म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रियेला प्रारंभ
- ८ जुलै रोजी ई –लिलावाचा एकत्रित निकाल
03-Jun-2025
Total Views | 7
मुंबई: म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील ५३ अनिवासी भूखंडांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे मुख्य अभियंता श्री. धीरजकुमार पंदीरकर तसेच मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दि. ०७ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि. ०८ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मंडळातील अनिवासी भूखंडांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी www.eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी दि. ०२ जून, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. ०१ जुलै, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ई-लिलावाकरिता आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा दि. ०२ जुलै, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक भूखंडाचे विवरण, भूखंडाचे आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती www.eauction.mhada.gov.in व mhada.gov.in य संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. अर्जदारास छपाई बाबतच्या कोणत्याही चुकीचा फायदा घेता येणार नाही, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.