निरागस वयाची पुनर्भेट

    01-Jun-2025
Total Views |


Book review


प्रतिवास्तव, जादुई वास्तवाद यांच्या संगमातून कथा, कादंबरी लिहिणारे प्रयोगशील युवा लेखक प्रणव सखदेव यांनी आपल्या नव्या कादंबरीतून वाचकांना आपल्या निरागस वयाची पुनर्भेट घडवून आणली आहे. अशा या ’के कनेक्शन्स’ कादंबरीचा घेतलेला आढावा...


जुने होत जाता
होते नवी एक सय,
सकाळच्या उन्हागत निरागस वय,
घर असे जणू
कुणी कुशीमध्ये घ्यावे,
ह्याच्या त्याच्या
हातामध्ये खुशाल झुलावे,
जग सारे छान आहे सांगायचे क्षण,
काचेपरी नितळ असे होते बालपण

सलील कुलकर्णी यांच्या ‘बालपण’ या गाण्यातील ओळी म्हणजे आपल्या आयुष्याची पुनर्भेटच! वय वाढल्यानंतर कधीकधी अचानक मन भूतकाळात मागे मागे जातं. आपल्या जीवनाचा आरंभबिंदू आपल्या मनोविश्वाभोवती घिरट्या घालू लागतो. गोष्टी कळण्याचे दिवस, अनुभूतीचे दिवस आपल्याला भेटत राहतात. या भेटीचेच नाव म्हणजे ’के कनेक्शन्स.’ ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’प्राप्त लेखक प्रणव सखदेव यांची नवीकोरी कादंबरी म्हणजे आपल्या त्या निरागस वयाची पुनर्भेट आहे. ते वय ज्याची आठवण आपल्या मनपटलावर सुवर्णाक्षरांनी कोरलेली असते. हेच वय आपल्याला घडवत असतं. प्रणव सखदेव यांनी हा आठवणींचा कप्पा सताड उघडत वाचकांसमोर खजिनाच ठेवला आहे.

या कादंबरीमध्ये लेखक गोष्ट सांगतो, ती एका अशा वयाची जिथून स्थित्यंतराच्या प्रवासाला सुरुवात होते. एकाचवेळी आपण लहान राहिलेलो नसतो आणि मोठेसुद्धा झालेलो नसतो. या वयात मनाची जी घालमेल होते, भोवताली जे बदल आपण टिपतो, ती सगळी वर्णनं प्रणव सखदेव यांनी अत्यंत समर्थपणे टिपली आहेत. ‘प्रतिवास्तव’ अर्थात ज्याला आपण ‘फिक्शन’ म्हणतो, त्याची निर्मितीप्रक्रिया आव्हानात्मक असते. लिखित साहित्य हे जीवनाशी किंवा जीवनमूल्यांशी एकरुप कसे होईल, याचा विचार लेखक आपापल्या परीने करत असतो. प्रणव सखदेव यांच्या लिखाणात आपल्याला हा विचार त्यांनी किती समर्थपणे केला आहे, याची वारंवार प्रचिती येते. ’काळेकरडे स्ट्रोक्स’, ’चतुर’ या कादंबर्‍यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या लिखाणातील वेगळेपण, पात्रांची उत्कटता अत्यंत तन्मयतेने मांडली आहे. प्रवाही लेखन, आशयघन कथानक ही प्रणव यांच्या लिखाणाचे बलस्थाने आहेत. त्यांच्या लिखणामध्ये वर्तमानातील जगाचा धांडोळा ते सातत्याने घेत असतात. परंतु, त्या लिखणामध्ये कुठेही रुक्षपणा आणि निव्वळ घटना सांगणे अभिप्रेत नसते. त्यांची अभिव्यक्ती भावनांचे तळ गाठणारी असते. ‘के कनेक्शन्स’ ही कादंबरी म्हणजे तसाच एक शोध आहे.

भूतकाळाचा पट मोठा असतो. त्याला शब्दबद्ध करताना बर्‍याचदा त्याच भूतकाळामध्ये हरवण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे लेखकाचा हेतू अस्पष्ट होत जातो. हीच गोष्ट टाळून प्रणव यांनी अत्यंत यशस्वीरित्या ‘के कनेक्शन्स’ या कादंबरीचे कथानक फुलवले आहे. या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी त्या भूतकाळाकडे बघितलं आहे. त्याचं एक सुस्पष्ट आकलन आपल्यासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

ही कादंबरी म्हणजे, एक प्रकारचा सफरनामा आहे आणि हा सफरनामा घडतो कल्याणमध्ये. यानिमित्ताने वाचकाला कल्याण शहराची मुशाफिरी अनुभवायला मिळते. शिवाजी चौक, काळा तलाव, लाल चौकी, नमस्कार मंडळ, ही केवळ ठिकाणं नसून त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आपल्याला या कादंबरीमध्ये पदोपदी जाणवतं. कल्याणमध्ये दीर्घ काळ वास्तव्य करणार्‍या माणसासाठी ही कादंबरी म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा आहे. या आठवणींच्या विश्वात रमताना, नकळत आपणसुद्धा पतंग उडवण्याचा, सायकल चालवण्याचा, क्रिकेट खेळण्याच्या आपल्या बालपणामध्ये रमून जातो. हाताच्या तळव्यावर घेऊन बोरकूट चाटण्याच्या वयात आपलं मन मागे जातं.

बालपणीच्या या सुखाच्या काळात आपल्या अवतीभोवती असलेला आपला समाज आपल्यावर अनेक गोष्टींचे संस्कार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करीत असतो. आपला भोवताल मनाच्या मातीला आकार देत असतो. त्यावेळेस मनामध्ये जो भावनांचा हलकल्लोळ माजलेला असतो, तो लेखकाने अचूकपणे रेखाटला आहे. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, लेखकाने कुठल्याही प्रकारे तुलनात्मक समीकरण न मांडता, आहे त्या काळामध्ये आणि आहे त्या माणसांमध्ये ते समरस झाले आहेत. यामुळे निव्वळ भावविवशतेच्या कोषात न रमता, एक व्यापक पट लेखकाला मांडणे शक्य झाले आहे. प्रणव सखदेव यांनी आपल्या कथा-कादंबर्‍यांच्या माध्यमातून जादुई वास्तववाद एक प्रकारे वाचकांसमोर मांडला आहे. प्रणव सखदेव यांचे बालपण कल्याणमध्ये गेले. त्यामुळे अत्यंत समर्थपणे त्यांनी हे कथानक उभे केलेले दिसते. आपल्या भावविश्वाशी ज्या गोष्टीची नाळ जोडलेली असते, त्याची अभिव्यक्ती किती सशक्त असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी.

या पुस्तकावर भाष्य करताना लेखक निखिलेश चित्रे म्हणतात की, “यात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे.” ही निरागसता आणि संवेदनशीलता जपणे खरं तर अवघड गोष्ट असते. आपल्या जडणघडणीत वयाच्या एका टप्प्यानंतर जगाकडे बघण्याचा साक्षेपी दृष्टिकोन तयार होतो. यानंतरसुद्धा मुशाफिरी करत पुन्हा एकदा ते निरागस वय आपल्या शब्दांमध्ये पकडणं, म्हणजे एक आव्हानच असतं आणि हे आव्हान प्रणव सखदेव यांनी अत्यंत समर्थपणे पेलले आहे. अन्वर हुसेन यांच्या कुंचल्यातून साकारलेले मुखपृष्ठ आणि आतील चित्रे यांमुळे पुस्तक सुंदर सजलं आहे. ज्या वयात आपल्या जीवनाचे स्थलांतर होते, अशा वयाचा धांडोळा घेणारे हे पुस्तक वाचायलाच हवे.

पुस्तकाचे नाव : के कनेक्शन्स
लेखक : प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मूल्य : 275/-

मुकुल आव्हाड
9967826983