बाळासाहेब देशपांडे यांनी १९५२ मध्ये सुरू केलेला रा.स्व.संघ परिवारातील एक महत्त्वाचा आयाम म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रम.’ २७ मार्च रोजी रसायनी ‘एमआयडीसी’मधील वडगाव-वाशीवली वाड येथे वनवासी समाजातील ७४ वधु-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून’ पार पडला. त्यानिमित्ताने...
'कोविड’ काळ जगात सर्वांसाठीच अतिशय अवघड होता. आमच्या कातकरी समाजाची आर्थिक परिस्थिती तर या संकटात खूपच नाजूक झाली. वाडीवस्तीतून फिरताना आश्रमाच्या कार्यकर्त्यांना काही ठळक बाबी जाणवत होत्या. त्यातली एक म्हणजे, गेल्या दोन वर्षांत वाड्यांमध्ये होणार्या हळदी आणि विवाहांचे प्रमाण खूपच रोडावले आहे. चौकशी करताना समजले की, हे लोक साखरपुडा उरकून संसार सुरू करतात, पण लग्न लावायचं तर कर्ज घ्यावे लागते. ते फेडायला निदान दोन वर्षे तरी जातातच. त्यामुळे लग्नाचा विचार पुढे ढकलला जातो आहे. रसायनी विभागाच्या कार्यकर्त्या सुचेताताई जोशी यांच्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली. त्यांनी प्रांताचे प्रमुख अमित साठे यांच्याशी याविषयी बोलणे केले. या जोडप्यांचे सामूहिक विवाह केले, तर खूप मोठी सोय होईल, हा विचार त्यांना बोलून दाखवला. त्याच काळात ‘सीएसआर’ची कामे करणारी ‘सीईपीआरआय’ या संस्थेशी अमित यांचा संपर्क झाला. त्यांची अडचण समजताच या संस्थेने आनंदाने आर्थिक जबाबदारी उचलायची तयारी दर्शवली. कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला. सामूहिक विवाहासाठी २७ मार्च हा दिवस निश्चित केला गेला.
कर्जत, खालापूर, रसायनी, पेण, उरण, अलिबाग, पनवेल अशा सात तालुक्यांतून माणसे कामाला लागली. ऑनलाईन-ऑफलाईन बैठका होऊ लागल्या. नेहमीचे शिक्षण, आरोग्य, आपत्तीनिवारण, सेवाकार्ये यापेक्षा हे काम वेगळे होते. आनंदाचे होते. सौख्य आणणारे होते. आश्रमाचे कार्यकर्ते घरचे कार्य असल्यासारखे जातीने बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. लग्नेच्छुक जोडप्यांची नावे नोंदणी होऊ लागली. मुलीचे वय १८ पेक्षा अधिक आहे, याची खात्री करण्याचे कामही केले गेले. कामाच्या, सामानाच्या याद्या तयार झाल्या. कामे वाटली जाऊन ती पार पडू लागली. रसायनी- मोहोपाडा विभागातील व्यापारी वर्गानेही मोठ्या आत्मीयतेने भोजनसामग्रीची जबाबदारी उचलली. रसायनीतील महिला कार्यकर्त्यांच्या उत्साहाला तर उधाण आले. ‘केप्री’ संस्थेने मानपानाच्या वस्तू, संसाराच्या वस्तू, वधूवस्त्रे, वराचा पोशाख, जोडप्याच्या वडिलांचा मान, मुलीचे दागिने जसे की, मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, ठुशी तसेच बाशिंग, मुंडावळ्या अशा वस्तूंची सोय केली. मंडपाची उत्तम सोय केली. धार्मिक विधी करणार्या गुरुजींना बोलावणे केले. विवाहसामग्री आणवली. ‘कल्याण आश्रमा’ने करवाल्यांचे मान म्हणून छान साड्या घेतल्या. भोजन, पाणी, स्वयंसेवक वर्गही आपलाच होता.
रसायनी ‘एमआयडीसी’मधील वडगाव-वाशीवली वाडीवर लग्नाचा सोहळा पार पडला. या कामासाठी जागा सरपंचांनी मोफत उपलब्ध करून दिली होती. वस्तीवरचे आपले कार्यकर्ते गजाननराव आणि वेणुताई वाघमारे या जोडीने या कार्यात मोठा हातभार लावला. अविनाश म्हात्रे, रवींद्र पाटील, मोहन मुजुमदार, जयश्रीताई घोडविंदे, किशोर चौधरी, सखारामदादा, विष्णुभाऊ अशा आपल्या निष्ठावान कार्यकर्ते-पदाधिकार्यांची यादी तर खूप मोठी आहे. मंत्रांच्या गजरात, मंगलवाद्यांच्या घोषात ७४ जोडपी सन्मानपूर्वक एकमेकांशी विवाहबद्ध झाली. हिंदू पद्धतीने अग्नीला साक्षी मानून, सप्तपदी, लाजाहोम वगैरे विधिपूर्वक हे विवाह संपन्न झाले. त्यांना नोंदणी प्रमाणपत्रही दिली गेली. या कार्यक्रमात तीन हजार लोक उपस्थित होते. केवळ ही जोडपीच नाही, तर ही १५० कुटुंबे, नऊ वाड्या या सुमंगल कार्यामुळे एकमेकांशी जोडल्या गेल्या, ‘कल्याण आश्रमा’शीही जोडल्या गेल्या. महिनाभर दिवसरात्र केलेल्या मेहनतीची फलश्रुती अशी गोड झाली...
- अमिता आपटे