किती काळ हवेत बाण सोडत राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

    24-Jun-2025
Total Views |


मुंबई : महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवनंतर तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील टक्केवारीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवाचे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तुमच्या माहितीसाठी, महाराष्ट्रात २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ८% पेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि यातील अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे."





"माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७% मतदार (२७,०६५) वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे तिथून निवडणून आले. उत्तर नागपूरमध्ये ७% (२९,३४८) मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी तिथे विजय मिळवला. तसेच पुणे जिल्ह्यात, वडगाव शेरीमध्ये, १०% (५०,९११) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी विजय मिळवला. मालाड पश्चिममध्ये, ११% (३८,६२५) मतदार वाढले आणि काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख यांनी विजय मिळवला. मुंब्र्यामध्ये ९% (४६,०४१) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले," अशी आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले की, "मित्रपक्षांना नाही पण किमान या ट्विटपूर्वी अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारख्या त्यांच्याच पक्षाच्या जुन्या मित्रांशी ते एकदा बोलले असते तर बरे झाले असते. किमान काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन झाले नसते," असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला.