राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ईशान्य भारतासंदर्भात, गेल्या ६० वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा, इथे केलेल्या कामांचा आढावा घेतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पूर्वोत्तर भारताची परिस्थिती जम्मू-काश्मीर प्रश्नाच्या तुलनेत खूपच जास्त गंभीर आणि गुंतागुंतीची आहे. आणि ज्या प्रमाणात संघाचे पदाधिकारी ईशान्य भारतात प्रवास करतात, इथे नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यांचा विचार करता, संघाने इथल्या परिस्थितीचे गांभीर्य पुरेपूर जाणले आहे, हे ठळकपणे लक्षात येते.
कोणत्याही देशाच्या सीमा या त्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि सर्वांगीण सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. भारताच्या एकूण आंतरराष्ट्रीय सीमांपैकी ४० टक्के सीमा या ईशान्य भारतीय राज्यांच्या बाह्य सीमा आहेत. बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि चीन म्हणजेच तिबेटचे पठार यांच्या सीमांना या राज्यांच्या सीमारेषा मिळतात. घनदाट जंगलं, डोंगररांगात विसावलेली छोटी छोटी गावं, वस्त्या, तिथली विरळ लोकसंख्या, दर्याखोर्यांत, निर्मनुष्य जागांवर असणार्या या बाह्यसीमा इत्यादी अनेक कारणांमुळे हा सगळाच प्रदेश अतिशय संवेदनशील आहे. त्यात १९४७ साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हाही ‘मॅकमोहन रेषे’बद्दल काही प्रमाणात संदिग्धता होती. धूर्त, बेरकी आणि विस्तारवादी चीनने १९५० साली तिबेट आपल्या घशात घातले. त्यानंतरचा काळ होता ’फॉरवर्ड पोलिसी’चा, जी १९६२ साली झालेल्या युद्धात आपल्यावरच उलटली आणि त्यापायी आपले हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. भारताची जगभर भयंकर नामुष्की झाली. हा प्रदेश म्हणजे दक्षिण पूर्वेकडच्या भरभराटीला आलेल्या अर्थव्यवस्थांना भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. इथे सोने, युरेनियम, कोळसा, तेल, जलविद्युत इत्यादी प्रचंड मोठी संपत्ती निर्माणाची साधने आहेत. ईशान्य भारत म्हणजे आपल्याला स्तिमित करणारा वेगवेगळ्या धर्मांचा, संस्कृतींचा, भाषांचा जणू कॅलिडोस्कोपच आहे.
आता या सगळ्या गोष्टी जशा आपल्याला माहिती आहेत, तशाच त्या देशविघातक शक्तींनाही माहिती आहेतच ना..! इतकेच नाही, तर अशा मतलबी, स्वार्थी व्यवस्थांनी या सगळ्या प्रदेशाचा विविध अंगांनी पद्धतशीर अभ्यास केला आहे. त्यात जानमालाची गुंतवणूक केलेली आहे. भविष्याच्या योजना आखल्या आहेत आणि अतिशय शिस्तपूर्वक आपली कामगिरी ते गेली दोन शतके इथे करत आहेत. भारतीय समाज, इथले जागृत कार्यकर्ते मात्र आपल्या देश, समाजप्रती आस्था, प्रेम, कर्तव्याची जाणीव या प्रेरणांतून ईशान्य भारतीय समाजाला आलेली मरगळ झटकून त्यांना स्वबळावर उभे करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची, सहकार्याची, एकात्मतेची, स्वाभिमानाची, स्वधर्मप्रेमाची जाणीव निर्माण करीत आहेत. आता जम्मू-काश्मीर प्रश्न आपणा सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण, जेव्हा आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ईशान्य भारतासंदर्भात, गेल्या ६० वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा, इथे केलेल्या कामांचा आढावा घेतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पूर्वोत्तर भारताची परिस्थिती जम्मू-काश्मीर प्रश्नाच्या तुलनेत खूपच जास्त गंभीर आणि गुंतागुंतीची आहे. आणि ज्या प्रमाणात संघाचे पदाधिकारी ईशान्य भारतात प्रवास करतात, इथे नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यांचा विचार करता, संघाने इथल्या परिस्थितीचे गांभीर्य पुरेपूर जाणले आहे, हे ठळकपणे लक्षात येते.
साधारण १९५०च्या जवळपास संघ कार्यकर्ते या राज्यामध्ये काम करू लागले. परंतु, तोपर्यंत नागालँड, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये धर्मांतरांचे काम प्रचंड वेगाने झाले होते, होत होते. त्रिपुरा, मणिपूर या राज्यांतही ख्रिश्चन धर्मांतरितांची संख्या खूप होती. अरुणाचल प्रदेशातही चर्चचा, मिशनरी संस्थांचा प्रभाव जबरदस्त ताकदीने वाढत होता. आसाममध्येही मिशनरींचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत काम करणे खूपच धोकादायक होते. गेल्या पाच दशकांत या भागात जितक्या संघ विचारकांच्या हत्या करण्यात आल्या किंवा त्यांच्या बाबतीत घातपाताचे प्रकार झाले, तितके बाकी कोणत्या राज्यात अजून झाले नसावेत इतकी इथली परिस्थिती अवघड आहे. ‘घरवापसी’चे वाढते प्रमाण, लोकांची स्वधर्माविषयीची वाढती आस्था, धर्मांतरण घडवून आणणार्या मिशनरी संस्थांच्या बाजारूपणाचे उलगडत जाणारे स्वरुप यामुळे आपला एकाधिकार परत मिळवण्याच्या प्रयत्नात चर्च संस्था आता अधिक आक्रमक झाल्या आहेत. पूर्वी छोट्या छोट्या झोपड्यांत होणार्या प्रार्थना आता मोक्याच्या जागांवर नव्याने बांधण्यात आलेल्या टोलेजंग चर्चेसमध्ये होत आहेत. सोल हार्वेस्टिंगचे(धर्मांतरणाचे कार्यक्रम) वर्षातून एक दोनदाच होणारे कार्यक्रम आता वर्षातून अनेकदा, नियमितपणे आणि जागोजागी करण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थी चर्चची हताशाच आहे, असे म्हणावे लागेल.
गेल्या काही वर्षांमधले सामाजिक आणि राजकीय किंवा मतपेटीमधले बदल हेच सांगतात की, या लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरी लोक नीरक्षीरविवेकाने आपली मते ठरवू लागले आहेत. समोरचा माणूस जोखण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होऊ लागली आहे. आपला, आपल्या मुलांच्या भवितव्याचा, सुरक्षिततेचा, स्थैर्याचा, प्रगतीचा मार्ग आश्वासकपणे त्यांना ठरवता येऊ लागला आहे आणि हा सगळा बदल हेच संघकार्याचे परिमाण आहे. साधारण १९४६च्या सुमारास दत्तोपंत ठेंगडी यांनी ईशान्येत कामाला थोडीशी सुरुवात केली होती. पण, लगेच लागलेल्या संघबंदीमुळे हे काम १९५० साली परत सुरु झाले. त्याकाळचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख एकनाथ रानडे यांनी आसाममध्ये भरपूर प्रवास केला. तेव्हा त्रिपुरा, मणिपूर आणि खासीं हिल्स वगळता बाकी सर्व राज्ये ‘आसाम’ म्हणूनच ओळखली जात. बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांची पद्धतशीरपणे केली जाणारी आयात त्यांना काळजीत टाकत होती. एकीकडे चर्चच्या माध्यमातून नागा आणि इतर जनजातींना फुटीरतावादाचे शिक्षण दिले जात होते. आपली व्यथा त्यांनी महाराष्ट्र प्रांताचे संघचालक बाबाराव भिडे यांच्यासमोर मांडली आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आसाममध्ये काम करायला पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानुसार पहिल्या दहा संघ प्रचारकांची फळी आसामच्या भयंकर पूर्वपरिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या भागात पोहोचली. तसेच पंजाबचे ठाकूर रामसिंग यांना प्रांत प्रचारक म्हणून नेमण्यात आले. त्यांच्याबरोबर गंगा विष्णू हेही होते. १९५२ साली १२ शाखा लागू लागल्या होत्या. त्याच पुढे १९५७ साली १५० पर्यंत वाढल्या आणि त्या वर्षीच्या वार्षिक वर्गाला ३०० हून ही अधिक स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानातून येणार्या हिंदू निर्वासितांचे लोंढे हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. या बांधवांची प्राथमिक सोय करण्यासाठी तातडीची मदत संघाच्या माध्यमातून उभी करणे, त्यासाठी निधी आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करणे, आलेल्या मदतीचे लगोलाग वाटप आणि साठवण व्यवस्था इत्यादी कामे संघाने मोठ्या प्रमाणावर केली. संघ वरिष्ठांच्या पुढे काही महत्त्वाचे प्रश्न होते. पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशातून होणारी घुसखोरी, आसाम आणि ईशान्येतील इतर राज्यांत होणारे लोकसंख्याशास्त्रीय बदल, धर्मांतरण, उत्तरपूर्व भारतातील फुटीरतावाद, दहशतवादातील चर्चची भूमिका, स्थानिक जमातींचा सांस्कृतिक निप्पात, दहशतवाद बळावण्यामधली परदेशी शक्तींची भूमिका इत्यादी प्रश्नांना हात घालणे खूप गरजेचे होते. त्यामुळे सर्व शक्तीनिशी विविध माध्यमांद्वारे संघाने या आणि अशा अनेक प्रश्नांसंदर्भात मुळापासून काम केलेले आपल्या निदर्शनास येते. आता यातला मुद्दा म्हणजे बांगलादेशी घुसखोरांचा! गेल्या ७० वर्षांत बांगलादेशातून भारतात येणार्या हिंदू, मुस्लीम तसेच विविध मार्गांनी येणारे रोहिंग्या मुसलमान सर्वांच्याच बाबतीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आणि वेळोवेळी आपल्याला सोयीचे होतील,असे निर्णय दिलेले आहेत. पण, बांगलादेशी मुस्लिमांना आसाममध्ये आणून आपली मतपेटी मजबूत करायची किंवा अगदी सुरुवातीच्या काळात तर बांगलादेशाशी जोडून घेण्यासाठी इथली मुस्लीम लोकसंख्या वाढवायचे पद्धतशीर प्रयत्न सरकारी माध्यमातून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. संघाने याबाबत नेहमीच एक ठोस, संयमित, सर्वकल्याणकारी भूमिका घेतली आहे. पण, राजकीय शत्रूतेचा भाव ठेवल्यामुळे काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी संघाच्या सूचनांच्या विपरीत निर्णय घेतले आणि परिणामी कायमच भारताच्या या सीमा अशांत, असुरक्षित राहिलेल्या आहेत.
आसामी समाजातही याविरुद्ध वादळे उठत होती आणि याची झळ नोकरीधंद्यासाठी आसाममध्ये राहाणार्या आसामेतर भारतीय बंधूंनाही लागू लागली. परंतु, संघाने जनजागृती करून ’परदेशी, परकीय घुसखोर आणि इतर प्रांतांतले भारतीय नागरिक’ यांच्यातला फरक इथल्या लोकांपर्यंत पोहोचवला. याचा खूप चांगला परिणाम परदेशी घुसखोरांच्या विरुद्धच्या आंदोलनाच्या वेळी झाला. ’अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’नेही ईशान्य भारतातील अनेक प्रश्नांच्या संदर्भांतील आपली भूमिका अतिशय नीटपणे आणि वेळोवेळी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. साधारण १९६०च्या दरम्यान संघव्यवस्थेतून इतर सामाजिक प्रश्नांवर काम करायला सुरुवात झाली. यात पहिले नाव घ्यावे ते भैय्याजी काणे यांचे! त्यांनी फुटीरतावादी प्रभावित अशा मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यात शिक्षकाची नोकरी केली. अगदी प्राणांवर बेतणारे अनुभव गाठीशी असतानाही आपले काम थांबवले नाही. उलट येथील मुले शिक्षणासाठी म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक इथे न्यायला सुरुवात केली. याचा हळूहळू खूप मोठा परिणाम झाला. ही मुले भारतीयत्वाचे दूत बनून परत आपल्या गावी जाऊ लागली. लोकांची मने निवळू लागली. शिक्षणाचा, राष्ट्रप्रेमाचा पाया रचला जाऊ लागला. आज त्यांच्या नावाने उखरुल, चूड़ाचाँदपूर आणि तमेंलोंग अशा तीन जिल्ह्यात तीन उत्तम शाळा आहेत. संघाच्या माध्यमातून जनकल्याण समितीच्या नावाने आता भारतभर अशी ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे आहेत. संघप्रेरित विद्यार्थ्यांचे संघटन म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आजचे नागालँडचे राज्यपाल आणि त्याकाळचे म्हणजे १९६६ साली राष्ट्रीय अध्यक्ष महामहिम पद्मनाभ आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सुरू झाले. त्यातला अजूनही उत्तम प्रकारे चालणार कार्यक्रम म्हणजे ‘स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटरस्टेट लिविंग (सेल)’.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी एकमेकांच्या राज्यात जातात आणि तिथल्या जनजीवनाचा अनुभव गाठीला बांधतात. अभाविपचा ’भारत दर्शन’ हा कार्यक्रमही यातलाच एक भाग आहे. ईशान्य भारतीय तरुणांना राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रवाहात जोडण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आखले जातात. जेव्हा अभाविपने इथे काम सुरु केले, तेव्हा या समाजाची अभ्यासात्मक समज येणे गरजेचे आहे, ही गोष्ट पद्मनाभ आचार्य यांच्या लक्षात आली. त्यानुसार ”आसामी जनजातींचा, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून काही कार्यकर्ते इथे दाखल झाले. या प्रक्रियेत त्यांनी अनेक जनजातींच्या तरुणांशी संवाद साधला. मेघालय, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये ही परिक्षणे केली गेली. ही जमिनीवरील आणि मूलभूत संशोधनाची प्रक्रिया आजही अविरतपणे सुरुच आहे. यातच पुढे २००४ साली ’युवा विकास केंद्रा’ची स्थापना झाली. या सगळ्या संघप्रणीत संस्थांच्या कामांमागचा विचार, या कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन अत्यंत संयमित असतो. स्वतःचा, आपण काम करत असलेल्या संस्थेचा बडेजाव मिरवणे, केलेल्या छोट्या मोठ्या कामांची जाहिरात करणे असले प्रकार ते कधीही करत नाहीत. त्यांच्यासाठी हे राष्ट्रनिर्मितीचे, समाजबांधणीचे आणि ईशान्येतल्या आपल्या बांधवांना राष्ट्रवादी, एकात्मतेच्या प्रवाहात आणण्याचे विधायक काम असते आणि या कामाचा, या कष्टांचा दुसरा कसलाही वापर केला जात नाही. जगभरातील देशादेशांमधले सीमाप्रश्न हे विस्तारवादी, वसाहतवादी मानसिकतेचे परिणाम आहेत.
आपली ताकद, आपल्या कक्षा वाढवण्यासाठी जगभरात चर्चप्रणीत संस्थांनी धर्माचा आधार घेतलेला आहे. धर्मांतरण करून छोटे-मोठे समाज, तिथली साधनसंपत्ती, मनुष्यबळ आपल्या एकाधिकाराखाली आणायची त्यांची पद्धत फार जुनी आहे. त्यासाठी छोट्या मोठ्या समाज समूहांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचा फटका ईशान्य भारतीय समाज गेली २०० वर्षे सहन करीत आहे. इथली संस्कृती वैशिष्ट्ये, परंपरा, स्वाभिमानाची जाणीव, एकात्मतेची, भारतीयत्वाची भावना हे सगळं ख्रिस्ती धर्मांतरणाच्या रगाड्यात चेचलं गेलं आहे. फुटीरतावादी गटांना चर्चतर्फे मदत केल्या गेल्याच्या घटना सर्वश्रुत आहेत. कल्याण आश्रम यासंदर्भात सर्व पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणून लोकांना धर्मांतरणापासून परावृत्त करीत आहे. लोकांना स्वधर्मात परत आणण्याचे त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत. ’चर्चच्या सामाजिक भूमिकेविषयी’ लोक आता जागोजागी जागृत होऊ लागले आहेत. कल्याण आश्रमाच्या माध्यमातून स्वधर्माची नवी ओळख इथल्या समाजाला होऊ लागलेली आहे. अधिकाधिक लोक आपापल्या धर्माच्या तत्वज्ञानावर, परंपरांवर विचार करू लागले आहेत. त्यात उपयुक्त, आजच्या काळाप्रमाणे बदल करून ते पुनरुज्जीवित करू लागले आहेत. ‘आपण आपल्या धर्माला वाचवले तर आपला धर्म आपल्याला वाचवेल,’ ही जाणीव समाजाच्या सर्व घटकांना आता होऊ लागली आहे.
‘एकल विद्यालये’ हे विश्व हिंदू परिषदेच्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे. ‘सेवा भारती’, ‘विद्या भारती’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘आदिवासी सोसायटी’ (एफटीएस) किंवा ‘वनबंधू परिषद’ (व्हीबीपी), ‘विश्व हिंदू परिषद’, ‘भारत कल्याण प्रतिष्ठान’ (व्हीएचपीची एकक), ‘भारतीय जन सेवा संस्थान’ (बीएसएसएस) आणि इतर अनेक संस्था या भागात काम करत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक महासंघातर्फे ईशान्येकडील राज्यांमधील बालवाडी, बाल संस्कार केंद्रे, वसतिगृहे, निवासी शाळा, रात्री शाळा, प्रशिक्षण केंद्र आणि प्राथमिक, माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक शाळा यासह औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारे शैक्षणिक संस्था चालविल्या जात आहेत. संघव्यवस्थेतील ‘विद्याभारती’, ‘सेवाभारती’ या संस्थांनीही ईशान्य भारतात आपल्या कामाची ठळक मोहोर उमटवली आहे. श्रीकांत जोशी, रजनीकांत शर्मा यांनी १९७९ साली गुवाहाटीत पहिली ‘विद्याभारती’ची शाळा सुरु केली. आज आसाममध्ये सरकारी शाळांच्या खालोखाल ‘विद्याभारती’च्या शाळा आहेत. इथे ते विद्यार्थ्यांनाच नाही, तर मुलांच्या मातांनाही शालेय शिक्षणासोबत राष्ट्रीय विचारांचे खतपाणी देतात. आज यातील अनेक विद्यार्थी शाळांत परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. ‘सेवाभारती’चाही विस्तार आणि कामाची पद्धती वाखाणण्याजोगी आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी ते जागोजागी अनेक क्रॅश कोर्स पद्धतीचे वर्ग घेतात.
योगासन वर्गांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. समाजात विरळ होत चाललेल्या समाजाप्रती कर्तव्याच्या जाणीवा परत सचेत करतात. विविध प्रकारे समाजमनाला घडवण्याचे महत्त्वाचे काम अशा विविध संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. यात अनेक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे. कोणाची आणि किती नावे घ्यावी? कसोटीचे प्रसंग तर कितीतरी आले. आजही येत आहेत. या लेखात सगळ्या गोष्टींचा उल्लेख शक्य नाही. पण, या सगळ्या संस्थांच्या उल्लेखनीय कामांची कदर आज ईशान्य भारतीय समाज करतो आहे, हे मात्र पदोपदी जाणवते. इतकेच नाही, तर आज बदललेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे आज या कार्याची दखल जगात सर्वांनाच घ्यावी लागत आहे. संघ विचार मानणार्यासाठी, या कार्यकर्त्यांसाठी हीच त्यांच्या त्यागाची, कष्टांची पोचपावती आहे. अर्थात, या कामाला अधिकाधिक हातांची अखंड गरज आहेच. देशप्रमी, सेवाभावी कार्यकर्त्यांची आवश्यकता कधीच पुरी होत नसते. हो ना!?
(सदर लेखासाठी रतन शारदा यांच्या ईशान्य भारतावरील प्रबंधातील तसेच मे. जन. शशिकांत पित्रे यांच्या ‘न सांगण्यासारखी गोष्ट’ या पुस्तकातील काही संदर्भ वापरले आहेत.)
- अमिता आपटे
९९८७८८३८७३