सीमेपलीकडील हरवलेली श्रद्धास्थाने

    04-Jun-2025   
Total Views | 13

temple has existed for hundreds of years in Pakistan  
 
भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि उत्तर पश्चिम प्रांतांमध्ये हिंदू लोकसंख्या लक्षणीय होती. त्याठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे होती. फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात हिंदू भारतात स्थलांतरित झाले. परिणामी, अनेक मंदिरे वापराविनाच राहिली. काहींना नुकसान पोहोचले आणि काहींवर अवैध कब्जे झाले. पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी न्यायालयीन आदेश असूनही, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांने दुर्लक्ष केल्यामुळे, अनेक मंदिरांवरचे अवैध कब्जे आजही कायम आहेत. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ते पाकिस्तानातल्या शेकडो वर्षे जुन्या शिवमंदिराचे. काही बांधकाम व्यावसायिकांनी हिंदू मंदिराच्या जमिनीवर सर्व बाजूंनी अतिक्रमण केले. यामुळे मंदिराकडे जाणारा मार्गच बंद झाला. याच्या निषेधार्थ कराची शहरापासून सुमारे 185 किमी अंतरावर असलेल्या मुसा खतियान जिल्ह्यातील तांडो जाम शहरात शेकडो लोक जमले होते.
 
पाकिस्तानच्या हैदराबाद शहरात हे शिवमंदिर आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी या मंदिराच्या अंगणात आणि आजूबाजूच्या जमिनीवर अतिक्रमण करत, तिथे बांधकामही सुरू केले. या विरोधात हिंदूंनी पाकिस्तान दलित ‘इत्तेहाद-पाकिस्तान द्रविडीयन अलायन्स (पीडीआय)’च्या बॅनरखाली निषेध केला. शहरातील विविध भागांत हिंदूंनी तीव्र निदर्शने केली आणि निषेध व्यक्त केल्यानंतर, त्यांनी तांडो जाम प्रेस क्लबसमोरही निदर्शने केली. असे म्हटले जाते की, या ऐतिहासिक मंदिराचे नूतनीकरण गेल्या वर्षीच झाले होते. भगवान शिवाचे मंदिर असल्याने दर सोमवारी येथे भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. यावेळी पाकिस्तानातील हिंदू समाज मोठ्या संख्येने तेथे उपस्थित असतो. इतकेच नव्हे तर, हिंदूंचे अंतिम संस्कारदेखील मंदिराच्या परिसरातच केले जातात.
 
इथल्या आंदोलनकर्त्या हिंदूंचे असे म्हणणे आहे की, आरोपी बिल्डरचे राजकीय संबंध आहेत. यामुळे स्थानिक पोलीसही त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास धजावत नाहीत. परिणामी आंदोलकांनी निषेधाच्या माध्यमातून शाहबाज शरीफ सरकारकडे, आरोपी बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खरेतर पाकिस्तानात मंदिरांवर अवैध कब्जा करण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही खैबर जिल्ह्यात असाच प्रकार घडला होता. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील लांडी कोटल बाजारात असलेल्या ऐतिहासिक खैबर मंदिराचे बांधकाम 1947 सालानंतर बंद झाले होते. गेल्या काही वर्षांत मंदिरच हळूहळू नष्ट होत गेले आणि आता त्या जागी व्यावसायिक इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. काही मंदिरे अशी आहेत, ज्याठिकाणी असलेला अवैध कब्जा न्यायालयीन आदेशानंतर सोडण्यात आला. लाहोरच्या अनारकली बाजाराजवळील बाराशे वर्षे जुने वाल्मिकी मंदिरावर एका ख्रिश्चन कुटुंबाने 20 वर्षांपूर्वी अवैधपणे कब्जा केला होता. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘एव्हाक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डा’ने या कुटुंबाला मंदिरातून हुसकावून, मंदिराचे पुनर्निर्माण सुरू केले होते. त्याचप्रमाणे कराचीतील पंचमुखी हनुमान मंदिराच्या 25 हजार चौरस फूट जमिनीवरही जिहादी गटांनी कब्जा केला होता. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पाकिस्तान सरकार आणि सैन्याने याला विरोध करत, मंदिराची मालमत्ता हिंदू समुदायाला परत केली.
 
आपण पाहिले तर, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानातील कटासराज आणि बलुचिस्तानातील हिंगलाज माता मंदिर ही ऐतिहासिक मंदिरे चर्चेत आली. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान चांगलाच हादरला. बलुचिस्तानी लोकही पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध उभे राहिले. त्यांनी बलुचिस्तान स्वातंत्र्याची केली. याला भविष्यात मान्यता मिळाली तर इथले हिंगलाज माता मंदिर हिंदूंसाठी खुले होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या कटासराज मंदिरातही सहजासहजी जाणे शक्य होण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान किंवा जगातील कुठलेही मंदिर असो, हिंदूंची भावना त्या मंदिरांशी निश्चितच जोडलेली आहे. बांगलादेशात मंदिरांवर झालेले हल्लेदेखील हिंदू कधीच विसरू शकणार नाही. पाकिस्तानातील हिंदूंच्या मागणीला न्याय मिळेल, अशी आशा आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121