...म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही! दोन्ही पवार एकत्र येण्यावर काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?
12-May-2025
Total Views |
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्यभरात सध्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "उबाठा गटाच्या लोकांनी केलेली यूती चुकीची होती, हे आम्ही आधीच सांगत होतो आणि आता त्याचा प्रत्यय त्यांना येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्याबरोबर राहणार नाहीत हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो. आता त्यांचे भविष्य अंधारमय होत चालले असल्याने त्यांनी टीका करणे सुरु केले आहे. राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापद्धतीचे संकेतही आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे काही नवीन नाही."
"गेल्या चार महिन्यात काँग्रेससोबत उबाठा गटाची कोणती बैठक झाली? यांनी त्यांना कधी फोन केला किंवा त्यांनी यांना फोन केला? त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात उबाठा गटाला एकटे चालावे लागणार असून हा एकटा प्रवास त्यांना महागात पडणार आहे. ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले आणि ना ते महाविकास आघाडीत जाऊन आघाडी एकत्रित ठेवू शकले. त्यामुळे आता त्यांची ना घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे," अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.