म्हाळगी प्रबोधिनीत कार्यकर्त्यांसाठी ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’

    15-May-2025
Total Views | 5

 
Leadership Development Study Class at Mhalgi Prabodhini
 
 
मुंबई: (Leadership Development Study Class at Mhalgi Prabodhini) देशाच्या सर्वंकष विकासासाठी महानगरांसोबतच छोटी शहरे व ग्रामीण भागाचाही विकास आवश्यक असतो. त्यात तरुण व महिलांची शाश्वत प्रगती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्षमता विकास व प्रशिक्षण ही उद्दिष्टे समोर ठेवून गेले दोन दिवस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने संभाजीनगरच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळचे विश्वस्थ, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ आयोजित केला होता.
 
प्रबोधिनीच्या उत्तन येथील निसर्गरम्य ज्ञान नैपुण्य केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत सदर संस्थेच्या संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, नंदुरबार, इत्यादी जिल्ह्यांत कार्य करणाऱ्या ४८ पुरुष व महिला प्रतिनिधींनी भाग घेतला. व्यवस्थापनाच्या विविध मुद्द्यांवर त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
 
संघ बांधणीपासून कल्पकता व समाजभानापर्यंत विषयांवर प्रशिक्षण
 
नेतृत्व साधनेपासून सुरुवात करीत श्री. दीपक करंजीकर यांनी वेळेच्या नियोजनाचे महत्त्व सांगितले. संघ बांधणी व सांघिक कार्य या मुद्द्यावर बोलल्यानंतर श्री. योगेश वाळुंजकर यांनी संवाद कौशल्यांवर मार्गदर्शन केले. तद्नंतर प्रबोधिनीच्या ग्रंथालयाला भेट देऊन उपस्थितांना वाचनाचे महत्त्व समजाविण्यात आले. वाचनातून समाजभान जागृत करण्याबद्दल श्री. रत्नाकर पाटील, मानद विशेष कार्यकारी अधिकारी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, यांनी संवाद साधला.
 
दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रसन्न वेळी श्री. हरीओम शर्मा यांनी विचारकणिका हे सत्र घेतले. श्री. अरुण करमरकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्यांबद्दल माहिती दिली. पुढे श्री. अंशुमन लाठ यांनी सामाजिक कार्यातील नावीन्य, कल्पकता व व्यावसायिकतेची गरज अधोरेखित केली. सरतेशेवटी डॉ. चेतन नेरकर यांनी ताणतणाव व्यवस्थापन या आजच्या गंभीर विषयावर मोलाची माहिती दिली. डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी समारोपाचे भाषण केले.
 
प्रत्यक्ष वास्तव, घडणारे बदल जाणून घेताना निपुणतादेखील हवी
 
सामाजिक क्षेत्रात काम करताना कशाचे भान ठेवायचे, ते समजावून सांगताना श्री. लाठ म्हणाले, “भुकेल्या माणसाला मासे देण्यापेक्षा मासेमारी करायला शिकविणे महत्त्वाचे. निमशहरी व ग्रामीण भागांत सेवा कार्य करताना लोकांची नेमकी समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे की काम करण्याची इच्छा असलेल्याला रोजगार मिळू शकतो. परंतु युवकांमध्ये व्यसनाधीनता, ग्रामीण तरुणांचे लग्न न होणे व कुटुंबसंस्थेवरील आघात या समस्या आहेत. बदलणाऱ्या काळाशी आपणही जुळवून घेतले पाहिजे. सामाजिक कामातही तत्परता, समन्वय व निपुणता आवश्यक आहे.”
 
प्रसन्न पाटील, सचिव, फुले महिला एकात्म समाज मंडळ, म्हणाले, “आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी तज्ञांकडून नेतृत्वासंबंधीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा होती. म्हाळगी प्रबोधिनीतील रम्य वातावरणात हे दोन दिवस उत्तमरित्या शक्य झाले व सर्वांना प्रेरणा मिळाली.” कार्यशाळेबद्दल बोलताना संस्थेतील एक प्रकल्प समन्वयक म्हणाले, “रोजच्या जीवनातील बाबींकडे डोळसपणे बघत संसाधनांचा इष्टतम वापर करण्याची शिकवण कार्याशाळेने आम्हाला दिली. अशाप्रकारे नेतृत्वविकास केल्याने राष्ट्रशक्ती निश्चितच जागृत होईल.”
 
फुले महिला एकात्म समाज मंडळात गेली ९ वर्षे कार्यरत असलेले संभाजीनगरचे श्री. अविनाश कांबेकर, आपले मत व्यक्त करताना म्हणाले, “मी वेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून सामाजिक क्षेत्रात आलो. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त व खानदेशातील वनवासी भागातून फिरल्यावर मदतीची किती गरज आहे लक्षात आले. कार्यकर्त्यांसाठीच्या या वर्गात वैश्विक दर्जाचे प्रशिक्षण मिळून उद्दिष्ट साध्य करण्यात निश्चितच हातभार लागणार आहे.”
 
- जनसंपर्क विभाग, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121