मानसिक आजार आणि होमियोपॅथीची व्याप्ती - भाग-१४

    05-Apr-2022
Total Views | 104
 
 
fgd
 
जेव्हा आपण मानसिक आजारांचा विचार किंवा अभ्यास करत असतो, अशावेळी सर्वप्रथम आपण निरोगी मनाचा व निरोगी मानसिक स्थिती म्हणजे काय (हेल्दी स्टेट ऑफ माईंड) हे पाहणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळेच आपल्याला आजारी मनाची स्थिती कळून येते.

निरोगी मनाच्या माणसामध्ये सर्वप्रथम आपणांस दिसून येतो तो विचारांचा समतोल. जगातील प्रत्येक माणसाला काहीना काहीतरी ताणतणावाचे प्रसंग सहन करावे लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार व जिकरीचे प्रसंग येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही अविस्मरणीय घटना घडून गेलेल्या असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाचा काहीना काहीतरी विशेष असा भूतकाळही असतो. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींचा माणसाच्या मनावर व मानसिक स्थितीवर नक्कीच परिणाम होत असतो. या सर्व घडामोडींचा आपण कसा सामना करता, त्यावर आपली मानसिक स्थिती ठरते.
'Everyone faces problems, but how you face it that counts..'
आयुष्यातील घडामोडींबरोबरच आपण ज्या वातावरणात राहावे किंवा आपण ज्या समाजात ज्या देशात, ज्या विभागात राहतो तेथील वातावरणाचा तसेच तेथील घटना व घडामोडींचासुद्धा नकळत आपल्या मनावर परिणाम होत असतो व त्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारे आपली जीवनशैली बनत जाते. यामध्ये जर सर्वात महत्त्वाचा गुण जर असेल, तर तो म्हणजे विचारांचा समतोल. जर आपल्याला निरोगी विचारांचा समतोल स्वतःमध्ये निर्माण करायचा असेल, तर योगाभ्यासामुळे तो शक्य आहे.
अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार हे पाच ‘बहिरंग योग’, तर धारणा, ध्यान व समाधी तीन ‘अंतरंग योग’ म्हणून ओळखले जातात.
यम पाच आहेत - ब्रह्मचर्य, सत्य, अस्तेय, अहिंसा व अपरिग्रह.
नियम पाच आहेत - शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान.
हे योगाभ्यासातील नियम पाळायला सामान्य माणसाला कठीण जाते. परंतु, जर विचारांचा समतोल आपल्याला अंगी बाणवायचा असेल, तर खालीलपैकी काही गोष्टी तरी आपण नक्कीच पाळू शकतो, ज्या पूर्णपणे आपल्या इच्छेवर व मनावर अवलंबून आहेत. जसे नेहमी सत्य बोलणे व सत्याचा शोध घेऊन, सत्यानेच वागणे. कुणालाही सहसा न दुखावणे, कुणालाही मानसिक त्रास होईल, असे न वागणे. समोरचा माणूस जर लबाड असेल व समोरचा माणूस जर आपल्याला फसवायला निघाला असेल, तर आपण त्याच्याशी लबाडीने वागू नये. परंतु, त्या माणसाची लबाडी कळून येण्याइतपत चाणाक्षपणा व सतर्कता मात्र आपल्या ठायी नक्कीच असायला हवी. कुणालाही टोचून बोलणे कुणालाही मानसिक त्रास देऊन त्याचा मानसिक छळ (Mental Torture)करणे म्हणजे त्या माणसाची वाचिक व मानसिक हिंसाच करणे होय. ही वाचिक व मानसिक हिंसा ताबडतोब थांबवावी. यापुढे आपण विचारांच्या अजून समतोल साधण्यासाठी कसे वागावे, ते पाहूया.
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६
डॉ. मंदार पाटकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121