निळ्या जगताची व्यथा!

    03-Jun-2025
Total Views | 12
 
Oceans are indispensable pillars of life on Earth
 
आजच्या जागतिक समस्यांमध्ये हवामान बदल ही सर्वांत मोठी समस्या. हे संकट केवळ पर्यावरणपुरते मर्यादित नसून मानवी जीवनमान, अन्नसुरक्षा, जलसंपदा, स्थलांतर, जैवविविधता आणि जागतिक शांतता यांवरदेखील त्याचा गंभीर परिणाम होतो. या सर्व समस्यांतून निर्माण होणार्‍या परिणामांच्या केंद्रस्थानी आहेत महासागर, जे पृथ्वीवरील जीवनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पृथ्वीच्या सुमारे 70 टक्के पृष्ठभागावर पसरलेले महासागर हे केवळ जलाशय नाहीत, तर पृथ्वीच्या हवामानचक्राचे महत्त्वाचे नियामकही आहेत. महासागर दरवर्षी पृथ्वीवर निर्माण होणार्‍या उष्णतेचा सुमारे 90 टक्के भाग शोषून घेतात. तसेच, ते कार्बन डायऑक्साईडसारखे हरितगृह वायू शोषून घेऊन पृथ्वीवरील तापमान वाढीवरही नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. यामुळेच महासागर हे पृथ्वीवरील जीवनाचे अपरिहार्य आधारस्तंभ आहेत.
 
परंतु, आज महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढत असून, 2024 साली याचे सरासरी तापमान सुमारे 20.87 अंश सेल्सियस इतके जास्त नोंदवले गेले. या वाढत्या तापमानामुळे महासागरातील परिसंस्थाच धोक्यात आल्या आहेत. ध्रुवीय प्रदेशांतील हिमनगांचे वितळणे हे हवामान बदलाचे सर्वांत स्पष्ट आणि गंभीर लक्षण आहे. अंटार्क्टिका, आर्क्टिक तसेच हिमालयातील हिमनग हळूहळू वितळून समुद्रात मिसळत आहेत. यामुळे समुद्रपातळीत दरवर्षी वाढ होते. समुद्रपातळीतील वाढीमुळे किनार्‍यालगतचा प्रदेश, दलदलीचे प्रदेश, कृषिक्षेत्र आणि अनेक संवेदनशील जैविक परिसंस्था पाण्याखाली येण्याचा नवा धोकाही निर्माण झाला आहे. तसेच, समुद्रपातळीच्या वाढीमुळे भविष्यात किनारी प्रदेशातील लाखो लोकांचे कायमस्वरूपी विस्थापन होण्याचाही धोका आहे. महासागरातील वाढत्या तापमानाचा परिणाम प्रवाळभित्तींवर होऊन त्यासुद्धा नष्ट होत आहेत. प्रवाळभित्ती हे सागरी अन्नसाखळीचे महत्त्वाचे घटक. प्रवाळभित्तींच्या नाशामुळे माशांचे स्थलांतर, अंडी घालण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणि काही प्रजातींचाही लोप होत आहेत. यामुळे सागरी अन्नसाखळी विस्कळीत होऊन याचा थेट परिणाम मत्स्य व्यवसायावर होतो.
 
जागतिक तापमान वाढीचा परिणाम जसा समुद्राच्या पृष्ठभागावर होतो, तसाच तो खोल समुद्रातही जाणवत आहे. अनेकदा तापमानवाढीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढते. पाण्याने शोषलेली उष्णता समुद्राच्या तळापर्यंत जाते. यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता आणि क्षारता बदलते. याचा समुद्राच्या प्रवाहांवर आणि अभिसरण पद्धतींवर परिणाम होऊ शकतो. जागतिक पातळीवरील परिषदांमध्ये हवामान बदलावर विस्तृत चर्चा कायमच होत आली आहे. परंतु, या चर्चांचा परिणाम प्रत्यक्ष कृतीत फारसा दिसत नाही. अनेक राष्ट्रांमध्ये हवामान बदलाशी संबंधित धोरणांमध्ये तातडीने आणि कडक पावले उचलण्याऐवजी, वेळकाढू धोरणाचा अवलंब केला जात आहे. जगातील प्रत्येक देशाने हवामान बदलाचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्वरित आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पण, दुर्देवाने हवामान बदलाकडे मोठी राष्ट्रे सपशेल दुर्लक्ष करतात. जगातील मोठ्या औद्योगिक राष्ट्रांमध्ये अमेरिका, चीन, रशिया यांचा हवामान बदलाविषयी सहभाग अनेकदा भाषणांपुरताच दिसतो. अनेकदा त्यांची जबाबदारी टाळण्याचाच प्रयत्न करतात. अनेकदा या राष्ट्रांकडे असलेल्या प्रचंड पैशांचा वापर करून ही बडी राष्ट्रे हवामान बदल्याच्या वैश्विक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देतात. मात्र, नियमांची अंमलबजावणी स्वतःच्याच देशात करत नाहीत. आज महासागरांचे संरक्षण ही केवळ पर्यावरणस्नेही तत्त्वज्ञानाची बाब राहिलेली नाही, तर ती मानवजातीच्या अस्तित्वाची अनिवार्य गरज आहे.
 
या पार्श्वभूमीवर सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन हवामान बदलविरोधी धोरणांमध्ये बृहत दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे. महासागरांशी संबंधित ‘ब्लू इकोनॉमी,’ समुद्री जैवविविधता संरक्षण आणि नैसर्गिक परिसंस्था पुनर्बांधणी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरण होणे अत्यावश्यक आहे. महासागर हे केवळ पृथ्वीवरील जलस्रोत नाही, तर पृथ्वीवरील जीवनाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावरील हवामान बदलाचे परिणाम समजून घेऊन, रक्षणासाठी त्वरित आणि ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे. यासाठी धोरणात्मक कृती हाच याचा एकमेव उपाय आहे.
 
- कौस्तुभ वीरकर 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

(Dilip Doshi) भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी २१ जूनला रात्री लंडन येथे वयाच्या ७७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी हे केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नव्हते, तर त्यांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी समालोचक म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्पष्ट, रसाळ आणि अभ्यासपूर्ण भाष्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्यांची क्रेझ होती. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121