महाडमध्ये आलेला पूर घरदार उद्ध्वस्त करून गेला. अशावेळी रा. स्व. संघप्रणित ‘कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्रा’ने येथील चार बांधवांना पुन्हा घर बांधून दिले. त्या घरकुलांचा लोकार्पण सोहळा महाड येथे दि. ३ एप्रिल रोजी पार पडला. त्या कार्यक्रमाचा तपशील मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
महाडमध्ये आलेला पूर लोकांच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी आठवणी देऊन गेला. अगदी आयुष्यभर ज्या घरासाठी खस्ता खाल्ल्या, ते घरदेखील पुरात वाहून गेले. ‘कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्रा’च्या माध्यमातून भारत विकास परिषद, श्री रामसीता बहुउद्देशीय संस्था, वसई आणि प्रताप व्यायाम शाह सेवा संस्था, ठाणेच्या सहकार्याने यातील काही बांधवांना पुन्हा घरकुल बांधून देण्यात आले. या घरकुलांचा लोकार्पण सोहळा दि. ३ एप्रिल रोजी महाड येथे पार पडला. हा हे लोकार्पण रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते, रा. स्व. संघाचे रायगड जिल्हा संघचालक किसन घाग.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पंचशीलनगर महाडमधील मुलींनी बुद्धवंदना केली. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणेश मेहेंदळे म्हणाले की, “ ‘चितळे स्मृती केंद्रा’चे कार्य केवळ रक्तपेढीपुरते मर्यादित नाही. कोरोना काळात मदतकार्य, महाडमधील पूरग्रस्तांना प्रथम मदतीची सुरुवात केली. मदतकार्य ८१ गावांपर्यंत पोहोचले. खिचडी, पुलाव, पाणी, कपडे यांचे वाटप, ३६ वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारली. ८९ लाभार्थ्यांना साडेचार लाख रुपयांची मदत, ८५ नवीन हातगाड्या दिल्या. नवीन घरांची पुनर्बांधणी त्यात पंचशील नगर, महाड येथील चार घरांची पुनर्बांधणी करून त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.”
महेश शर्मा म्हणाले की, “भारत विकास परिषद. देशाचे जनमत व्यक्त करण्याचे कार्य, संस्कार आणि सेवा यामध्ये काम केले जाते.” यावेळी रायगडचे रा. स्व. संघाचे संघचालक किसन घाग म्हणाले की, “महाड पूरग्रस्तांना पहिले खिचडी वाटप रोह्यातून सुरू झाले. आपल्या उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्न कुटुंबासाठी, २५ टक्के उत्पन्न भविष्यासाठी आणि २५ टक्के उत्पन्न सहकार्यासाठी, समाजोपयोगी कामासाठी वापरावे. भारतमातेवर प्रेम करावे. तन-मन-धन वेचून देशासाठी कार्य करावे.”
रा. स्व. संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठलराव कांबळे म्हणाले की, “संविधानातील बंधुता माणसाच्या वागण्यात आहे. भारताची राज्यघटना लिहून सगळ्यांच्या भावनेचा विचार करणारे एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. 'आम्ही’ हा शब्द अहंकाराचा भाव आहे. आपले नाते बंधुत्वाचे आहे. त्यामुळे ‘आम्ही घरे बांधली आहेत,’ असे म्हणून आम्ही उल्लेख केला असेल, तर मी क्षमा मागतो. कोकणातील भावकी-गावकीला महत्त्व आहे. एकजुटीसाठी भावकी-गावकी महत्त्वाची आहे. मला हे खूप आवडते. तुम्ही आम्ही सकल बंधू. आपला मूळ स्वभाव माणुसकीचा आहे. बाबासाहेबांनी बंधुत्वाची शिकवण दिली आहे. ही शिकवण तथागत बुद्धांकडून बाबासाहेबांनी घेतली आहे. संघ हा आता आहे, पण तथागतांनी गौतम बुद्धांनी संघाचा विचार आधीच मांडला आहे. संघ म्हणजे संघटना.संघटना खूप महत्त्वाची आहे. मी शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी त्रिशरण पंचशील म्हणतात. येथील मुलींनी खूप छान त्रिशरण पंचशील म्हटले, त्याचे आचरण व्हायला हवे. ‘सुरामेरय मज्य पमाद ठाणा व्हरेरमनी’ हे फार जाणीवपूर्वक म्हणूया.”
यावेळी मयूर साळवी यांनी प्रातिनिधीक स्तरावर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “आमच्यासाठी ज्या चार वास्तू उभारल्या गेल्यात, त्याबद्दल माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. इतके मोठे उपकार आहेत. पूरग्रस्त महाडकरांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम अनेक सेवाभावी संस्थांनी केले आहे.महाडमध्ये लहान मुलांपर्यंत दूध प्रथम पोहोचविणारी संस्था म्हणजे ‘काकासाहेब चितळे संस्था’ होय. शासनाची मदत मिळाली देखील, पण त्यामधे आमची घरे उभी राहणार नव्हती. पण या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला घरे बांधून मिळाली. बाकीची सर्व मदत मिळाली, पण घराची मदत मिळवून देणारी ही पहिली संस्था आहे. मी भाऊक झालो आहे. मी मनातून बोलतो आहे. कुठेही लिहून आणले नाही. सर्व महाराष्ट्राने आदर्श घ्यावा, असे कार्य आहे. आमच्याकडून एकही पैसा न घेता ही घरे बांधली आहेत.आमच्या मागणीनुसार इच्छेनुसार घरातील आतले काम केले आहे.आमच्या चेहर्यावरचे समाधान पाहण्यात त्यांना आनंद मिळत होता. ’
गंगाधर साळवी