...तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा सवाल
16-Jun-2025
Total Views | 11
मुंबई : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कुंडमळा येथील पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, "काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जण वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे.' पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही? प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?" असेही ते म्हणाले. लोकांनी उत्साहाला आवर घालावा!
"लोकांनीदेखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडे भान ठेवायला हवे. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असे नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवे. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणे, रस्त्यांची चाळण होणे, पूल पाडणे अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावे," असेही राज ठाकरे म्हणाले.