पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अकरमने प्रशिक्षकपदाची भूमिका न स्वीकारण्यावरून आपल्याच देशाला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानचा संघ खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे जरी हरला, तरी प्रशिक्षकांनाच यासाठी जबाबदार धरले जाते.
दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात झाली आहे. ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीत समावेश असणार्या या पाकिस्तानचे क्रिकेटच्या जगतातही काही चांगले नाव नाही. दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीपोटी क्रिकेट जगतातील अनेक प्रमुख देश पाकिस्तानच्या धर्तीवर क्रिकेट खेळण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. क्रिकेट खेळणे तर सोडाच या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यासही परदेशांतील माजी खेळाडू नकार देतात. परदेशांतील माजी खेळाडूंकडून नकारघंटा ऐकण्याची पाकिस्तानला सवय झाली आहे. मात्र, आता स्वदेशातील माजी खेळाडूंनीही प्रशिक्षकपदासाठी नकार दिल्याने पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली आहे. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अकरमने प्रशिक्षकपदाची भूमिका न स्वीकारण्यावरून आपल्याच देशाला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानचा संघ खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे जरी हरला, तरी प्रशिक्षकांनाच यासाठी जबाबदार धरले जाते. “पाकिस्तानमधील चाहते खेळाडूंवर कमी तर प्रशिक्षकांवर अधिक टीका करतात. यामुळे अनेकदा पाकिस्तानच्या संघाचे क्रिकेट प्रशिक्षक बदलावे लागत असल्याचा इतिहास आहे,” असे अकरमने सांगितले. यामुळेच आपण पाकिस्तानच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे स्पष्टीकरण अकरमने दिले. पाकिस्तानची तुलना भारतीय संघासोबत करताना वसीम अकरम म्हणाला की, “भारतात नेमके उलट आहे. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तरी प्रशिक्षकांना टीकेचे धनी व्हावे लागत नाही. खेळाडू आपल्या कामगिरीमध्ये सुधार करतात आणि पुन्हा ‘कमबॅक’ करतात. मात्र पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. प्रशिक्षकांनाच दोष दिला जातो. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे मन होत नाही,” असे सांगत अकरमने आपल्या देशाला घरचा आहेर दिला. अकरमने ‘आयपीएल’सह विविध देशांच्या लीग स्पर्धांमध्ये अनेक महत्त्वाच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळल्याचा इतिहास आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अनुभव असतानादेखील अद्यापपर्यंत अकरम याने पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची धुरा न सांभाळल्याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. याबाबत विचारण्यात आल्यानंतर त्याने स्वतःच्या देशालाच खडेबोल सुनावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अडला हरी; गाढवाचे पाय धरी
पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदाच्या नेमणुकीवरून आतापर्यंत आजी-माजी खेळाडूंमध्ये अनेकदा वाद रंगल्याचा इतिहास आहे. तर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे चक्क जीवाशी खेळणे, असेच क्रिकेट विश्वात संबोधले जाते. २००७ साली क्रिकेटच्या ‘विश्वचषक’ स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या संघाला पहिल्याच फेरीत दुबळ्या आर्यलँडच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानला पहिली फेरीही पार करता आली नव्हती. या मोठ्या पराभवानंतर तत्कालीन पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांची हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. आज अनेक वर्षे लोटली तरी वूल्मर यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील परदेशातील प्रशिक्षकाचा अशा प्रकारे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ. यानंतर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूने कधीही रस दाखवला नाही. पाकिस्तानच्या संघाचे प्रशिक्षकपद म्हणजे जीवाशी खेळ होण्याचा प्रकार असे म्हणत, या प्रस्तावाकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचा इतिहास आहे. परदेशातील प्रशिक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली. ‘अडला हरी; गाढवाचे पाय धरी’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तानला स्वदेशातील माजी खेळाडूंवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याची वेळ आली. मात्र, माजी खेळाडूंमध्ये वारंवार अंतर्गत राजकारण खदखदत राहिल्याने याचा पाकिस्तानच्या खेळावर मोठा परिणाम झाला. एका संघात असूनही वारंवार खेळाडूंमध्ये गटबाजी होत असल्याचे दिसून आले. 2007 साली ‘विश्वचषक’ स्पर्धेमध्ये भारतालाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तत्कालीन प्रशिक्षकांनी आपला राजीनामा सोपविल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक खेळाडूंनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस दाखवले. २०११ साली झालेल्या ‘विश्वचषक’ स्पर्धेचे जेतेपद भारतानेच पटकाविले होते. त्यावेळी गॅरी क्रिस्टन हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. गॅरी क्रिस्टन यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. सध्या रवि शास्त्री हे भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रवि शास्त्री यांची निवड होताना अनेक परदेशी प्रशिक्षकांनीही रस दाखवला होता. मात्र, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने (बीसीसीआय) परदेशांतील प्रशिक्षकांऐवजी भारतीय प्रशिक्षकांनाच पसंती देण्याचे ठरविले. रवि शास्त्री यांच्या प्रशिक्षणाची वसीम अकरमनेही स्तुती केली आहे. शास्त्री यांची स्तुती करताना पाकिस्तानातील प्रशिक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे अकरम पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत.
- रामचंद्र नाईक