कृत्रिम बुद्धिमत्तेचे विस्तारणारे क्षितिज, माणसाची जवळपास सर्व क्षेत्रे आपल्या कवेत घेत आहे. या परिवर्तनाच्या वेगासोबत, ज्यांना आपला वेग साधता येणार नाही ते काळाच्या मागे राहतील, हे आता स्पष्ट होत आहे. कालपर्यंत चित्रनिर्मिती आणि कलाकार यांच्या कार्यक्षेत्राबद्दल जिथे वाद होत होता, तिथे आज युद्धाच्या भूमीवर ‘एआय’चा होणारा वापर आपल्याला बघायला मिळतो आहे. ‘एआय’च्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचे आपल्या समाजमनावर होणारे परिणाम याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे, हेच यातून स्पष्ट होते.
ब्रिटनमध्ये 400 पेक्षा अधिक कलाकारांनी पंतप्रधान किअर स्टार्मर यांना पत्र लिहून, देशाच्या ‘कॉपीराईट’ कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. कलाकारांनी निर्माण केलेली कलाकृती बौद्धिक संपत्तीच्या कक्षेत येते. त्यावर त्या कलाकारांचा मालकी हक्क असतो. ‘एआय’च्या आगमनामुळे याच हक्कावर टाच आल्याचे दिसून येत आहे. सरसकटपणे कुठल्याही कलाकाराची परवानगी न घेता, त्यांच्या कलाकृतीचा वापर करण्याचे प्रमाण वाढते आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गायकाच्या गाण्यात त्याच्या परवानगीशिवाय बदल केला जातो किंवा त्याच्या आवाजाचा वापर करून, दुसरीच रचना तयार केली जाते.
दुआ लिपा, सर एल्टन जॉन, सर इयान मॅकेलन, लेखक काझुओ ईशिगुरो अशा नामवंत कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. ‘कॉपीराईट’ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कलाकारांनी काही बदल सुचवले आहेत. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, ‘एआय’ कंपन्यांनी त्यांच्या मॉडेलसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची माहिती पारदर्शकपणे कलाकारांना द्यावी, त्याचबरोबर कलाकारांसोबत परवाना करारही सक्तीचा असावा. असे न केल्यास ‘क्रिएटिव्ह पॉवरहाऊस’ म्हणून इंग्लंडची असलेली ओळख धोक्यात येईल, असे मत काही कलाकारांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ लेखक काझुओ इशिगुरो म्हणतात की, “बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी आपल्या पारंपरिक ‘कॉपीराईट’ कायद्यामध्ये बदल करणे आणि त्यांना एका बाजूला सूट देत, कलाकारांवर अन्याय करणे चुकीचे आहे.”
परंतु, कलाकारांच्या म्हणण्याशी सगळेच सहमत आहेत, असे नाही. दुसर्या बाजूला ‘सेंटर फॉर ब्रिटिश प्रोग्रेस’ या ‘थिंक टँक’च्या सहसंस्थापक जूलिया विलेमिन्स यांच्या मते ‘कॉपीराईट’ कायद्यान्वये नियम जर सक्तीचे करण्यात आले, तर याच्या संशोधनामध्ये अडथळा निर्माण होईल. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यावरील संशोधन परदेशात स्थलांतरित होण्याचीही भीती आहे. संशोधन हा कुठल्याही क्षेत्राचा पाया आहे, त्याला जर तडा गेला तर आर्थिकदृष्ट्या हे इंग्लंडच्या भविष्यासाठी धोकादायक असेल. इंग्लंड सरकारच्या प्रवक्त्यांनी यामध्ये आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, “ज्याप्रकारे आपल्याकडे कलेचे क्षेत्र बहरते आहे, त्याच प्रकारे आपल्या ‘एआय’ कंपन्यांनीसुद्धा यशस्वी व्हावे हा आमचा हेतू आहे. यामुळे दोन्ही क्षेत्रांसाठी योग्य त्या उपाययोजना करतच आम्ही पुढे जाणार आहोत.
जर कुठल्याही प्रकारे ‘कॉपीराईट’ कायद्यामध्ये बदल करण्यात आला, तर तो कलाकारांच्या हिताचा असेल याची आम्ही ग्वाही देतो.” हाऊस ऑफ लॉर्डच्या सदस्य बॅरोनेस किड्रॉन यांच्या मते कलावंतांना न्याय देणारी, तसेच ‘एआय’ कंपन्यांच्या फायद्याची असणारी एखादी पारदर्शक व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. कलावंतांच्या हितास बाधा पोहोचेल, अशा कुठल्याही प्रकारचे पाऊल इंग्लंडचे सरकार सध्या उचलणार नाही असे दिसून येते.
मानवी सर्जनातून ज्या कलेचा विकास झाला, ज्या कलेमुळे माणसांच्या जीवनामध्ये बदल झाले, त्या कलेच्या निर्मितीची प्रक्रिया माणसाच्या अंतरंगातून सुरू होते. त्यामुळे कलाकृतीचे जरी ठराविक मोल असले, तरी निर्मितीच्या प्रक्रियेचे मोल करता येत नाही. त्या प्रक्रियेचा यथोचित सन्मान करणेच अपेक्षित असते. ‘एआय’च्या आगमनामुळे कलाकारांच्या सर्जनशक्तीचा वापर आणि आपल्या उपयुक्ततेसाठी शिकणारे ‘एआय’ यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. एका बाजूला नवनवीन प्रयोगांनी सज्ज होणारे ‘एआय’ आपल्याला कितीही हवेसे वाटत असले, तरी ते ज्या ज्ञानसंचितावर मोठे होते त्याच्या निर्मितीसाठी जीवनाची अनेक दशके खर्च झालेली असतात, हेेच एकप्रकारे हे कलाकार सुचवू पाहत आहेत. तरी, समजूतदारपणे सर्वसमावेशक विचार करून आपल्याला पुढे जाणे गरजेचे आहे, हेच म्हणावे लागेल.