भारताचा सांस्कृतिक राष्ट्रवाद : मुक्त चिंतन

    19-Feb-2022
Total Views | 447

India
 
 
 
जशी ‘राष्ट्र’ ही संकल्पना नकारात्मक मानून ती नकोच म्हणणारे चिंतक आपण पाहिले, तसेच राष्ट्रवादी विचारसरणीचा विरोध करणारी अशी आणखी एक प्रादेशिक स्वायत्तता म्हणून वैचारिक बाजू आहे. त्यांच्या मनात भारत म्हणजे ‘अनेक राष्ट्रकांचे तुकडे आहे’ हे पक्के बसले आहे. सुदैवाने सर्वसामान्य देशभक्त नागरिक त्यांचे हे मत स्वीकारत नाही. मात्र, या मताचा आधार घेऊन फुटीरतावादी गट तयार करता येतात. त्यात युवकांना ओढून आणले जाते. भाषावाद, प्रांतवाद यांचा राष्ट्रवादाच्या विरोधात चलन म्हणून वापर केला जातो. अर्थात, हा विचार अत्यंत असंवादी आणि नकारात्मक असल्याने तो एखाद्या राजकीय गटासोबत डोके वर काढतो व पुन्हा लयास जातो.
 
 
 
भारतामध्ये ‘भारतीय राष्ट्रवादा’चे चिंतन दोन दिशांनी केले जाते. एक दिशा आहे ‘आयडिया ऑफ इंडिया’ या स्वातंत्र्योत्तर मांडल्या गेलेल्या नूतन विचारधारेची, तर दुसरी दिशा आहे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची. अर्थात, भूतकाळातील भारतीय संकल्पनांना कवेत घेऊन भविष्याकडे जाण्यासाठी या दोन्हीही विचारधारांच्या प्रतिपादकांचे असे म्हणणे असते की, ‘भारतीय जनता आमच्या दिशेने गेली तरच तिचे भले होईल!’ या दोन्ही विचारधारांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, यांची अनेक मूलभूत तत्त्वे एकसमान आहेत. दोन्ही बाजूंना हे मान्य आहे की, भारतीय संस्कृती ही वैविध्यपूर्ण असूनही एकात्म आहे. दोन्ही बाजू हेही मान्य करतात की, सहिष्णुता हा भारतीय जनमानसाचा गाभा आहे. ‘We are genetically programmed to be plural, liberal and inclusive.’ दोन्हीही विचारधारा आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ देशविदेशातील विचारवंतांचे दाखले तर देतातच आणि त्यातही रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन या विचारवंतांची नावे दोन्हीकडून घेतली जातात. दोन्हीही विचारधारांना भारताने आपली राज्यव्यवस्था जगापुढे आदर्श व्यवस्थेचे उदाहरण म्हणून ठेवावी, असे वाटत असते. अनेक बाबतीत इतक्या समानधर्मी दिसणार्‍या विचारधारा मात्र काही बाबींमुळे अगदीच परस्परविरोधी ठरल्या आहेत.
 
 
 
या विरोधी गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे पाहू. ’आयडिया ऑफ इंडिया’ या नूतन विचारधारेला सहिष्णू असलेले वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मानसमान्य आहे. परंतु, त्याचे श्रेय संस्कृत, पाली, प्राकृत या भाषा, त्यांतील बोधग्रंथ व ते मांडणारे संत, तत्त्वज्ञ यांना ती देऊ इच्छित नाही. दुसरे म्हणजे भारत हे ‘राष्ट्र’ म्हणून अलीकडच्या काळात उदयास आले आहे, ते प्राचीन काळापासून ‘राष्ट्र’ म्हणून एकसंध नव्हते, असा या विचारधारेचा विश्वास आहे. विरोधाचा आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे, ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’त अभिजनांची संस्कृती व त्यांची प्रतीके बहुजनांच्या माथी मारली जातात, असे नूतन विचारधारेचे मत आहे. दि. १५ ऑगस्ट, १९४७ ला नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचे ’मन नवीन असावे’, यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. त्यांनीच ’आयडिया ऑफ इंडिया’ मांडली. परंतु, भारताची प्राचीन धारा त्यांनाही आपल्या आतून वाहत असल्याचा प्रत्यय येत होता. म्हणूनच त्यांनी त्यांच्याच ’भारत आज और कल’ या पुस्तकात म्हटले आहे की, ”मैं अक्सर यह सोच के हैरान रह जाता हूं की हमारी जाति कही बुद्ध, महाभारत, रामायण, गीता और उपनिषदोंको भूल जाय तो उसका क्या हशर होगा? हमारी जडे उखड जायेगी। हम अपनी उन सारी बुनियादी खुबियो को खो देंगे, जो युगों सें हमारे साथ चली आ रही हैं और जिनके कारण दुनिया में हमारी हैसीयत बनी हुई है। तब भारत भारत न रह सकेगा।”
 
 
 
इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा येथील भूवैविध्य, भाषिक वैविध्य, भिन्न भिन्न वेशभूषा, खानपान, रिती, अनेक प्रकारच्या उपासना पद्धती हे पाहून अचंबित झाले. वसाहतकाळात ब्रिटिश मुत्सद्यांनी लिहून ठेवले, ’India cannot be a nation.’ कारण, त्यांच्या पुढे ’नेशन’ म्हणून निर्माण झालेली जी युरोपियन राष्ट्रे होती ती बव्हंशी ‘एक भाषा, एक धर्म’ यावर आधारित होती. ती संघर्ष, विरोध करून निर्माण झाली होती. काही राष्ट्रे धर्माच्या अधिपत्याखाली होती. तेथील अत्याचारी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था मुक्त करून तेथे निधर्मी राज्यव्यवस्था लागू करण्यात आली होती. कधी प्रदेशांचे एकीकरण होऊन तर कधी भांडवलशाही, राजेशाहीच्या विरोधात जाऊन तर कधी समान वंशामुळे एक होऊन इतिहास काळात तिकडचे देश निर्माण झाले होते. त्यामुळेच इथल्या विविधतेने नटलेल्या परंपरा, उपासना पद्धती आणि तरीही एकात्म असलेल्या जीवनशैलीला त्यांना ओळखता आले नाही व ते म्हणाले की, ’भारत हे एक राष्ट्र नाही आणि भविष्यात होऊही शकत नाही.’
 
 
 
इंग्रजांच्याच काळात म्हणायला छोटी पण भारत ’राष्ट्र’ आहे म्हणजे काय, यावर प्रकाश टाकणारी एक घटना घडली होती. १८९३ साली स्वामी विवेकानंद शिकागोमधून आपले जग जिंकणारे भाषण करून भारतीय महाद्वीपाच्या दक्षिणेकडे, तत्कालीन ब्रिटिश सिलोनमध्ये उतरले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. नंतर ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने व स्वागतसमारंभ झाले. ’कोलंबो ते आल्मोडा’ या संग्रहात याची सर्व माहिती समाविष्ट आहे. प्रत्येक भूप्रदेशाच्या सांप्रदायिक, भौगोलिक, भाषिक, ऐतिहासिक, राजकीय अशा भिन्न भिन्न ओळखी असतात. मात्र, अशा प्रदेशांच्या एकत्रित विस्तृत भूभागाची सांस्कृतिक ओळख अनेकदा समान असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतीय उपखंडात भारताच्या संस्कृतीचा ठसा आपल्याला आजूबाजूच्या भूप्रदेशावर स्पष्टपणे दिसून येतो. अगदी महाकाव्य रामायण आणि महाभारत यांची कसोटी लावली, तरीही भारतीय राष्ट्रवादाची व्याप्ती किती मोठी आहे, हे ध्यानात येऊ शकते. एकूणच रामायण व महाभारत हे भारतीय साहित्य, संस्कृती, भारताच्या सामाजिक धारणा, भारतीय तत्त्वज्ञानाचे आदर्श, नैतिक आचार-व्यवहार राजकारण या सर्वच बाबींवर आणि एकूणच भारतीय परंपरांवर भाष्य करणारे अति प्राचीन साहित्य आहे.
 
 
 
भारतीय उपखंडातील प्रत्येक भाग हा या काव्याच्या संवेदनांनी ओतप्रोत भरलेला आहे. तिथे सनातन संस्कृतीचा गौरव सांगणारे अमरग्रंथ रामायण आणि महाभारत यातील आख्याने, प्रतीक कथा आणि पौराणिक कथांचे संस्कृती म्हणून स्थान आहे. या कथांनीच बृहत्भारताला जोडून ठेवले आहे आणि मनुष्याला अर्थवाही जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे. आपण जेथे जाऊ तेथील भूभागावर या संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात. महाकाव्यातींल अन्तर्कथांची पदचिह्ने दिसू लागतात. जीवनयात्रेला तीर्थयात्रेचे स्वरूप प्राप्त होते. भगवान गौतम बुद्धांच्या धम्मक्रांतीने जगातील एक तृतीयांश भागाला धर्म दिला. केवळ करुणेच्या माध्यमातून हा धर्म प्रसार पावला. ना सेवेचा दिखावा, ना पैसा, ना तलवार! या अद्वितीय क्रांतीमुळे भारतभूमी आजूबाजूला असलेल्या देशांची ‘धम्मभूमी’ झाली. जातककथा आणि त्रिपिटके त्यांचे बोधग्रंथ ठरले, आम्हा सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय राष्ट्रवादाची ही ओळख आहे. काही चिंतनशील विद्वान ‘राष्ट्र’ या संकल्पनेचीच धास्ती घेऊन जगत असतात. ती अत्यंत नकारात्मक आणि हिंसक संकल्पना आहे, असे त्यांना वाटते.
 
 
 
‘धर्माधारित राष्ट्रवाद’ किंवा ‘कट्टर राष्ट्रवाद’ हा लोकांमध्ये मूलतत्त्ववाद, कट्टरता, अलगता निर्माण करणारा असू शकतो. त्याने असहिष्णुता निर्माण होऊ शकते. साम्राज्यवादी विस्तारवादी विचारांमुळे हिंसक समूह निर्माण होऊ शकतात, असा विचार काही विचारवंत करतात. ‘युद्धखोर’ अशी राष्ट्राची संकल्पना त्यांना भयभीत करते. जगातील अनेक उदाहरणे त्यांच्या डोळ्यांसमोर असतात. ‘भारतीय राष्ट्रवादा’कडेही ते मग त्याच नजरेने पाहू लागतात. भारतातील काही टोकाचे उग्रवादी लोक त्यांच्या या कल्पनेला पुष्टी देतात. मात्र, हे लोक अत्यल्प असून बहुसंख्य भारतीय जनता तशी नाही, हे या विचारवंतांनी समजून घेतले पाहिजे.
मुळात भारतीय इतिहासात अशी एकही घटना आढळणार नाही की, राष्ट्राच्या नावावर विस्तार करण्यासाठी, साम्राज्यवादी विचार घेऊन येथील सैन्य दुसर्‍या राष्ट्राच्या भूमीवर गेले. जिंकलेला भूप्रदेश बिभीषणाला देणारे श्रीराम येथील पुरातन आदर्श आहेत. पूर्वीच्या काळात येथील गणराज्यांच्या राजेलोकांच्या आपसांत लढाया होत असत. मात्र, त्याची कारणे द्विपक्षीय परस्पर निगडित असत. परंतु, भारताचा धर्म-संप्रदाय, संस्कृती कोणावर लादण्यासाठी येथील शासक कधीही कुठे गेल्याची नोंद नाही. येथील जीवनाचे सूत्रच ’भवतु सब्ब मंगलम्’ हे आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ’सर्वेषाम् अविरोधेन ब्रह्मकर्म समारभेत’ असा आहे।
 
 
 
अटलजी त्यांच्या कवितेत लिहितात,
 
 
हो कर स्वतंत्र मैने कब चाहा हैं,
कर लू जग को गुलाम?
मैने तो सदा सिखाया हैं करना
अपने मन को गुलाम!
भूभाग नहीं, शत शत मानव
के हृदय जितने का निश्चय।
 
 
 
जशी ‘राष्ट्र’ ही संकल्पना नकारात्मक मानून ती नकोच म्हणणारे चिंतक आपण पाहिले, तसेच राष्ट्रवादी विचारसरणीचा विरोध करणारी अशी आणखी एक प्रादेशिक स्वायत्तता म्हणून वैचारिक बाजू आहे. त्यांच्या मनात भारत म्हणजे ’अनेक राष्ट्रकांचे तुकडे आहे’ हे पक्के बसले आहे. सुदैवाने सर्वसामान्य देशभक्त नागरिक त्यांचे हे मत स्वीकारत नाही. मात्र, या मताचा आधार घेऊन फुटीरतावादी गट तयार करता येतात. त्यात युवकांना ओढून आणले जाते. भाषावाद, प्रांतवाद यांचा राष्ट्रवादाच्या विरोधात चलन म्हणून वापर केला जातो. अर्थात, हा विचार अत्यंत असंवादी आणि नकारात्मक असल्याने तो एखाद्या राजकीय गटासोबत डोके वर काढतो व पुन्हा लयास जातो.
 
 
 
या अशा प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी केला. या आधुनिक ऋषीने प्राचीन भारताला आधुनिक भारताशी जोडणारा एक दार्शनिक विचार दिला. त्याचे नाव ‘एकात्म मानव दर्शन’ होय. दीनदयाळजी म्हणतात, “केवळ समानतेच्या नाही तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्ती आणि राष्ट्राचा विचार भारतीय संस्कृतीत केला जातो. भारताच्या राष्ट्रवादाचा उदय स्वार्थासाठी नाही. त्याचा आधार परस्पर संघर्ष नाही. त्याचा आधार समन्वय आणि परस्पर अनुकूलता हा आहे. सामूहिक जीवनाची समान अनुभूती सर्वांच्या अंतःकरणात उदित व्हावी, ही राष्ट्र म्हणून आमची कामना आहे. राष्ट्रजीवनाच्या आधाराने श्रेष्ठमनुष्यता विकसित होऊ शकते. मानवीय जीवनातील श्रेष्ठ गुणांची आराधना भारतीयत्वाची विशेषता आहे. सृष्टीच्या प्रत्येक अंगात एकता आहे. एकच तत्त्व भिन्न भिन्न रूप घेऊन प्रकट होत असते, यावर आमचा विश्वास आहे. या भिन्नतांमध्ये जो एक आत्मा बघू शकतो तो श्रेष्ठ आहे आणि अशा श्रेष्ठ मनुष्यांच्या निर्मितीची जी व्यवस्था आहे तिला आम्ही ‘धर्म’ म्हणतो. विविध विचार, विभिन्न मते मानवी विकासाच्या एकाच रस्त्यावर चालतात, असे आम्ही मानतो व त्यांचा आदर करतो. विभिन्न रूपे, नाम आणि विभिन्न मार्ग ही निरोगी विकासासाठी अपरिहार्य आणि आवश्यक असतात. सगळ्या प्राणिमात्रांच्या कल्याणाची भावना हाच भारताचा राष्ट्रवाद आहे.
 
 
 
आमचे राष्ट्रजीवन विस्तृत भूप्रदेशावर स्थित आहे. यामुळे त्यात विविधता असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये सौंदर्याचे प्रकटीकरण होते. अनेक फुलांपासून जशी सुंदर माळ गुंफली जाते, त्याच प्रकारे वैविध्यामध्ये आम्ही समन्वय स्थापन करून आनंद मिळवू शकतो. जीवनविषयक आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन हाच आहे, हीच आमच्या राष्ट्राची चिती आहे, हेच ’एकात्म मानव दर्शन’ आहे. कोणताही ‘वाद’ अर्थात ‘इझम’ म्हणजे एक ’सामाजिक तत्त्वज्ञान’ असते. ते विशिष्ट सिद्धांतांवर आधारित असते. या सिद्धांतांना घेऊन एक विशिष्ट जीवनशैली निर्माण व्हावी, असा विचार ‘इझम’ मांडणार्‍या विचारवंतांचा असतो. या जीवनशैलीला स्वीकारून जगणारा समूह असावा, यासाठी त्यांनी ते ’सामाजिक तत्त्वज्ञान’ उभारलेले असते. काही ठिकाणी पिढ्यान्पिढ्या अशा तत्त्वाच्या आधारे सुसंवादी जीवन जगणारे समूह नांदतात, तर काही वेळा, तत्त्वज्ञान उच्चतम असूनही ते प्रत्यक्षात निष्फल ठरते व जनतेकडूनच उखडून टाकले जाते, जसे रशियासारखे देश साम्यवादाला उखडून टाकतात.
 
 
 
भारताच्या इतिहासाला जाणणारे रामधारी सिंह दिनकर आपल्या ‘संस्कृती के चार अध्याय’ या ग्रंथात लिहितात, “भारत की सफलता इस बात में हैं कि वह पुरातन और नवीन के बीच समन्वय का संधान करे। पश्चिमी ज्ञान का जो श्रेष्ठ अंश हैं उसका सामंजस्य हम अपने प्राचीन ज्ञानसे बिठाना चाहते हैं। एक हाथ में धर्म का कमल और दूसरे हाथ में विज्ञान की मशाल यही वह कल्पना हैं, जिसे चरितार्थ करके भारत अपने ध्येय मे सफल हो सकता हैं। और यही वह कल्पना हैं जिसकी ओर सारा संसार किसी रहस्यात्मक आशा से भारत की और देख रहा हैं। पश्चिम ने विज्ञान पाकर जो खो दिया भारत अगर विज्ञान के साथ उस वस्तू को भी कायम रख सके, तो कल्याण केवल भारत का ही नही सारे संसार का हो सकता हैं। संसार आज भी भारत के अतीत का प्रेमी हैं, उसके वर्तमान का नही।
 
 
 
- डॉ. रमा गर्गे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121