रायलला नैतिक पाठिंबा देऊन भूमिका घेईल, असे वाटते. तसेच आता इस्रायलमध्ये प्रवेश अजूनच अवघड होईल. इस्रायलच्या बाबतीत सगळं ठीक होईल आणि त्यांच्यावर आलेलं संकट लवकर नष्ट होवो, अशी आपण सगळेच प्रार्थना करुयात.
(लेखिका पूर्वी इस्रायलमध्ये वास्तव्यास होत्या आणि त्या अनुभवांवर आधारित इस्रायलवरील लेखमाला लिहिलेली आहे. लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)