वैदिक परंपरा आणि साधना

भाग ४८

    24-Aug-2022
Total Views | 123

vd
 
 
ज्ञानिक जेव्हा परमाणू फोडतात, त्यावेळेस त्यातील ओतप्रोतांचा सापेक्ष संच विखुरल्यामुळे तो परमाणू त्याची साचेबंद अवस्था सोडतो. त्यामुळे त्या ओतांमधील भयानक शक्ती प्रकाश व उष्णता यारूपाने बाहेर पडते. त्या परमाणूत ही ऊर्जा व प्रकाश पूर्वीपासूनच असतो. परंतु, ती बंदिस्त असल्यामुळे ती असून भासत नाही. योगी त्या ऊर्जेचे प्रकाशमय दर्शन तो परमाणू न फोडता घेऊ शकतो. म्हणून ‘ऋतंभराप्रज्ञा’ सिद्धी प्राप्त योग्याला असल्या सहस्रसूर्यप्रकाशाचे त्या दिव्य अवस्थेत दर्शन होत असते.
भगवद्गीतेत पुढील वर्णन आहे.
 
 
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुस्त्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥अ.11 श्लो.12॥
 
आकाशामध्ये सहस्र सूर्याची एकाच वेळी प्रगटलेली प्रभा दिसेल, ती कदाचित त्या विश्वरूपाच्या प्रभेसारखी दिसेल. सूक्ष्म शरीराने जड शरीराच्या बाहेर निघताना अतिश्रेष्ठ योगसाधकाला असल्या दिव्य, प्रखर प्रकाशाचा अनुभव येत असतो. तद्वत निर्विकल्प समाधीच्या अगोदर एक ‘ऋतंभराप्रज्ञा’ दिव्य अवस्थेत असला अतिशय प्रखर प्रकाश अधूनमधून दिसत असतो. त्याचे कारण वैज्ञानिक आहे. या कल्पना नसून त्या दिव्य अवस्थेत असणार्‍या योग्यांच्या प्रत्यक्ष अनुभूती आहेत. त्याच दिव्यदृष्टीचे वर्णन वर आले आहे. आईनस्टाईनने आपल्या सापेक्षता सिद्धांताला धरून एक जगविख्यात सूत्र "E = mc2' (E = Energy, m = mass, c = speed of light) या सूत्रानुसार प्रत्यक्ष आईनस्टाईनला मात्र परमाणू फोडता आला नाही.
 
परंतु, या सूत्राचा उपयोग करून नंतर रूदरफोर्ड या नेदरलँडच्या वैज्ञानिकाने परमाणू फोडून दाखविला. परमाणू फुटल्यानंतर त्याचा प्रकाश किती भयानक प्रखर दिसेल, याचे वर्णन करताना वरील श्रेष्ठ वैज्ञानिकाने गीतेच्या वरील श्लोकाचा संदर्भ देऊन तसा ‘दिवि सूर्यसहस्रस्य’ शतसहस्त्र सूर्यप्रभेसारखा तो प्रकाश राहील, असे वर्णन केले होते. यावरून असे दिसते की, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनासुद्धा गीतेतील ज्ञानभांडार ठाऊक आहे. त्यामुळे व्यास हे सामान्य लेखक नसून एक महान वैज्ञानिक, महान योगी व अतिशय बुद्धिमान असले पाहिजेत. व्यास हे पृथ्वीवरील एकमेवाद्वितीय ज्ञानी, तत्त्वचिंतक होते, हे त्यांनी लिहिलेल्या विशाल साहित्यसंपदेवरून दिसून येते.
 
 
पुढे भगवंत म्हणतात,
 
‘प्रकृतिं पुरूषं चैव विद्धयनादि उभावपि ।विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥ अ.13.श्लो.19॥
 
 
पुरुष आणि प्रकृती या दोघांना तू अनादी म्हणजे सृष्टीचे मूळ मान. रागद्वेषादी विकारांना त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक पदार्थांनासुद्धा प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत, हे जाण. म्हणून पुरुष म्हणजे आत्मा. आत्मासुद्धा अनादी आहे आणि प्रकृतीसुद्धा अनादी आहे. ते एकमेकांशिवाय राहू शकतात, पण काही काळपर्यंतच. एक खरा योगी समाधी अवस्थेत जातो तेव्हा त्याच्या शरीराच्या सर्व क्रिया संपूर्णतः बंद राहतात. जशा श्वासोच्छवास, रुधिराभिसरण, हृदय आणि शरीरव्यापारसुद्धा. असे समाधिस्थ शरीर कितीही दिवस व्यवस्थित ठेवले, तरी त्या शरीराच्या चेहर्‍यावरचे केस कधीच वाढणार नाहीत. कारण, त्या योग्याच्या समाधी अवस्थेबरोबर त्याची प्रकृती म्हणजे शरीरसुद्धा समाधी अवस्थेत जाते.
 
 
जीवात्म्यासह शरीर किंवा प्रकृतीसुद्धा कार्य थांबविते. कारण, त्या शरीराची चालकशक्ती, जीवात्मा सार्‍या विश्वाशी सम होऊन शरीरभावाच्या वर राहतो. अशा प्रकारचे समाधिस्थ शरीर आपल्या नियमित कार्यास म्हणजे श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, केशवृद्धी आदी सर्व शरीरकार्यास तेव्हाच प्रारंभ करेल जेव्हा त्या शरीराचा स्वामी, जीवात्मा पुन्हा शरीरभावावर येईल. ही अतींद्रिय अवस्था असे सांगते की, पुरुष आणि प्रकृती स्वयंभू अवश्य आहेत. परंतु, पुरुषाशिवाय प्रकृती अधिक काळ राहू शकत नाही.
 
 
जीवात्मारूप इंद्र अशा प्रकारे अनेक जन्म घेऊन आपली उत्क्रांती करून पूर्ण पुरुष बनतो. परंतु, त्यासाठी कठीण साधनेची आवश्यकता आहे. वर उल्लेखिलेल्या ऋग्वेदातील ऋचेचा आणखी एक आशय महत्त्वपूर्ण आहे. त्या ऋचेत सांगितले आहे की, ’जे अगदी जवळ आहे ते अतिदूर आहे आणि जे अतिदूर आहे ते अगदी जवळ आहे.’ या ऋचेमध्ये स्थळ आणि काळ याचा महान सिद्धांत सांगितला आहे. स्थळ आहे म्हणून काळ आहे, नाहीतर काळ नावाची अवस्था असणार नाही. विख्यात वैज्ञानिकांनीसुद्धा सांगितले आहे की, सर्व गती या वर्तुळाकार आहेत, म्हणून अतिदूर स्थानी जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही. वैदिक शास्त्रसुद्धा हेच सांगते,
 
 
‘अखंड मंडलाकारं व्योमं येन माम् उपयान्ति ते’।
 
 
सर्व गती आणि व्योम मंडलाकार आहे, म्हणून कुणी कुठे जात नाही व कुणी कुठून येत नाही. देश नाही म्हणून त्याला पार करण्यासाठी काळही नाही. परमेश्वर अवस्था ही सर्वव्यापी आहे. आजकाल पृथ्वीवर येणार्‍या उडत्या तबकड्या या दूरवरच्या आकाशगंगेपलीकडे असणार्‍या पृथ्वीसदृश ग्रहावरून येत असाव्यात, असे काही लोक मानतात. प्रकाशवेगाने प्रवास केला तरी त्या तबकड्यांना तेथून पृथ्वीवर येण्यास प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे कोट्यवधी वर्षे लागतील. परंतु, उपरोक्त ऋचेनुसार त्यांच्यासाठी अंतराळच  नाही, त्यामुळे अशा उडत्या तबकड्यांना पृथ्वीवर येण्यास व पृथ्वीवरून परत आपल्या ग्रहावर जाण्यास काहीच वेळ लागणार नाही.
 
 
प्रकाशवेगाद्वारे काळ  मोजला जातो. परंतु, जी अवस्था प्रकाशाच्या कितीतरी पट वेगवान आहे, अशा अवस्थेद्वारे प्रवास करणार्‍या उडत्या तबकड्या आपल्या ग्रहावरून ज्यावेळी आपला ग्रह सोडतील, त्या वेळेच्या आधीच त्या परत जातील. हा सिद्धांत समजणे अतिकठीण आहे. जे सर्वव्यापी आहे ते कुठे जाणार व कुठून येणार? उपरोक्त ऋग्वेदाच्या ऋचेमध्ये हाच अर्थ गर्भित आहे. 
 
 
 
-योगीराज हरकरे  
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121