कल्याण : सांस्कृतिक शहर असणार्या कल्याण-डोंबिवलीमध्ये अज्ञातांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
शहरातील महत्त्वाचे ठिकाण असणार्या पत्री पूल परिसरात काही अज्ञातांकडून हिरवा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार मंगळवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आला. येथील एका स्थानिक तरुणाने समाजमाध्यमावर याबाबत चित्रफीत प्रसारित करत पत्री पूल परिसरात काही अज्ञातांनी सोमवार, दि. २५ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री हिरवा झेंडा लावल्याचा आरोप केला. या परिसरातील हिरवा झेंडा हटविण्यासाठी संबंधित तरुणाने समाजमाध्यमाद्वारे चित्रफीत प्रसारित करत नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहनही केले.
तरुणाच्या या आवाहनास प्रतिसाद मिळाला नसला, तरी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. मंगळवारी सायंकाळी पोलीस कर्मचारी या परिसरात दाखल झाले. त्यानंतर हा झेंडा स्थानिक नागरिकांच्या मदतीने उतरविण्यात आला. मात्र, हा प्रकार कोणी व का केला, याचे कारण अद्याप मात्र गुलदस्त्यातच असून पोलिसांकडून याचा शोध मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता.