नवी दिल्ली : देशात कोरोना महामारी रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली असून ३ जून २०२५ रोजी, देशात ४,०२६ सक्रीय रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या २४ तासांत पाच नवे मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये ८० वर्षांच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनिया झाला होता. महाराष्ट्रात ७० आणि ७३ वर्षांच्या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये एकूण १ हजार ४१६ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ५०६, आणि पश्चिम बंगालमध्ये ३७१ रुग्ण आहेत. कर्नाटकमध्ये ५८ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये ९० रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात १२, आणि केरळमध्ये १९ रुग्ण बरे झाले आहेत. पुडुचेरी आणि उत्तर प्रदेशमध्येही काही रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन कोविड-१९ व्हेरिएंटची लक्षणे आणि त्यापासून संरक्षण कसे करावे?
नवीन कोविड-१९ व्हेरिएंट (NB.1.8.1 आणि LF.7) हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. या व्हेरिएंटचे लक्षणे सौम्य असू शकतात. या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी आणि यांचा समावेश आहे. काही रुग्णांना भूक कमी लागते, चव आणि वास जाणवणे बंद होते. वृद्ध व्यक्तींमध्ये आणि आधीपासून आजारी असल्यास ही लक्षणे गंभीर रूप घेऊ शकतात.
या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. शारीरिक अंतर पाळा. ताप, खोकला, घशात खवखव किंवा इतर लक्षणे जाणवली, तर त्वरित चाचणी करा. लसीकरण पूर्ण करून घ्या आणि बूस्टर डोसही घ्या. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा. ही काळजी घ्या आणि स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.