एकाच वेळेस अनेक भूमिका पार पाडणारे, विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणारे अशा बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या शिरीष कोरगांवकर यांच्याविषयी...
काही व्यक्तींच्या आयुष्यात ‘रंगुनी रंगात सार्या, रंग माझा वेगळा’ ही केवळ कवितेची ओळ नसते, तर ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख होते. एकाच वेळेस अनेक भूमिका पार पाडणारे, विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणारे असे बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे शिरीष कोरगांवकर. कधी व्यासपीठावर आपले विचार प्रगल्भपणे मांडणारा वक्ता, तर कधी नेतृत्वगुणांनी झळाळणारा कार्यकर्ता, तर कधी कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारा कलाकार अशा विविध भूमिकेतून शिरीष कोरगांवकर समाजाच्या समोर सादर झाले. पण, या सार्यांच्या पलीकडे जेव्हा त्यांनी आपल्या अंतरंगाशी संवाद साधला, तेव्हा त्याच्या हृदयाने कीर्तनाचा मार्गच दाखवला. शिरीष यांच्यासाठी कीर्तन ही केवळ एक कला नाही, तर ती साधना आहे. तीच खरी आत्मानंदाची वाट आहे. शिरीष यांच्या जीवनाचा आढावा घेताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, त्यांचे जीवन म्हणजे एक सुंदर संगम आहे. या संगमाचे वैशिष्ट्य म्हणजे बाह्य यशाचे तेज आणि अंतर्मनाच्या शांततेचे सौंदर्य! अशा व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना, मनात एकच विचार उमटतो की, माणसे एकाचवेळी यशस्वी आणि यशाच्या पलीकडचेही आयुष्य कसे जगत असतील? पण, या जगण्यातच त्यांच्या शाश्वत आनंदाचे बीज असल्याचे जाणवते.
शिरीष यांचा जन्म मुंबईतील सँडहर्स्ट रोड इथला. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातच शिरीष यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच शिरीष यांना स्वावलंबनाची आवड होतीच. वडील कामानिमित्ताने सातार्यात राहायला होते. शिरीष यांचे बालपणी रेशनसाठी पहाटेपासून रांगा लागत असत. शिरीष यांनीही अनेकदा रेशनच्या रांगेत वाट पाहिल्याचे ते सांगतात. शालेय परीक्षा काळात अनेकदा अभ्यासदेखील त्याच रांगेत होत असे. शिरीष यांची ही आठवण ऐकल्यानंतर साहजिकच त्यावेळच्या मुंबईचे चित्र नजरेसमोरून जाते. शिरीष यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. उत्तम शिक्षकांमुळेच शिरीष यांच्या अनेक विषयांचा पाया त्यावेळीच मजबूत झाला. आठवी ते दहावीमध्ये तर शिरीष सातत्याने संपूर्ण शाळेत पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झाले. याचकाळात शाळेतील वक्तृत्व, वादन अशा अनेक कलांमध्येही शिरीष यांना पुरस्कार मिळाले. कोणत्याही नवीन गोष्टीचे ज्ञान घेणे हा शिरीष यांचा स्थायीभाव झाला होता.
दहावी नंतर शिरीष यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला. मात्र, यशाची परंपरा कायम राखण्यात बारावीमध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अॅप्रेंटिसशिपही केली. त्यामुळे शिरीष यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान तर मिळाले मात्र, त्याच कंपनीने उत्तम कामगिरी असूनही कायम करण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात शिरीष यांनी पुन्हा एकदा बारावीची परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी ते उत्तीर्णही झाले. पुढे त्यांनी पोदार महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
शिरीष यांच्या बालपणातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण शिक्षण स्वतः कमावून पूर्ण केले. दहावीपासूनच शिरीष गणित आणि इंग्रजी विषयाचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यांनी शिकवलेले अनेक विद्यार्थी आज राष्ट्रसेवेमध्ये भरीव योगदान देत असून, याचे समाधान असल्याचेही शिरीष नमूद करतात. शिरीष यांनी मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षणदेखील घेतले. त्यामुळे मराठी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व निर्माण झाले. दरम्यान शिरीष यांनी रेल्वेच्या परीक्षा दिल्या होत्या. सुरुवातीच्या अपयशानंतर शिरीष यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. अल्पावधीतच अंतर्गत परीक्षा देत शिरीष ट्रेन मॅनेजरपदापर्यंत पोहोचले.
शिरीष यांच्या घरामध्ये कलावती आईंची उपासना होत असे. त्याचाच प्रभाव शिरीष यांच्यावर होता. दरम्यानच्या काळात शिरीष यांची ओळख दादरमधील ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’शी झाली. अध्यात्माची असलेली उपजत आवड आणि कलासक्त मन, यामुळे साहजिकच शिरीष यांनी तत्काळ कीर्तनवर्गाला प्रवेश घेतला. या संस्थेत तीन वर्षे कीर्तनाची बाराखडी गिरवत ‘कीर्तनालंकार’ पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी ‘कीर्तन मधुकर’ या पदवीचा अभ्यासही शिरीष यांनी पूर्ण केला आहे. आज शिरीष एक नामांकित कीर्तनकार असून, जवळपास 200च्या आसपास त्यांची कीर्तने झाली आहेत. शिरीष यांना शिकण्याची हौस असल्याने कीर्तनाला आवश्यक असलेल्या तबला, झांज वाजवणे, संस्कृत भाषा अशा विविध कलाही त्यांनी आत्मसात केल्या आहेत. आज महाराष्ट्रभर शिरीष यांनी कीर्तनासाठी निमंत्रण असते. इतकेच नव्हे, तर शिरीष दुसर्यांच्या कीर्तनामध्ये सेवा करण्यास उत्सुक असतात. शिरीष यांच्यातील नम्रतेमुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
आज शिरीष यांनी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य केले आहे. या सगळ्या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांची साथ त्यांना लाभली आहे. त्यांच्या सुविद्य पत्नीही उत्तम कीर्तनकार आहेत. आयुष्यात एक आदर्श मुलगा, नवरा आणि वडील म्हणून कार्य करू शकल्याचे शिरीष समाधान व्यक्त करतात. वयाच्या साठीकडे झुकताना मनात असलेली शांतता ही भगवंताचे देणे असल्याचे शिरीष यांचे मत आहे. कीर्तनातून आत्मानंद मिळतो, त्याची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही. म्हणूनच शिरीष कीर्तनाची बिदागीही सांगत नाहीत, हे त्यांचे वेगळेपण. भगवंताने दिलेल्या या आयुष्याचा पुढील भाग हा कीर्तनसेवा करण्याचा संकल्प शिरीष यांचा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
कौस्तुभ वीरकर