नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला आलेले विरोधी पक्षनेतेपद हा फार दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रिपदही त्यांच्या जीवनात अल्पकाळ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. नागपुरातील साधना सहकारी बँकेच्या नूतन वास्तूच्या लोकार्पणप्रसंगी जोशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये सरकार येत-जात असते, मात्र लोकशाहीमध्ये सरकारची खूप मोठी शक्ती असते आणि ही शक्ती लोकच निर्माण करतात. लोकशाही व्यवस्थेत काही गोष्टी कमी-अधिक होत असतात, परंतु देशाचा सामान्य नागरिक लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत राहतो. सामान्यांची हीच कृती देशाची खरी शक्ती आहे. सामान्य नागरिक जागरूक असला की लोकशाही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकासआघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा अंदाज भाजपच्या नेत्यांकडून वारंवार व्यक्त होत आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. कालच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले त्यामुळे या भेटीनंतर शिवसेनेचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला असणारा विरोधाचा सूर मावळल्याचेही दिसून आले.