सावरकरांची परराष्ट्र नीती आणि पंतप्रधान मोदी

    27-May-2019
Total Views | 362



 

सावरकरांनी परराष्ट्र नीती’ या विषयावर आपले विचार मांडले होते. जागतिक स्तरावर भारताने इतर देशांशी राखावयाचे संबंध यावर सावरकरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि मोदींनी आखलेली परराष्ट्रनीती ही सावरकरांनी सांगितलेल्या मार्गाशी मिळतीजुळती असल्याचं दिसून येतं.

 

आठ दिवसांपूर्वी हा लेख लिहायला घेतला ती वेळ आणि लेख संपत आलाय, त्यावेळच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी यांत एक मोठा फरक घडला आहे. फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधल्या पुलवामा या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेने ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केलं आहे. गेले काही महिने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून सातत्याने या प्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्या चीनला आपला अट्टाहास सोडून मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादां’च्या यादीत समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांत खोडा घालण्याचा इरादा सोडून द्यावा लागला. पंतप्रधान नरेंद मोदींच्या परराष्ट्र नीतीचा हा मोठा विजय आहे आणि त्याचबरोबर बदललेल्या परराष्ट्र नीतीचं हे मोठं यश आहे.

 

सावरकरांनी परराष्ट्र नीती’ या विषयावर आपले विचार मांडले होते. जागतिक स्तरावर भारताने इतर देशांशी राखावयाचे संबंध यावर सावरकरांनी मार्गदर्शन केलं होतं. मोदींनी आखलेली परराष्ट्रनीती ही सावरकरांनी सांगितलेल्या मार्गाशी मिळतीजुळती असल्याचं दिसून येतं. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जर्मनीचं नाझीझम, इटलीचं फॅसिझम, इंग्लंडची लोकशाही, रशियाचं बोल्शेविझम इत्यादी हे जागतिक स्तरावर चर्चिले जाणारे विषय होते. विशेषतः ‘नाझीझम’ आणि ‘फॅसिझम’ यांची जागतिक स्तरावर हेटाळणी केली गेली असली तरी त्या त्या राष्ट्रांच्या प्रगतीसाठी पूरक ठरली होती. या तत्त्वांचा आणि देशांचा पंडित नेहरूंनी व काँग्रेसने निषेध केला होता. मात्र, ही सर्व मतप्रणाली हा त्या त्या देशांचा अंतर्गत विषय असल्याचं सावरकरांनी नमूद केलं होतं. एकीकडे लोकशाहीचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे भारतासारख्या देशांवर राज्य करायचं, हा ब्रिटिशांचा दुटप्पीपणा त्यांनी लोकांसमोर उघड केला होता. ज्या ‘इझम्स’च्या आधारावर त्या देशांचा विकास झाला आहे, ती ‘इझम्स’ बाळगायचं त्यांना स्वातंत्र्य असून भारताचा त्या देशांशी असलेल्या हितसंबंधात त्याची बाधा वा अडसर येऊ नये, असं स्पष्ट मत सावरकरांचं होतं. त्याचबरोबर जो शत्रूचा शत्रू आहे, तो आपला मित्र आहे आणि त्याचा फायदा आपल्या देशाच्या भल्यासाठी करून घेणं, हे स्वीकार्य आहे, असंही त्यांचं ठाम म्हणणं होतं.

 

मागील पाच वर्षांत मोदींची परराष्ट्रनीती आणि जगभरातल्या देशांशी त्यांनी प्रस्थापित केलेले संबंध लक्षात घेतले तर ‘राष्ट्राचे हितसंबंध’ या बाबीला त्यांनी विशेष महत्त्व दिलेलं आढळून येतं. गेल्या काही वर्षांत जग बदललं आहे. परराष्ट्र नीतीचा लोलक अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये फिरत न राहता आता चीन याही सत्तेचा उगम झाला आहे. बदलत्या जगात आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल आणि हितसंबंध सांभाळायचे असतील तर जुन्या धारणा सोडून नवीन परराष्ट्र धोरण मांडणं फार गरजेचं आहे, याची जाणीव मोदींना आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळालेलं यश हा मोदींनी बदललेल्या धोरणाचा परिपाक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी यांच्या नीतीमध्ये काही फरक प्रामुख्याने जाणवतात. मोदींच्या परराष्ट्र नीतीमध्ये साहजिक असं काही नसून विचारपूर्वक उचललेली पावलं आहेत.

 

समविचारी देशांशी आणि महासत्तांशी मजबूत संबंध प्रस्थापित करणे, जगभरात भारताच्या पाऊलखुणा दूरवर पोहोचवणे, प्रसंगी धोका पत्करून व्यवहार्य निर्णय घेणे, अनाकलनीयता कायम राखन निर्णयांचा अंदाज लागू न देणे, सैन्यशक्तीचा योग्य वापर करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवणे, अंतर्गत सुरक्षा हा परराष्ट्र धोरणाचा एक हिस्सा बनवणे, व्यापार आणि गुंतवणूक यांना मध्यवर्ती स्थान असणे, योग, आयुर्वेद याकरवी प्राचीन भारतीय विज्ञान आणि संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करून त्यासोबत अनिवासी भारतीयांचा सुयोग्य वापर करून घेणे, या मोदींच्या परराष्ट्र नीतीमधल्या ठळक बाबी आहेत. भारतीयांनी भारताबाहेर जाऊन बृहन्भारत वसवावा, अशी संकल्पना सावरकरांनी मांडली होती. अमेरिकेत राहणारे ज्यू ज्याप्रमाणे इस्रायलच्या हितासाठी झटत असतात, त्याचप्रमाणे भारताबाहेर राहणारे भारतीय हे पुढे जाऊन भारतासाठी उपयोगी पडू शकतील, ही दूरदृष्टी त्यामागे होती. नागरिकत्वाने भारतीय नसले तरी संस्कृतीने आणि मनाने भारतीय असलेल्यांच्या भावनांना हात घालायचं काम मोदींनी त्यांच्या अमेरिका, युरोप आणि दुबई आदी दौऱ्यांमध्ये आवर्जून केलं.

 

सावरकर म्हणाले होते, त्याप्रमाणे मोदींनी कोणत्याही देशांना अस्पृश्य न मानता कोणत्याही प्रकारच्या ‘इझम्स’ना आपल्या नीतीच्या आड येऊ दिलं नाही. एकमेकांशी टोकाच्या भूमिका असलेल्या राष्ट्रांशीही दृढ संबंध प्रस्थापित करून त्याचा फायदा आपल्या देशासाठी होईल, हा विचार इकडे अग्रणी दिसून येतो. इस्रायल-पॅलेस्टाईन, अमेरिका- इराण- सौदी अरेबिया, जपान-चीन, अमेरिका-रशिया या भिन्न भूमिका असणाऱ्या देशांशी तोलामोलाचे संबंध ठेवण्याची कसरत त्यांनी साध्य केलीय. पंतप्रधान मोदी, एकीकडे भारताचे रशियाशी असलेले संबंध मजबूत करत दुसरीकडे पाकिस्तानचा भूतकाळातला पाठीराखा असलेल्या अमेरिकेशीही जवळचं नातं जोडतात, पाकिस्तान हा दहशतवादाची पाठराखण करणारा देश आहे, हे पटवून देतात आणि नंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी अब्जावधींची रोकड आटते. फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ करून जागतिक बाजारपेठेतून सहजासहजी आर्थिक मदत मिळण्याचे दरवाजे बंद करते; भारत अमेरिका 2+2 परिषदेत, अमेरिका पाकिस्तानचा ‘Terrorist Proxy’ असा उल्लेख करते; बालाकोट हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानातून केवळ 48 तासांत मायदेशी येतो आणि भारतासाठी जिनिव्हा करार प्रत्यक्ष अमलात आणला जातो; ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ या इस्लामबहुल देशांच्या संघटनेचा संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या भारतविरोधी तक्रारीकडे दुर्लक्ष करून, पन्नासाव्या अधिवेशनात भारताला निमंत्रण दिले जाते, त्यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे इस्लामी अधिवेशनातील भाषण आणि सभेतील पाकिस्तानची अनुपस्थिती मोदींच्या सुयोग्य मुत्सद्दी परराष्ट्रनीतीची पोचपावती ठरते. अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही नेत्यांशी मोदी समान संबंध प्रस्थापित करत अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा परतल्यावर अफगाणिस्तानच्या विकासाची व स्थैर्याची जबाबदारी भारत समर्थपणे पेलू शकतो, हे मांडून पाकिस्तानला अफगाणिस्तान या विषयातूनही बाजूला सारतात.

 

देशहितासाठी नक्की काय करायला हवं आहे, हा स्पष्ट आचार आणि विचार मोदींकडे आहे. त्याचमुळे ज्यावेळी तब्बल 70 वर्षांच्या दीर्घ कालखंडात पॅलेस्टाईनला न जाता इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होतात, त्याचवेळी इस्रायलला न जाता पॅलेस्टाईनचा दौरा करणारेही मोदीच असतात. इस्रायलशी शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत ज्यावेळी करार होत असतात, त्याचवेळी पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना दिला जातो आणि इस्रायलशी असलेल्या वादात मध्यस्थीसाठी पॅलेस्टाईनला मोदींमध्ये आशेचा किरण दिसतो. अफगाणिस्तान आणि इराणशी व्यापारवृद्धी करताना इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करत भारताने चीनला शह दिला. त्याचबरोबर इराणशी संबंध दृढ केले. त्याचवेळी अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकले असता भारताचा तेलपुरवठ्याचा मार्ग मोकळा राहील, याचीही परवानगी अमेरिकेकडून घेऊन ठेवली. इराण आणि सौदी अरेबिया यांचं एकमेकांशी वितुष्ट आहे. तरीही इराण-सौदी संबंधांचा भारत-सौदी संबंधांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता मोदींनी घेतली. मोदींच्या कार्यकाळात सौदी अरेबियाशी भारताचे व्यापारी, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध नवीन उंचीवर पोहोचले.

 

चीन संबंधित धोरणात आक्रमकता आणताना मोदींनी जपान-अमेरिका-भारत (JUI) या नवीन भागीदारीची घोषणा केली. ‘लुक इस्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट इस्ट’ च्या अंतर्गत जपान, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम इत्यादी चीन प्रभावित देशांशी सहकार्य वाढवले, चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला. मात्र, हे करत असतानाच भारत ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ या चीनप्रणित संघटनेचा कायमस्वरूपी सदस्यदेखील झाला. अनपेक्षितता आणि गूढता या बाबतीत भारत चीनला पुरून उरला आहे.

 

‘आय सी 814’ हा भारताच्या इतिहासातला एक वाईट अध्याय आहे. तालिबानने हायजॅक केलेलं भारतीय विमान सौदी अरेबियाने त्यांच्या विमानतळावर उतरू दिलं होतं. त्याच सौदी अरेबियाने मागच्या काही महिन्यात मायकल, राजीव सक्सेना आणि दीपक तलवार या आरोपींना भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हवाली केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सौदीने पंतप्रधान मोदींचा सन्मानदेखील केला. डोकलामच्या सत्तरहून अधिक दिवसांच्या ताणतणावानंतर चीनला आपली भूमिका बदलून माघार घ्यावी लागली आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मौलाना मसूद अझहर याच्या बाबतीतही चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही नकाराधिकार मागे घ्यावा लागला. मोदींच्या परराष्ट्र नीतीचा हा यशस्वी प्रवास आहे.

 

‘आत्मा’ या कल्पनेवर सावरकरांचा विश्वास होता की नाही, याची कल्पना नाही. पण, भारतीय संकल्पनेनुसार सावरकर आज जिथे असतील तिथून समर्थ भारताला पाहून समाधानी होऊन येणाऱ्या उत्तुंग भारतासाठी मोदींच्या दमदार नेतृत्वाला नक्कीच आशीर्वाद देत असतील, यात शंका नाही.

 
- सारंग लेले 
 

संदर्भ- Veer Savarkara's Whirlwind Propoganda, Edited Published by -.S. Bhide, 1941 पूर्व परराष्ट्र सचिव डॉ. जयशंकर यांचं डॉ. हर्ष पंत यांच्या ‘India's Foreign Policy: The Modi Eraया पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केलेलं भाषण. परराष्ट्र नीती आणि पंतप्रधान मोदी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121