आमच्या घटनाकर्त्यांनी आम्हाला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधित केले, तेव्हा याचा संबंध केवळ लोकसंख्येपुरताच मर्यादित नक्कीच नव्हता. त्यांच्या दृष्टीने एकात्म, समरस, समान ध्येय असणारा, विषमता नसणारा आणि सर्वांना समान संधी असलेला समाज अपेक्षित असणार, यात शंका नाही. गरिबी निर्मूलन करून आर्थिक समृद्धी आणणे आणि त्यासोबतच समान लक्ष्य असणारा भारतीय समाज निर्माण करणे, हे आमचे लक्ष्य असायला हवे.
देशाने दि. २६ जानेवारी, १९५० रोजी संविधान स्वीकारले आणि संविधानाच्या स्विकृतीनंतर आपला देश ‘प्रजासत्ताक’ झाला. देशाची भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक विषमता ध्यानात घेऊन आमच्या संविधान निर्मात्यांनी भविष्यात देशापुढे येणार्या समस्या सोडविण्यास सक्षम ठरेल, असे संविधान देशाला, देशवासीयांना बहाल केले. संविधानाच्या प्रस्तावनेस प्रारंभ करताना त्यांनी ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख केला. ‘आम्ही भारताचे लोक’ अर्थात ‘आम्ही आता स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक आहोत आणि कोणत्याही परदेशी सत्तेच्या अधीन नाही. आमचे संविधान कोणत्याही परदेशी सत्तेद्वारे निर्देशित अथवा निर्मित नाही. हे संविधान आमच्या प्रतिनिधींनी अर्थात आम्हीच बनविले आहे. याचा अर्थ म्हणजे आमच्याद्वारे निर्मित संविधान आम्ही स्वीकारत आहोत.’
‘आम्ही भारताचे लोक’ स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जवळपास ४० कोटी होतो, आता आम्ही जवळपास १३८ कोटी झालो आहोत आणि आता आम्हीच आमच्या भाग्याचे निर्मातेही आहोत. आपल्या देशात प्राचीन काळापासून ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण प्रचलित आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात राजेशाही होती. राजघराण्यातून राजाची निवड केली जात असे. राज्याच्या धोरणांचे पालन प्रजा करीत असे, त्यामुळे ‘यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण प्रचलित झाली असावी. स्वातंत्र्यानंतर आम्ही लोकशाही स्वीकारली, ज्यामुळे जनतेच्या मतांमुळे लोकप्रतिनिधी निवडण्यास प्रारंभ झाला. म्हणजे आता आम्हीच आमचे प्रतिनिधी निवडतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या संख्याबळानुसार बहुमत असलेला पक्ष सरकार स्थापन करतो. त्यामुळे या म्हणीस आता ‘यथा प्रजा तथा राजा’ असेही म्हणता येईल. त्यामुळे देशहिताचा विचार करून मतदान करणार्या समाजाची घडण करण्याचे काम देशातील अग्रणी लोकांचे आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी या कार्यास ‘लोकमनाचा संस्कार’ असे म्हटले आहे.
जेव्हा आपण ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख करतो, त्यावेळी देशाच्या १३८ कोटी जनतेशी त्याचा संदर्भ असतो. मात्र, १३८ कोटी भारतीयांचे मन, संस्कार आणि संस्कारावर आधारित वागणूक कशी आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. हिमालय ते हिंद महासागर, गुजरात ते मणिपूर अर्थात उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम असा विशाल ३२.०८ लाख वर्ग किलोमीटरचा विस्तृत भूभाग असलेला भारत देश आहे. भौगोलिक हवामान, ऋतूंची विविधता हेदेखील आपले एक वैशिष्ट्य. दर दोन कोसांवर पाणी तर चार कोसांवर वाणी बदलते, असे भाषेच्या संदर्भात देशात म्हटले जाते. त्यामुळेच संविधान स्विकृत २२ भाषा आणि प्रादेशिक आधारावर १२९ हून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. खान-पान, वेशभूषा, जन्म, धार्मिक आस्था, शिक्षण आणि आर्थिक आधार यामुळे विविधता निर्माण झाली आहे. वरवर पाहणारे लोक या विविधतेमध्ये भेद बघतात.
गुलामगिरीच्या दीर्घ कालखंडामध्ये आपण स्वातंत्र्यासाठी लढा देत होतो. त्यामुळेच गतिशील समाजामध्ये समाजरचनेविषयी वारंवार विचारमंथन करण्यात आपण कमी पडलो. जी समाजव्यवस्था कालबाह्य झाली होती, त्याविषयी पुनर्विचारही होऊ शकला नाही. त्यामुळे अस्पृश्यता, वर्णभेदाने आपल्या समाजाला जखडून टाकले आणि आजही त्याची उदाहरणे विविध घटनांद्वारे दिसून येतात. उद्दिष्टापासून दूर जाणे अथवा उद्दिष्टच नसल्याने स्वार्थी वृत्तीमुळे आपल्यामध्ये अनेक दोष उत्पन्न झाले. महिलांविषयीची दृष्टी अथवा अनेक कुरीतींचा जन्म याच स्वार्थी मानसिकतेमुळे झाला. भारताकडे प्राचीन सांस्कृतिक वारसा आणि जगाला दिशादर्शन करण्यास सक्षम अशी ज्ञान परंपरा आहे. आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी पुरेशी कृषीयोग्य जमीन, जल आणि वनसंपदा तसेच विपुल प्रमाणात श्रमशक्ती उपलब्ध आहे. या तीन गुणांच्या आधारावर आपण जागतिक महाशक्ती होऊ शकतो. ज्या जागतिक सत्ता भारताला सामर्थ्यशाली बघू इच्छित नाहीत, ते भारतास कमकुवत करण्यासाठी भारतीय समाजामध्ये विविध भेदांना वाढविण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहेत. देशाच्या एकात्मतेस खंडित करण्यात काही प्रमाणात या मंडळींनी यशही प्राप्त केले आहे.
गुलामीच्या कालखंडापासूनच या शक्तींनी भारतीय समाजास कमकुवत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी अनेक कपोलकल्पित सिद्धांत पुढे करण्यात आले. ‘उत्तर-दक्षिण, आर्य-द्रविड, आदिवासी-शहरवासी, भारत राष्ट्र नसून अनेक राष्ट्रांचा समूह आहे’ हे आणि असे सिद्धांत समाजात भेद निर्माण करण्याच्या मानसिकतेचे उदाहरण आहे. छोट्या-छोट्या अस्मितांना आधार बनवून आंदोलन उभे करणे आणि फुटीरतावादाचे बीज रोवून संघर्ष उभा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्यातील कोरेगाव-भीमा प्रकरण, शीख-हिंदू संघर्षांच्या आधारावर दहशतवादास प्रोत्साहन, स्पृश्य -अस्पृश्य वाद उभा करून गुजरात आणि उत्तर प्रदेशातील घटना या फुटीरतावादी मानसिकतेतून आल्या आहेत. नवनव्या सिद्धांतांना पुढे करणे, ऐतिहासिक घटनांच्या संदर्भांचा विपर्यास करणे, हिंसाचार पसरविणे, हिंसाचार पसरविणार्या संघटनांना बौद्धिक पाठिंबा देऊन संरक्षण प्रदान करणे, त्यांना समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी एक व्यवस्था देशभरता पसरली आहे. गरिबी, मागासलेपण, पर्यावरण आदी मुद्द्यांचा आधार घेऊन काम करणार्या शक्तींनाही ओळखणे आवश्यक आहे. कारण, अशा संघटनांचे नाव, नेतृत्व बदलत असले तरी देशविभाजक मानसिकता कायम राहते. ‘आम्ही भारताचे लोक’ जोपर्यंत अशा भेदांमध्ये अडकून राहिलो आणि अज्ञानामुळे षड्यंत्रांना बळी पडत राहिलो, तर संविधानामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या संकल्पांची पूर्ती होणे शक्य नाही. त्यामुळे ‘विविधतेत एकता’ हे सूत्र आत्मसात करण्याची गरज आहे.
विविध जाती आणि प्रांतांमध्ये जन्म घेऊनही, विविध पूजापद्धतींचे पालन करूनही आपण एकाच भारतभूमीची संतान आहोत, हे विसरता कामा नये. ही सश्य-श्यामला भूमी आपली आई आहे आणि आई - मुलाचा संबंध आमच्यामध्ये बंधुभाव निर्माण करतो. आमचा एक वारसा आहे, आमची संस्कृती एक आहे. समाजसुधारक, विविध गुणांचा आधार घेऊन उपदेश देणारे उपदेशक, प्रबोधनकार, देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणारे सर्व महापुरुष आमचे आहेत आणि आम्ही त्यांची संतान आहोत. प्रसिद्ध समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी याच आधारावर म्हटले होते की, या देशाला जोडणारे तत्व राम, कृष्ण आणि शिव आहेत. आम्हाला याच एकात्मतेस प्राधान्य द्यायचे आहे. जगात भारतास अग्रणी बनविण्याचे लक्ष्य आम्ही सर्व १३८ कोटी भारतीयांना एका दिशेने मार्गक्रमण करण्यास प्रेरित करणारे आहे. आमच्या घटनाकर्त्यांनी आम्हाला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधित केले, तेव्हा याचा संबंध केवळ लोकसंख्येपुरताच मर्यादित नक्कीच नव्हता. त्यांच्या दृष्टीने एकात्म, समरस, समान ध्येय असणारा, विषमता नसणारा आणि सर्वांना समान संधी असलेला समाज अपेक्षित असणार, यात शंका नाही. गरिबी निर्मूलन करून आर्थिक समृद्धी आणणे आणि त्यासोबतच समान लक्ष्य असणारा भारतीय समाज निर्माण करणे, हे आमचे लक्ष्य असायला हवे. देशातील आजच्या अग्रणी देशांनी आपल्या समाजामध्ये या गुणांची वृद्धी करूनच अग्रणी होण्याचे लक्ष्य साध्य केले आहे. यंदाचे वर्षे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे त्याचे औचित्य साधून महापुरूषांच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला, तरच ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.
लेखक : शिव प्रकाश, राष्ट्रीय सह संघटनमंत्री, भाजप
अनुवाद :पार्थ कपोले