मार्को आमचा, अलेक्झांडर आमचा, रुस्तम आमचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
VV_1  H x W: 0


मार्को पोलो तुमचा की आमचा, यावरून इटालियन आणि क्रोशियन यांच्यात भांडण होतं. अलेक्झांडर तुमचा की आमचा, यावरून ग्रीस आणि मॅकेडोनिया यांच्यात जुंपते आणि रुस्तम-सोहराब हे वीर पुरुष मुसलमान नव्हते, हे तर आजचे मुसलमान मानायलाच तयार नाहीत.

जी व्यक्ती पराक्रमी आहे, गुणवान आहे, श्रीमंत आहे, बलाढ्य आहे मुख्य म्हणजे जीवनात यशस्वी आहे, ती व्यक्ती आमची, आमच्यातली, आमच्याच गावातली आहे किंवा होती, असं सांगायला माणसांना फार आवडतं. हा मनुष्यस्वभाव आहे आणि तो जगभर सर्वत्र आढळतो. त्याच्या देशकाल परिस्थितीनुसार तो सकारात्मक किंवा नकारात्मक रूप धारण केलेला आढळतो. म्हणून तर मार्को पोलो तुमचा की आमचा, यावरून इटालियन आणि क्रोशियन यांच्यात भांडण होतं. अलेक्झांडर तुमचा की आमचा, यावरून ग्रीस आणि मॅकेडोनिया यांच्यात जुंपते आणि रुस्तम-सोहराब हे वीर पुरुष मुसलमान नव्हते, हे तर आजचे मुसलमान मानायलाच तयार नाहीत.


प्रथम आपण आपल्या देशातल्या गंमती पाहू. भगवान परशुरामांनी सह्याद्री पर्वताच्या एका शिखरावर उभं राहून समुद्रावर ब्रह्मास्त्र सोडलं. समुद्र मागे हटला. भूमीवर आली. तेच आजचं, गुजरातमधल्या भडोचपासून तामिळनाडूतल्या कन्याकुमारीपर्यंतचं ‘सप्तकोकण’ होय. म्हणजे आज या चिंचोळ्या कोकणपट्टीत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि थोडा तामिळनाडू एवढे शासकीय प्रांत येतात. या संपूर्ण किनारपट्टीवर भगवान परशुरामांशी निगडित अनेक स्थानं आहेत नि स्थानिक लोक अतिशय श्रद्धेने ठामपणे सांगतात की, हाच तो आमच्या गावाजवळचा डोंगर म्हणजे, परशुरामांचं निवासस्थान असलेला महेंद्र पर्वत. या श्रद्धेमध्ये ‘महेंद्र पर्वत’ हा जितका महत्त्वाचा असतो, तितकाच ‘आमच्या गावातला डोंगर’ हा शब्द फार महत्त्वाचा असतो.

हिरण्यकश्यपू नावाचा असुर हा देवांचा शत्रू होता. त्याची पत्नी कयाधू आणि मुलगा प्रल्हाद हे मात्र भगवान विष्णूचे अनन्य भक्त होते. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून, ‘मला मनुष्य किंवा पशू, शस्त्र किंवा अस्त्र यांपासून दिवसा किंवा रात्री अशा केव्हाही मृत्यू येणार नाही’ असं वरदान मिळवलं होतं. म्हणून भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णू नरसिंह रुपाने प्रकट झाला. तो धड मानव नव्हता, धड पशू नव्हता, ती वेळ दिवस किंवा रात्र नसून तिन्ही सांजेची होती. नरसिंहाने कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने नव्हे, तर आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याला ठार केलं. ही सारी कथा कुठे घडली? सध्याच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चिनाब नदीच्या पूर्वेला मुलतान हे प्रसिद्ध शहर आहे. इ. स. ७१२ मध्ये अरबस्तानचा खलिफा सुलेमान याचा अरब सेनापती मुहंमद-बिन-कासिम याने भारतावर स्वारी केली. तेव्हा त्याला आढळलं की, मुलतान शहरात एक फार प्रख्यात सूर्यमंदिर असून, लोक मोठ्या प्रमाणावर सूर्योपासक आहेत. त्याने अर्थातच सूर्यमंदिर उद्ध्वस्त केलं. पण, याच मुलतान शहरात एक नरसिंह मंदिरही आहे. स्थानिक हिंदूंची अशी श्रद्धा होती की, हिरण्यकश्यपूचा राजवाडा इथेच होता. त्या राजवाड्यातल्या ज्या खांबाला त्याने लाथ मारली आणि खांब दुभंगून नरसिंह प्रकटला, तोच खांब मध्यवर्ती धरून हे नरसिंह मंदिर उभारण्यात आलं होतं. पाकिस्तान निर्मितीच्या वेळी मुलतानमधले सगळे हिंदू एकतर परागंदा झाले किंवा त्यांची कत्तल झाली. देवळं उद्ध्वस्त झाली. १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी ढाँचा कोसळल्यावर पाकमधले धर्मपिसाट पुन्हा नव्याने संतापले आणि त्यांची मुळात उद्ध्वस्तच असलेल्या नरसिंह मंदिराची आणखी तोडमोड केली.

शहर पुण्यात खजिन्याची विहीर किंवा स्काऊट ग्राऊंडसमोर एक नरसिंह देवस्थान आहे. अतिशय जागृत अशा या देवस्थानाची स्थापना दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे सवाई माधवराव पेशव्यांच्या अमदानीत झाली. त्या देवस्थानच्या संस्थापकांचे आजचे वंशज आणि उपासक मोहनराव जोशी हे मोठ्या हिकमतीने आणि ईश्वरी कृपेने, पाकिस्तानात मुलतानला जाऊन नरसिंह भगवानाच्या त्या प्रकटस्थळाचं दर्शन घेऊन आलेले आहेत. त्याचा वृत्तांतही त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे.

आता गंमत पाहा. विशाखापट्टणम् हे भारताच्या पूर्व किनार्‍यावरचं एक प्रसिद्ध बंदर आहे. व्यापारी जहाज वाहतुकीइतकंच ते भारतीय नौदलाचा तळ म्हणूनही महत्त्वाचं आहे. नौकानयन क्षेत्रात म्हणजे खलाशांच्या भाषेत ते ‘विझम्’ या नावाने लोकप्रिय आहे. या विशाखापट्टणम्जवळ सिंहाचलम् नावाचं गाव आहे. त्या गावात नरसिंहाचं अतिशय प्रख्यात आणि जागृत असं देवस्थान आहे. स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की, इथेच हिरण्यकश्यपू, कयाधू आणि प्रल्हाद यांचा राजवाडा होता नि इथेच नरसिंह अवतार प्रकट झाला.

आपल्याला माथेरान चांगलंच माहिती आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरचं ते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबईकर इंग्रज सत्ताधिकार्‍यांना उन्हाळ्यात सुट्टी घालवायला महाबळेश्वरपेक्षाही जवळ पडेल, असं एक गिरिस्थान हवं होतं. ठाणे जिल्ह्याचा इंग्रज कलेक्टर ह्यू मॅलेट याने सन १८५० मध्ये माथेरानला गिरिस्थान बनवलं. सन १८५४ मध्ये मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन याने माथेरानला बंगला बांधला. तेव्हापासून माथेरान भरभराटत गेलं. पण, म्हणजेच पेशवाई किंवा शिवशाहीच्या कालखंडात माथेरान अस्तित्वातच नव्हतं. माथेरानच्या पठाराच्या लगत पेब किंवा विकटगड नावाचा अगदी छोटासा किल्ला मात्र होता.


आता पुढची गंमत पाहा. एल्फिन्स्टन कॉलेज हे मुंबई इलाख्यातलं पहिलं कॉलेज. खुद्द मुंबई विद्यापीठ स्थापन झालं १८५७ साली. पण एल्फिन्स्टन कॉलेज त्याही आधीपासून म्हणजे १८३५ सालापासून विद्यादान करत आहे. अनेक विद्वान लोक या कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून कारकिर्द गाजवून गेले. मायकेल मॅकमिलन हे ब्रिटिश प्राध्यापक १८७८ साली एल्फिन्स्टनमध्ये आले. १९०७ साली ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. मॅकमिलन महाशयांना इतर अनेक विषयांबरोबरच मराठ्यांच्या इतिहासाची फार आवड होती. इंग्रजी साहित्यात ‘शिव्हलरिक रोमान्स’ असा एक कादंबरी प्रकार रूढ आहे. कुणीतरी एखादा पराक्रमी ऐतिहासिक वीरपुरुष असतो. तो नानाविध कट-कारस्थानं, गूढ, रहस्यमय किल्ले, गुप्त खजिने, भुताटकी वगैरे रोमांचक घटनांमधून पार पडत अखेर फक्कडशी सुंदरीदेखील पटकावतो. या नमुन्याच्या कादंबर्‍या म्हणजे ‘शिव्हलरिक रोमान्स’, तर या प्राचार्य मॅकमिलन यांच्या मतावर, ग्रँट डफचा तीन खंडांमधला मराठ्यांचा इतिहास वाचून, छत्रपती शिवराय आणि सरसेनापती नेताजी पालकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फारच प्रभाव पडला होता. मॅकमिलन साहेब जरा सवड मिळाली की, माथेरानला जायचे. ते उत्तम ट्रेकर होते. ट्रेकर मंडळी सहसा सरळ वाटेने नेरळहून माथेरानला जात नाहीत. मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक गावातून एक वाट माथेरानच्या ‘वन ट्री हिल’ या प्रसिद्ध कड्याखाली पोहोचते. कड्याच्या कातळात शिडीसारख्या खोबणी आहेत. त्यात हातपाय रोवत वर जाण्यात एक वेगळाच थरार आहे. १०० वर्षांपूर्वी प्राचार्य मॅकमिलनसुद्धा मुद्दाम या वाटेने जात असत. चौक हे एक सुंदर निसर्गरम्य गाव आहे. मॅकमिलन साहेबांनी नेताजी पालकर ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा धरून एक ‘शिव्हलरिक रोमान्स’ प्रकारातली कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी असं कल्पिलं की, चौक हे नेताजीचं गाव आहे. ‘वन ट्री हिल’ कड्याखाली एक गुप्त गुहा असते. तिथे एक गुप्तमहाराज राहत असतात. ते नेताजीला उपदेश करतात की, तू पुण्याला जावून शिवरायांना सामील हो. पुढे नेताजीकडून त्या संतपुरुषाची माहिती ऐकून खुद्द शिवराय त्यांच्या दर्शनासाठी त्या गुहेत येतात.

ही कादंबरी इंग्रजी वाचकांमध्ये फार लोकप्रिय झाल्यामुळे, मराठीतल्या भारत गौरव ग्रंथमालेसाठी प्रभाकर श्रीपत भसे यांनी तिचे ‘शिवाजीचा उजवा हात अर्थात् नेताजी पालकर - लेखक प्रभाकर’ या नावाने भाषांतर केलं. ही १९२३ सालची गोष्ट. ही कांदबरी आहे, इतिहास नव्हे. पण, ती मराठीतही कमालीची लोकप्रिय झाली.

या कादंबरीवर आधारित तीन चित्रपट आतापर्यंत निघाले. १९२७ साली चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘नेताजी पालकर’ हा मूकपट काढला, तो तुफान चालला. १९३९ साली चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ‘नेताजी पालकर’ हा री-मेक बनवला. मात्र, तो बोलपट होता. तोही तुफान चालला. १९७८ साली पुन्हा दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी त्याच नावाचा री-मेक बनवला. दुर्दैवाने तोरण्यांचा चित्रपट शांताराम आणि भालजी यांच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. पण, भालजींच्या ‘नेताजी पालकर’च्या अफाट यशामुळे माथेरानमध्ये एक नवीन ‘मिथ’ तयार झाली. ती म्हणजे, चौक हेच नेताजी पालकरांचं मूळ गाव होतं आणि ‘वन ट्री हिल’ कड्याखालची दगडातली शिडी चढून खुद्द शिवाजी महाराज माथेरानला आले होते, ही होय. त्यामुळे आता पर्यटन मार्गदर्शक नकाशात त्या शिडीला ‘शिवाजीज लॅडर’ - ‘शिवाजी शिडी’, असं नाव मिळालं आहे आणि चौक गावातल्या शाळेला सरनोबत नेताजी पालकरांचं नाव देण्यात आलं आहे.


मार्को पोलो हा इटालियन प्रवासी बाराव्या शतकात चीन आणि भारतात येऊन गेला. त्याच्या प्रवासवर्णनामुळे युरोपात चीनबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. मार्को पोलो इटलीमधलं प्रख्यात शहर व्हेनिसचा रहिवासी होता. पण, आता क्रोशिया या देशाचं असं म्हणणं आहे की, पोलो घराणं मुळात अ‍ॅड्रियाटिक समुद्रातल्या कोरचूला या निसर्गरम्य बेटावर राहत असे आणि ते बेट आज आमचं असल्यामुळे मार्को पोलो आमचाच!


अलेक्झांडर-द-ग्रेट हा महान योद्धा सनपूर्व तिसर्‍या शतकात ग्रीस देशात होऊन गेला. १९९१ साली ग्रीसच्या उत्तरेकडचा युगोस्लाव्हिया हा कम्युनिस्ट देश दुभंगला. त्यातून मॅकेडोनिया हा एक नवाच देश जन्मला. या मॅकेडोनियाचं म्हणणं असं की, अलेक्झांडर हा मॅकेडोनियन सम्राट फिलिप याचा मुलगा होता, असा प्राचीन ग्रंथांत उल्लेख आहे. तेव्हा तो आमचाच!

प्राचीन इराणी साहित्यात सोहराब आणि रुस्तम यांची कथा फार प्रसिद्ध आहे. ते दोघे पिता-पुत्र असतात. पण त्यांच्यात लढाई होते आणि बापाच्या हातून मुलगा ठार होतो, अशी ती फार करुण कथा आहे. आता खरं पाहता ही घटना घडली तेव्हा किंवा फिरदौसी या प्रख्यात कवीने ती लिहिली, तेव्हा इराण हा मुसलमानी देश नव्हता. म्हणजेच सोहराब आणि रुस्तम हे झरतुष्ट्री किंवा अन्य संप्रदायाचे असावेत. पण, तमाम मुसलमान त्यांना आपलेच मानतात. यालाच म्हणतात मनुष्यस्वभाव!

- मल्हार कृष्ण गोखले



@@AUTHORINFO_V1@@