मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशात डोंबिवलीचे ‘कॅप्टन कुल’ नेते रविंद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. कुठेही गाजावाजा न करता, देवेंद्र फडणवीस यांनी आणि पक्षाने दिलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडतात. कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशात पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुराही ते सक्षमपणे पार पाडतील आणि भाजपचे राज्यातले स्थान अधिक भक्कम करतील, यात कोणतीही शंका नाही. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळवून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे रुजवली. त्यासाठी त्यांनी भाजपच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहून संघटनावाढीसाठी सुयोग्य रणनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थ नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली भाजपने महाराष्ट्रात चौफेर यश मिळवले. या यशात त्यांना तोलामोलाची साथ देणार्या अत्यंत विश्वासू सहकार्यांमध्ये प्रामुख्याने एका नावाचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल, ते म्हणजे भाजपचे नवे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण!
डोंबिवलीचे प्रथम आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करणार्या रविंद्र चव्हाण यांनी केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे, तर पालघरसह संपूर्ण कोकणात भाजपला चांगले यश मिळवून दिले. ते एक अष्टपैलू नेतृत्व आहे. एकाचवेळी ‘मास’ आणि ‘क्लास’ला आपलेसे करण्याची कला त्यांच्यात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि हे शिवधनुष्य ते सहजपणे पेलतील, असा मला विश्वास आहे.
कोकणातील एका सर्वसामान्य कुटुंबातल्या रविंद्र चव्हाण यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
मालवण तालुक्यातील पेंडुर हे त्यांचे जन्मगाव. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड. सुरुवातीला ‘बजरंग दला’चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी समाजकार्याचा श्रीगणेशा केला. अर्थात, त्यांच्या राजकीय वाटचालीला खर्या अर्थाने सुरुवात डोंबिवलीत झाली. २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवकांसाठी कार्यरत असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा-कल्याण विभाग अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. युवकांमध्ये पक्षाची ध्येयधोरणे रुजविण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पडली.
ऑक्टोबर २००५-२०१० या कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभाग क्र. ९६ मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. यादरम्यान ऑक्टोबर २००६ स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ऑक्टोबर २००७ ते २००८ या काळात ते स्थायी समिती सभापती होते. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने स्थायी समिती सभापतिपदी कार्यरत असताना त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यातले विशेष उल्लेखनीय काम म्हणजे ‘झोपडपट्टीमुक्त डोंबिवली.’ केंद्र शासनाच्या ‘स्लमलेस सिटी’ योजनेतून त्यांनी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. त्यातून गोरगरीब कुटुंबांना १२ हजार घरे उपलब्ध झाली.
२००९ साली नव्याने झालेल्या डोंबिवली या मतदारसंघात ते प्रचंड बहुमताने निवडून आले. त्याचप्रमाणे २०१४ला ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मताने म्हणजे पहिल्या क्रमांकाने आणि प्रचंड फरकाने ते निवडून आले. २००९ मध्ये आमदार म्हणून काम करताना त्यांनी प्रामुख्याने वीज, रेल्वे, रस्ते, पाणी, वाहतूक, झोपडवासीयांना घरे, युवकांचे करिअर यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली.
डोंबिवली हे सांस्कृतिक चळवळींचे माहेरघर. या चळवळींना पोषक आणि पूरक ठरेल, असे एक मासिक ‘मी डोंबिवलीकर’ या नावाने रविंद्र चव्हाण यांनी सुरू केले. ते मासिक डोंबिवलीकरांना अभिव्यक्तीसाठी एक सशक्त माध्यम ठरले. या मासिकाच्या माध्यमातून सर्व डोंबिवलीकरांशी संवाद साधण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या कार्यातून डोंबिवलीची जगभरात ओळख आहे. या सर्वांना ‘डोंबिवलीकर’ ब्रॅण्डने एकत्र आणले. ‘डोंबिवलीकर’ दिनदर्शिका, शहरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देणारा ‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार’ या अराजकीय उपक्रमांनी रविंद्र चव्हाण यांचे या शहराशी अतिशय उत्तम ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्राशी त्यांचे सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विशेष म्हणजे, लोकांमध्ये राहून लोकांसाठी कार्य करणारा एक सामान्य कार्यकर्ता, हा त्यांचा लौकिक आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला उत्तम यश मिळाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी खंबीरपणे पार पाडून त्यांनी भाजपच्या नगरसेवकांची संख्या नऊवरून ४५ इतकी वाढवली. केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर उल्हासनगर, अंबरनाथ शहरात भाजपची संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आमदार म्हणून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रशासनाला अनेकदा धारेवर धरले. स्वतंत्र डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी लोडशेडिंग आणि वीजदरवाढीविरुद्ध वीज आयोगासमोर केवळ डोंबिवलीकरांचेच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील वीजग्राहकांचे प्रतिनिधित्व केले. डोंबिवलीतील विजेचे भारनियमन रद्द व्हावे, यासाठी ‘महावितरण’ कंपनीविरोधात ‘महाराष्ट्र वीज नियामक आयोगा’मध्ये त्यांनी कायदेशीर दाद मागितली. एकदा नव्हे, तर सतत तीन वर्षे संघर्ष केल्यानंतर डोंबिवली लोडशेडिंगमुक्त होऊ शकले. त्याचबरोबर त्यांनी डोंबिवलीतील भूमिगत वीजवाहिन्यांसाठी सतत पाठपुरावा केला. घरगुती उद्योगातून उदरनिर्वाह करणार्या कुटुंबांना व्यापारी दराने वीजबिले आकारण्यात येत होती. आयोगाला याबाबत अवगत केल्यानंतर हे अन्यायकारक दरपत्रक मागे घेण्यात आले. डोंबिवली मतदारसंघात चार रेल्वे स्थानके येतात. डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर आणि अप्पर कोपर. शहरातील ८० टक्के नागरिक लोकलवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनी रेल्वेचे प्रश्न अतिशय तळमळीने मांडले. डोंबिवलीच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत होते. याबाबत प्रवाशांची तीव्र भावना रेल्वे प्रशासनाला कळावी, म्हणून त्यांनी रेल्वेच्या ‘डीआरएम’ कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. रेल्वे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून त्यांनी ठाकुर्ली स्थानकाजवळ डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्या नव्या वाहतुकीच्या पुलाचेही काम मार्गी लावले.
विद्यार्थ्यांना तसेच सर्व नागरिकांना सोयीचे जावे, म्हणून त्यांनी डोंबिवलीत अतिरिक्त सेतू कार्यालय स्थापन केले. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तकपेढी स्थापन केली. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवलेला डोंबिवली हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ठरला. त्यांचे चौफेर लक्ष असते. ज्यांना या दुनियेत कसलाही आधार नाही, अशा वृद्ध व्यक्तींना गेल्या आठ-दहा वर्षांपासून ते घरपोच जेवणाचे डबे पोहोचवत आहेत.
२००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यावर शहरात सिमेंटचे रस्ते व्हावेत, ही इच्छा त्यांनी मनाशी बाळगली. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ३२७ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करून घेतले. ठाणे-मुंबईला जाण्यासाठी अधिक सोयीचे व्हावे, म्हणून मोठागाव-मामनोली खाडीपूल मार्गी लावला. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करीत असतानाच पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पाडण्यात ते यशस्वी ठरले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच विविध विभागाचे मंत्रिपद भूषवले. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
मला खात्री आहे की, भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून दिलेली नवी जबाबदारीही ते उत्तम पद्धतीने पार पाडतील. कारण, पक्षातील सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांचे कार्य निर्विघ्नपणे पार पडते. लहान असो वा मोठा, ते सर्वांना आपलेसे वाटतात. राज्यात देवेंद्र आणि रविंद्र ही जोडी भविष्यात भाजपला अधिक उज्ज्वल यश मिळवून देईल, यात शंका नाही. त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा.
निरंजन डावखरे
(लेखक विधान परिषदेचे आमदार आहेत.)