‘जुशे’वरुन मोदींमध्ये कोरियाच्या माजी हुकूमशहाची झलक दिसलेल्या मोइत्राबाईंना कदाचित स्वत:च्याच पक्षाध्यक्षांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या ‘मा, माटी, मानुष’च्या हाकेचा विसर पडलेला दिसतो, अन्यथा मोदींच्या आत्मनिर्भरतेची अशी थट्टा त्यांनी मांडली नसती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंगळवारच्या संबोधनानंतर प्रथेप्रमाणे पुरोगामी, विरोधक आणि डावे त्यांच्यावर तुटून पडले. ज्यांनी इतकी वर्षे भ्रष्टाचार करुन देशाचे लाखो कोटी गिळंकृत केले, ते या २०लाख कोटींच्या पॅकेजवर निर्बुद्धपणे शंका उपस्थित करु लागले. अशाच एक मोदीविरोधकांच्या गळ्यातल्या ताईत म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या धडाडीच्या खासदार महुआ मोइत्रा... ताईत अशासाठी की, या बाई फाडफाड इंग्रजीमध्ये संसदेत आणि बाहेरही तावातावाने सरकार विरोधी गरळ ओकतात आणि पक्षाध्यक्षा ममतादीदींना खूश ठेवतात. असो. तर या अतिअभ्यासू मोइत्राबाईंनी मोदींच्या ‘आत्मनिर्भर’, ‘स्वदेशी’च्या नार्याची तुलना केली, ती थेट उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा किम जोंग इल यांच्या ‘जुशे’ या संकल्पनेशी. ‘जुशे’ हा जर्मनी, जपानी भाषेतून नंतर कोरियन भाषेत किम जोंग इल (किम जोंग उन याचे वडील) यांनी प्रचलित केलेला शब्द. त्याचा शब्दश: अर्थही होतो ‘सेल्फ रिलायन्स’ अर्थात ‘आत्मनिर्भरता’ किंवा ‘स्वयंपूर्णता.’ मोइत्राबाईंनी हा शब्द अचूक हेरला असला तरी त्यांच्या या संदर्भातील खोचकपणा ही अतिशयोक्तीच म्हणावी लागेल. केवळ या एका संकल्पनेचा टेकू धरुन उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची झलक मोइत्राबाईंना मोदींमध्ये दिसत असेल, तर त्यांनी कोरोनानंतर जरा उत्तर कोरियात चार दिवस वास्तव्य करुन यावेच. आपण केवळ तृणमूलच्या नेत्या नव्हे, तर या सार्वभौम लोकशाही देशाच्या संसदेत खासदारही आहोत, याचेही भान या मोइत्राबाईंना राहिले नाही. उत्तर कोरियाच्या भूतकाळ आणि वर्तमानाविषयीही वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्या देशातील शासनप्रणालीची आणि भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाची, त्यांच्या नेत्यांची अशी तुलनाच करणे मुळात गैर. पण, मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना कावीळ झाल्याने त्यांना अख्खे जग हे पिवळेच दिसते, त्यातलाच हा प्रकार. आपली बुद्धिमत्ता, आपला अभ्यास, अशी संशोधक वृत्ती सकारात्मक आणि देशाच्या भल्यासाठी वापरण्याऐवजी वायफळ तुलना करुन यांना नेमके काय सुचवायचे आहे? दोन परस्पर विरोधी शासनव्यवस्था असलेल्या प्रणालींमध्ये जर तफावत असू शकते, तर त्यामध्ये एखादा सामायिक धागा असल्यास, सूतावरुन स्वर्ग गाठण्याची गरजच काय? तेव्हा, जग आंधळे नाही. तुमच्या या ‘परसेप्शन वॉर’ला जनता आता भुलणारी नाही, हे ध्यानात घ्यावे.
‘स्वदेशी’ भारताच्या रक्तातच!