‘कोविड केअर सेंटर’ - पडद्यापलीकडील जग...

    01-May-2021
Total Views | 1090

edake_1  H x W:


मला अभिमान वाटतो की, मला या पडद्यापलीकडील जगाच्या व्यवस्थेचा भाग होता आले. खरंतर या
पडद्यापलीकडच्या जगात शरीर ‘इन्फेक्टेड’ आहे. पण, इथे मनाला आधार देणारी एक फौजच २४ तास कार्यरत आहे. इथे फक्त रुग्णांच्या शारीरिक व्याधींवर उपचार केला जात नाही, तर इथून बरा होऊन बाहेर जाणारा प्रत्येक जण जगण्याची नवीन दिशा घेऊन जातो.


मागील वर्षी पुण्यातील नावाजलेल्या गरवारे कॉलेजने कोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन प्रकारच्या जगण्याचा अनुभव घेतला आहे आणि याही वर्षी या भीषण महामारीला प्रतिकार करण्यासाठी ‘कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’ची ‘आनंदीबाई कर्वे इमारत’ सज्ज झाली. या दोन्ही इमारतींमध्ये महत्त्वाची साम्यता म्हणजे विलगीकरण कक्षाला असलेले मोठेमोठे पडदे आणि पडद्याच्या अलीकडे आणि पलीकडे वागण्याच्या, बोलण्याच्या पद्धतींमधील विलक्षण बदल. एका बाजूला सतत तणावाखाली वावरणारे, बरेचसे संभ्रमात असलेले, भीती-चिंता-काळजी यांनी ग्रासलेले, मला कोरोना होईल, याच्या दडपणाखाली वावरणारे, गेले वर्षभर जवळील तुटपुंजी गंगाजळी जपून-जपून वापरणारे, कोरोनाच्या बिलांचा धडकी भरवणारा आकडा याच्या काळजीने भयभीत झालेले चेहेरे घेऊन वावरणारे नागरिक आहेत आणि दुसर्‍या बाजूला म्हणजे पडद्याच्या पलीकडे जड पावलांनी, हताश, निराश, हतबल झालेले आणि कोरोना रुग्ण म्हणून घोषित झालेले, उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत.



डोळ्यात अश्रू आणि प्रसार माध्यमांनी कोरोनाचा केलेला बाऊ यामुळे सर्वसामान्यांची घुसमट होत आहे. एकतर कोरोना झाला म्हणजे चार-पाच दिवसांत तब्येत खालावत जाणे- सध्या बाजारात गाजत असलेले ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची धावपळ, ‘ऑक्सिजन’ बेडची गरज, तो न मिळाल्यामुळे पुढे व्हेंटिलेटरसाठी धावपळ आणि मग जीवन समाप्ती, असे विदारक चित्र सध्या सर्वत्र रंगवले जात आहे. रुग्णसंख्या वाढत आहे, यात शंकाच नाही. पण, वेळेत उपचार न घेणे, घरीच राहणे, चुकीची औषध घेणे, रोजच्या दिवशी आज बरं वाटेल, या आशेवर तब्येतीकडे दुर्लक्ष करणे, अशा अनेक गोष्टींमुळे साध्या आजारातही विनाकारण आपण अडचणींची भर घालत आहोत. वेळेवर योग्य उपचार हाच या आजारावर रामबाण उपाय आहे. सर्दी-ताप-खोकला यासाठी आजीबाईचा बटवा कामाचा नाही, याची जाणीव प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे.


खरं तर, अशा ‘कोविड केअर सेंटर’ला काम करणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. काम तसं सोप्पचं आहे. पण, शिस्तबद्ध आहे. परंतु प्रसार माध्यमांची दहशत इतकी आहे की, स्वयंसेवक म्हणून अशा ठिकाणी मुलांना पाठवायला पालक तयार होत नाहीत. अशा संकटाच्या वेळी शिवाजी जन्मावा, असं प्रत्येकाला वाटतं. पण, प्रत्यक्ष लढाईची वेळ आली की, मात्र दुसर्‍याच्या घराकडे बोट दाखवलं जातं. खूप विनवण्या करून मग कुठे ही परवानगी मिळते.मला अभिमान वाटतो की, मला या पडद्यापलीकडील जगाच्या व्यवस्थेचा भाग होता आले. खरंतर या पडद्यापलीकडच्या जगात शरीर ‘इन्फेक्टेड’ आहे. पण, इथे मनाला आधार देणारी एक फौजच २४ तास कार्यरत आहे. इथे फक्त रुग्णांच्या शारीरिक व्याधींवर उपचार केला जात नाही, तर इथून बरा होऊन बाहेर जाणारा प्रत्येक जण जगण्याची नवीन दिशा घेऊन जातो. या आमच्या जगात नियमांचं तंतोतंत पालन केले जाते. कोरोनारूपी शत्रूची नस सगळ्यांना माहीत झालीये, त्यामुळे त्याला हरवायचे कसे हेही इथल्या सगळ्या स्वयंसेवकांना माहीत आहे. जुन्या-नव्या स्वयंसेवकांची सांगड घालून आम्ही जोमाने उभे आहोत.


शारीरिक दुरावा असला, तरी मानसिक ओलावा इथे अखंड अनुभवायला मिळतो. दिवस चालू होतो ते रुग्णाच्या काढावाटपाने. मग चहा-नाश्ता, रुग्ण तपासणी, रुग्णांना पार्सल पोहोचवणे, दुपारचे जेवण-चहा-काढा, संध्याकाळी परत रुग्णतपासणी, मोठ्या डॉक्टरांची रुग्णांना भेट, तपासणी, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम, घरी परत जाणार्‍यांसाठी समुपदेशन, रुग्णांना पार्सल पोहोचवणे, रात्रीचे जेवण, दिवसातून तीन-चार वेळा ‘पीपीई किट’ घालून इमारतीमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस, इमारती स्वच्छता, कोणाला काही अडचण नाही ना हे पाहणे, त्यांना धीर देणे, पिण्याचे पाणी न थकता चढवणे, असा भरगच्च दिनक्रम घड्याळाच्या काट्यासारखा अविरत चालू असतो. तोही न थकता, हसतमुखाने.इथे प्रत्येकाने आठ ते नऊ तास सेवा देणे अपेक्षित असते. परंतु, इथले निवासी स्वयंसेवक आणि डॉक्टर यांच्या कामाच्या वेळा संपून गेल्या तरी सर्व जण स्वयंस्फूर्तीने अविरत काम करत असतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहेत. कित्येक स्वयंसेवकांचे, डॉक्टरांचे कुटुंबातीलच कोणीतरी रुग्ण म्हणून याच ठिकाणी येत आहेत.


काही वेळा जवळच्या नातेवाइकांच्या दुःखद घटना कानावर येत आहेत. या घटनांनी काही काळ आम्हीही खचून जात आहोत, मन सुन्न होत आहे. पण, दुसर्‍या क्षणी उठून सेवेसाठी तत्परतेने उभे राहत आहोत. जेवायला बसल्यावर नवीन रुग्ण आला तरीही स्वयंसेवक, डॉक्टर ताटावरून उठून त्याची चौकशी करताहेत, त्याला धीर देत आहेत. गहिवरल्या मनाने आणि जड पावलांनी रुग्ण आत येत आहेत. इथे असणारा प्रत्येक स्वयंसेवक अगदी आपुलकीने रुग्णांना त्यांच्या नेमून दिलेल्या खोली जवळ नेऊन सोडत आहेत. रुग्ण कितीही वाजता आला, तरी अगोदर त्याच्या जेवणाची विचारपूस केली जाते आणि त्याचे जेवण झाले नसेल तर अगोदर त्याच्या जेवणाची सोय केली जाते आणि मगच स्वयंसेवक जेवतो. ही आहे स्वयंसेवकाची समर्पितवृत्ती.खरं सांगायचं तर मागील वर्षी ‘कोविड केअर सेंटर’ला स्वयंसेवक म्हणून येण्यापूर्वी मनाची घालमेल निश्चित झाली होती. थोडा घरच्यांचाही विरोध झाला होता. परंतु ‘राष्ट्र प्रथम’ या जाणिवेने त्यावर मात करून मी आले होते. यावर्षी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून मी इथे आहे. समाजाची गरज पाहता कुटुंबातूनही १०० टक्के पाठिंबा मिळाला आणि मी आले.


edake_1  H x W:


आतमध्ये आल्यानंतर काम करत असताना ‘कोविड केअर सेंटर’ने हळूहळू ‘विरंगुळा केंद्राचे’ रूप धारण केलेले लक्षात येते. दिवसभर गप्पा, गाणी, प्रवचन, भजन-कीर्तन ऐकणे, ओळख असो वा नसो, एकमेकांची आस्थेने चौकशी करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवण जागेवर पोहोचवणे, प्राणायाम, असे विविध उपक्रम रुग्ण एकमेकांसाठी करताना दिसतात. एखाद्या बिल्डिंगमध्ये शाखा भरते, तर दुसरीकडून ‘हास्य क्लब’चा आवाज येत असतो. इथे येताना रुग्णाच्या चेहर्‍यावरील तणाव आणि 11व्या दिवशी बाहेर पडताना भयमुक्त हास्य तसेच स्वयंसेवक व यंत्रणा यांच्याप्रतिची कृतज्ञता मी पाहिली आहे, अनुभवली आहे. “घरी गेल्यावर आपली अशी काळजी कोण घेणार?” अशीही खंत ते जाताना व्यक्त करतात.इथून रुग्ण घरी गेला तरी त्याचे डॉक्टरांशी एक वेगळेच नाते तयार झालेले असते. विश्वास वाढलेला असतो. थोडा जरी तब्येतीत चढ-उतार झाला, तरी अगदी निर्धास्तपणे आणि हक्काने फोन करून विचारतात. “अहो! मला डॉक्टरांशी बोलता येईल का?” आणि आमचे हे डॉक्टरही अगदी आपुलकीने त्यांची चौकशी करतात. इतके प्रेमाने बोलतात की, त्यांचा निम्मा आजार पळून जातो.

खरंतर आजार तसा साधाच आणि योग्य काळजी घेतली की बराही होणारा. परंतु, सध्याचे तापलेले वातावरण बघता कोरोना झाला म्हटले की, रुग्ण मानसिकरीत्या अर्धमेला होतो. हीच गरज ओळखून सर्व स्वयंसेवक त्यांच्याशी अगदी आपुलकीने वागतात. त्यांनी वेळेवर औषधे घेतली का? ते जेवले का? सततची विचारपूस यामुळे त्यांना आजारातून सावरायला चांगलीच मदत होते. शेवटी जाताना रुग्णांचे समुपदेशन होते. यामध्ये स्वतःची काळजी घेत घेत इतर कोरोनाबाधितांना तुम्ही कशी मदत करू शकता, त्यांचे मानसिक बळ कसे वाढवायचे हे सर्व सांगितले जाते. योग्य वेळी रक्तदान, ‘प्लाझ्मा’दान, लसीकरण याविषयीची माहिती दिली जाते. हताश, निराश आणि भीती घेऊन आलेला प्रत्येक रुग्ण ११व्या दिवशी जाताना डॉक्टर, स्वयंसेवक, काका, मावशी यांना भरभरून आशीर्वाद देतो. यावेळी त्यांचे अश्रू अनावर होतात. खरंतर त्यांना डॉक्टरांच्या गळ्यात पडायची मुभा असती तर त्यांनी तेही केलं असतं. परंतु, समुपदेशनात ‘अजून काही दिवस काळजी घ्या’, असं सांगितलेलं असतं आणि त्याचेच ते तंतोतंत पालन करताना दिसतात. आलिंगन देता आलं नाही तरी नेत्रालिंगन मात्र ते निश्चित देतात.

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे, स्वयंसेवक म्हणून काम करत असताना स्वतःमध्ये होणारे सकारात्मक बदल. इथे येऊन स्वयंसेवक म्हणून काम करत असताना प्रत्येक जण निःस्वार्थ भाव शिकतो. अहंकार पूर्णपणे गळून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढतो. मनुष्यप्राण्याने नेहमीच आपल्याभोवती सुरक्षिततेचे कवच ओढलेले असते, त्याची ठरलेली एक चौकट असते, धाटणीतले आयुष्य असते ते सोडून वेगळे काही करण्यास शक्यतो तो धजावत नाही. पण, काळाची गरज ओळखून प्रत्येक तरुणाने या युद्धात ‘योद्धा’ म्हणून उतरले पाहिजे. खरंच जर तुम्हाला स्वतःला अधिकाधिक अनुभवसंपन्न करायचे असेल तर अशा अनोळखी वाटांवरून चाललं पाहिजे. त्यामुळे ‘मीही काहीतरी करू शकतो’ हा आत्मविश्वास वाढतो आणि आपले व्यक्तिमत्त्व अनुभवसमृद्ध बनते. थोडक्यात काय तर, ‘जगावेगळं व्हायचं असेल, तर जगा वेगळं!’अशा या संघकार्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेवा करता येत आहे, याचा मला अभिमान आहे.
‘संघटन में शक्ती हैं!’

-प्रा. अनुराधा शाहू लक्ष्मी येडके


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121