सप्तशृंगगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सप्तशृंग गडावरील सर्वच धबधबे खळखळून वाहायला लागले आहे. कडांवरून कोसळणारे धबधबे पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे.
घाट मार्गावर असलेल्या या धबधब्याची केवळ एक साधी दोरी आणि कमकुवत काठीच्या साहाय्याने सुरक्षेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भाविक आणि पर्यटक थेट धबधब्याजवळ जाऊन छायाचित्र घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी आणि येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र, येथे रस्त्याच्या दुरुस्ती व संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याने वाहनांसाठी अनेकदा अडथळे निर्माण होतात. त्यातच अवकाळी पावसामुळे घाट रस्त्यांवरील अनेक धबधबे वाहते झाले आहेत. मात्र, या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच, त्याबाबतचे कोणतेही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही.गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत असून घाट मार्गावर पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहेे. त्यामुळे भाविक व पर्यटकांची सुरक्षा करण्यासाठी बांधकाम विभागाने त्वरित या ठिकाणी मजबूत सुरक्षा व्यवस्था, सतर्कता उपाय तैनात करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पावसाळ्याच्या दिवसात ही गर्दी दुपटीने होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे भाविकांची सुरक्षा वार्यावर असल्याचे दिसून येत आहे.
भाविकांची वाढली गर्दी
सप्तशृंग गडावर पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुलल्याचे दिसून येत आहे. ढगांनी वेढलेल्या डोंगररांगा आणि गडाला दाट धुक्यांची शाल आणि गारव्यामुळे भाविकांची गर्दी वाढल्याचे सांगितले जात आहे. तसेच, घाट रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असून, पर्यटक विविध ठिकाणी फोटो घेत येथील निसर्गाचा आनंद घेत आहेत. अशा वातावरणात गडावर येणार्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षेची येथे योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.